मानवाने सुरुवातीला सुरक्षित जागा निवडून झाडांच्या फांद्या, गवत आणि दगडांपासून घरे बनवली. बाजूच्या भागातील गवत काढून जमीन भुसभुशीत करून बिया पेरल्या. मात्र त्या रोपांना जंगलातील हरीण, काळवीट आणि सशांनी खाल्ले. पुन्हा त्या रोपाना खाऊ नये म्हणून, तो बिया पेरलेल्या जमिनीभोवती झाडांच्या फांद्याचे कुंपण घालायला शिकला. अनुभवातून माणूस शिकत गेला. जे अनुभवातून ज्ञान मिळाले, ते त्याने पुढच्या पिढीपर्यंत मौखिक पद्धतीने पोहोचवायला सुरुवात केली. शेतीतील ज्ञान वाढत गेले.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
हिमयुगाच्या अस्तानंतर पाषाण युगाची सुरुवात झाली. हिमयुगाच्या काळात माणसापुढे, मानवाच्या पूर्वजापुढे अनेक संकटे ‘आ’ वासून उभा होती. जंगली प्राणी कधी हल्ला करतील आणि जीव घेतील याची चिंता होती. दुसरे म्हणजे बर्फ इतक्या मोठ्या प्रमाणात पडत होते की थंडीपासून स्वत:चा जीव वाचवणे कठीण झाले होते. तत्कालीन मानवाच्या अंगावरही, शेळ्या-मेंढ्याच्या अंगावर असतात, तसे केस होते. ते थंडीपासून वाचण्यासाठी पुरेसे नव्हते. जंगली प्राण्यांना भिती घालण्यासाठी अग्नीचा वापर करायला आदिमानव शिकला होता. आणखी एक महत्त्वाचे आव्हान होते, ते भूक मिटवण्याचे. त्यासाठी तो रोज सकाळी उठून, टोळीने बाहेर पडून शिकार करत असे. शिकारीसाठी हाताचा वापर जास्त होत असे.
अन्य प्राणी चालण्यासाठी चार पायांचा वापर करतात. मानवाला पुढचे पाय, पाय न राहता हात बनले. वाघ, सिंह, लांडगा यांच्याही पुढच्या पायाचे पंजे सावजाला पकडण्यासाठी विकसित झाले आहेत. मानवाच्याही पुढच्या पायाची म्हणजेच हाताची रचना त्याच प्रकारची होती. पुढे मानवाने दोन पायावर चालणे सुरू केले. पुढच्या पायाचा वापर इतर कामासाठी करू लागल्याने, हाताची रचना बदलली. समजा आजही मानव चार पायावरच चालत असता, तर आपल्या हाताची रचना वाघ, सिंहाच्या पायासारखी राहिली असती. मात्र दोन पायावर चालू लागल्यानंतर हाताचा वापर अन्य प्राण्यांच्या तुलनेत जास्त प्रभावीपणे वापरता येणे शक्य झाले. तसेच त्याने प्राण्यांकडून आणि निसर्गात घडणाऱ्या घटनातून शिकायला सुरुवात केली होती. उदाहरणार्थ, एकटा हत्ती दिसला तर वाघ, सिंह त्यावर हल्ला करून, आपली भूक भागवत असे. मात्र हत्ती टोळीने असताना, हे प्राणी हत्तीकडे वाकडी नजर करून पहात नसत. हे पाहून मानव टोळीने राहू लागला.
पुढे तो सुरक्षेसोबत, सुख शोधू लागला. कमी कष्ट म्हणज सुख ही कल्पना सुरुवातीपासून होती. त्यासाठी तो अन्य प्राण्याचे अनुकरण करत होता. प्राणीशिकार केल्यानंतर शिल्लक राहिलेले मांस, बर्फाखाली झाकून ठेवत. थंडपणामुळे मांस सडत नसे. हे पाहून मानवही तसे अन्न बर्फाखाली ठेवून पुरवून वापरत असे. मानवासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहा याच सुरक्षित होत्या. मात्र हिमयुग संपत आल्याबरोबर त्याला रोजची शिकार रोज करणे गरजेचे बनले. दोन दिवस शिकार नाही मिळाली तर उपाशी रहावे लागत असे. यातून तो फळे, पाने, फुले, धान्याच्या बिया खाऊ लागला. मांसापेक्षा वनस्पतीजन्य पदार्थांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यातही अनेकदा शिकार मिळत नसल्याने, केवळ फळे, कंदमुळे, पाने खाण्यावर भर दिला जाऊ लागला होता. मात्र शिकारीला जाताना टोळीतील लोक, गुहेमध्ये गरोदर महिला, वृद्ध आणि मुलांना ठेवून जात.
