रत्नागिरी येथे मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ( वय ९६ ) यांचा भव्य गौरव सोहळा योजला आहे. त्या निमित्ताने...
मधुभाईंच्या साहित्याने रा्ज्यभर वाड्मयीन चळवळ उभी केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद ही मधुभाईंनी साहित्य क्षेत्राला दिलेली मोठी देणगी आहे. सार्वजनिक ठिकाणी किवा कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोणी कार्यकर्ते, सभासद, पदाधिकारी भेटले की मधुभाईंना आनंद होतो. शाखा कशी चालली आहे, कार्यक्रम काय काय घेतलेत अशी विचारपूस करतात. कोमसापच्या कार्यक्रमाला मधुभाई आवर्जून उपस्थित राहतात. मार्गदर्शन करतात. मधुभाई म्हणजे साहित्य क्षेत्रातील चैतन्याचा झरा आहे.
डॉ. सुकृत खांडेकर ( ज्येष्ठ संपादक, मुंबई )
मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूप पूर्व येथील डीएव्ही आर्या कॉलेजच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी कविसंमेलन योजले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या भांडूप शाखेने पुढाकार घेऊन योजलेल्या कविसंमेलनास जवळपास दिडशे नवोदीत कवी उपस्थित होते. शिवाय कवितांचा आनंद लुटण्यासाठी रसिकांची गर्दीही चांगली लोटली होती. मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनात मराठी साहित्यप्रेमी रसिकांची नि कविंची एवढी गर्दी जमते, यावर कोणी सहसा विश्वास ठेवणार नाही. पण या कविसंमेलनाचे उद्घाटक होते, प्रख्यात साहित्यिक, कवि, कादंबरीकार, कथालेखक आणि नवोदीत लेखक – कविंचे प्रेरणास्थान असलेले मधु मंगेश कर्णिक. कोमसापचे भांडुप शाखेचे प्रमुख डॉ. जे. आर. केळुस्कर यांनी पुढाकार घेऊन मोठ्या परिश्रमातून हे कवि संमेलन योजले होते. संमेलनाचे उदघाटन मधुभाईं करणार असे समजल्यावर साहित्याप्रेमींची मोठी गर्दी लोटली. या शानदार कविसंमेलनाचे सूत्रसंचालन मुंबईतील प्रसिध्द निवेदीका, लेखिका व अभिनेत्री पूजा काळे यांनी केले होते.
भांडुपच्या कविसंमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ, नामवंत कवि अशोक बागवे व प्रा. अरूण म्हात्रे, संस्कृत पंडित व अध्यात्म प्रसाराचे वाण घेतलेल्या प्रा. प्रज्ञा पंडित, डोंबिवली येथील लेखक व समाजसेवक शशिकांत सावंत, बबन येरम आदी मान्यवरांची मांदीयाळी तेथे होतीच. या कविसंमेलनाला मलाही निमंत्रण होते व मी तेथे जाऊन प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसलो. तेवढ्यात व्यासपीठवरून डॉ. केळुस्कर यांनी मला बघितले व व्यासपीठावर बोलावले. मला खरे तर मधुभाईंचे भाषण समोर बसून ऐकायचे होते. पण मधुभाईंचे माझ्याकडे लक्ष जाताच त्यांनीही मला व्यासपीठावर बोलावून घेतले व त्यांच्या शेजारच्या आसनावर बसायला सांगितले.
मधुभाईंच्या उपस्थितीत साजऱ्या झालेल्या मुंबईतील अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. अनेकदा व्यासपीठावर ते असताना मला बोलण्याची संधी मिळाली आहे. पण मधुभाईंचे भाषण व त्यांचा सहवास हा विलक्षण आनंद व प्रेरणादाई असतो याचा मला नेहमीच अनुभव आला आहे. मधुभाईंचे शब्द मग ते लेखनातील असोत वा भाषणातील , मनाला भावणारे व आनंद देणारे असतात. मधुभाई जिथे असतात, तिथे आनंद आणि उत्साह असतो. मधुभाई म्हणजे आनंद निर्माण करणारे आणि आनंद इतरांना मनसोक्त वाटणारे व्यक्तिमत्व आहे. मधुभाईंच्या उपस्थितीत नवोदीत लेखक किंवा कविंना उर्जा मिळते. उत्तेजन मिळते. त्यांच्याकडून शाबासकी मिळणे म्हणजे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रापेक्षा मोठी कमाई असते.
मधुभाईंच्या प्रेणनेतून हजारे कवी नि लेखक निर्माण झाले आहेत. मधुभाईंच्या साहित्याने रा्ज्यभर वाड्मयीन चळवळ उभी केली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद ही मधुभाईंनी साहित्य क्षेत्राला दिलेली मोठी देणगी आहे. सार्वजनिक ठिकाणी किवा कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे कोणी कार्यकर्ते, सभासद, पदाधिकारी भेटले की मधुभाईंना आनंद होतो. शाखा कशी चालली आहे, कार्यक्रम काय काय घेतलेत अशी विचारपूस करतात. कोमसापच्या कार्यक्रमाला मधुभाई आवर्जून उपस्थित राहतात. मार्गदर्शन करतात. मधुभाई म्हणजे साहित्य क्षेत्रातील चैतन्याचा झरा आहे.
गेल्या वर्षी मुंबईत मधुभाईंचा ९५ वा वाढदिवस साजरा झाला. आजवर त्यांनी चाळीस कथा संग्रह, चौदा कांदबऱ्या, बाल वाङ् मय, कविता संग्रह, असा सत्तर- पंचाहत्तर पुस्तकांचा खजिना मराठी रसिकांना दिला आहे. वयाच्या ९६ वर्षात मधुभाईंचा उत्साह आजही तरूणांना लाजवणारा आहे. साहित्य आणि संस्कृती ही त्यांची जीवन रेखा आहे. मधुभाई हे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहेच पण वाङ् मयीन सेवेसाठी उभारलेल्या संस्थात्मक व सामाजिक चळवळीतही त्यांचे स्थान उत्तुंग आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी त्यांच्या लेखात मधुभाईंच्या साहित्यिक कर्तृत्वाचा गौरव करताना दोन बाबींचा उल्लेख केला आहे, याची या लेखात नोंद घेणे मला आवश्यक वाटते. मधुभाई हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी दोन आश्वासने दिली होती. एक- कोकणची साहित्यिक- सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद ही संस्था उभी करीन आणि दोन- अधुनिक कवितेचे जनक केशवसुत यांच्या जन्मघरी मालगुंड येथे त्यांचे उचित देखणे स्मारक उभे करीन. हे दोन्ही शब्द मधुभाईंने पाळले. याचा समस्त साहित्य प्रेमींना आनंद आणि अभिमान वाटतो. ते नेहमी म्हणतात, मी चांगल्या गोष्टी करण्यासाठी जन्माला आलो. लोकांचे मिळालेले निर्व्याज प्रेम हीच माझी मोठी कमाई आहे. मधुभाईंनी आपल्या शब्दातून आयुष्यभर माणसावर आणि निसर्गावर नि:सीम प्रेम