त्यातून एक महत्त्वाचा शोध लागला. इराक, तुर्कस्तान भागात अशीच एक टोळी रहात होती. त्या टोळीतील पुरूषही असेच अन्नाच्या शोधात बाहेर जात. घरातील महिला घरात असणारे धान्य निवडण्याचे काम करत. खराब धान्य, कचरा, बाहेर टाकत. त्यातील काही बिया उगवल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्या रोपांना त्यांनी उपटले नाही. तसेच मोठे होऊ दिले. काही दिवसानी रोपाला नवे कणीस आले. त्यात हळूहळू बिया भरल्या. पुढे त्याच महिलांनी आजूबाजूच्या परिसरातील गवत काढून, जाणिवपूर्वक बिया मातीमध्ये लपवल्या. पाऊस पडताच त्यातून नवी रोपे आली आणि त्यापासून त्यांना धान्यही मिळाले. तोपर्यंत मानवाची भटकंती सुरू होती. शिकार मिळेपर्यत तो एका जागेवर थांबत असे. महिलांचा प्रयोग पाहून धान्य असेही मिळू शकते, याचे ज्ञान मानवाला मिळाले. मग त्यांने जणू जमिनीशी करार करायचे ठरवले. एका जागी स्थिर राहून, जमिनीची भरपूर सेवा करायची आणि जमिनीने त्याला हवे तेवढे धान्य द्यायचे. यातून त्याची भटकंती थांबणार होती.
यात मानवाचे हितच होते. तो सुरक्षित आसरा बनवू शकत होता. अग्नी तेवत ठेवून जंगली प्राण्यापासून संरक्षण मिळवणे शक्य होते. त्याचबरोबर शेती करून सुखाने राहता येणार होते. त्याने यासाठी नदीचा किनारा निवडला. त्याची काही प्रमुख कारणे होती. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, नदीकाठी शेती करण्यायोग्य जमीन उपलब्ध होती. दुसरे म्हणजे, त्याला मुबलक पाणी मिळत होते. तिसरे कारण म्हणजे, नदीवर पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी येत आणि मानवाला भटकंती न करताही शिकार मिळत होती. मानवाने कमी कष्टामध्ये आपली सुरक्षितता आणि अन्नाची हमी मिळवली. त्या वेळेपासून माणसाने कायम सुरक्षितता आणि सुखाचाच विचार कायम केला आहे. त्यातूनच आजची भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
मात्र ही मानवाची सुरुवात होती. मानवाने सुरुवातीला सुरक्षित जागा निवडून झाडांच्या फांद्या, गवत आणि दगडांपासून घरे बनवली. बाजूच्या भागातील गवत काढून जमीन भुसभुशीत करून बिया पेरल्या. मात्र त्या रोपांना जंगलातील हरीण, काळवीट आणि सशांनी खाल्ले. पुन्हा त्या रोपाना खाऊ नये म्हणून, तो बिया पेरलेल्या जमिनीभोवती झाडांच्या फांद्याचे कुंपण घालायला शिकला. अनुभवातून माणूस शिकत गेला. जे अनुभवातून ज्ञान मिळाले, ते त्याने पुढच्या पिढीपर्यंत मौखिक पद्धतीने पोहोचवायला सुरुवात केली. शेतीतील ज्ञान वाढत गेले. त्यातील महत्त्वाच्या अनेक पद्धती विकसित झाल्या. त्यातील महत्त्वाची पद्धती होती, ती म्हणजे जैविक खते, सेंद्रिय खते मातीत मिसळण्याची पद्धत होय. माणूस स्थिर झाला. त्याचे शारीरिक कष्ट कमी झाले, तसे विचार करण्यास त्याला वेळ मिळू लागला कारण सुरक्षेची चिंता कमी झाली होती.
आता जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गमावण्याची भिती नसल्याने शेती, शेतातील पिके, त्यामध्ये सुधारणा कशी आणि काय करायची याचाच तो विचार करू लागला. एकाच जागेवर कायम शेती केली तर हवी तशी पिकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांने जागा बदलून पिके घेणे गरजेचे असल्याचेही अनुभवातून शिकून घेतले. विशेष हे की जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या आदिमानवानी मानव बनण्यास, स्थिर होण्यास एकाच कालखंडात सुरुवात केली. साधारण हजारेक वर्षाचा तो कालखंड होता, इसवी सन पूर्व नऊ ते दहा हजार वर्षापूर्वीचा. अनुभवातून ज्ञान मिळवण्याची आणि त्याची पुनर्पडताळणी करून त्याचे विज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य मानवाचे विकसित होण्यास यावेळेपासून सुरुवात झाली.
अनुभवातून ज्ञान मिळवणे, त्याची पुनर्पडताळणी करून खात्री करून घेणे आणि पुनर्पडताळणी होत असल्यास त्याला विज्ञानात रूपांतर करण्यास शेतीपासून सुरुवात झाली. त्यातून पुढे चाकाचा उपयोग तो करू लागला आणि विज्ञानानेही गती पकडली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
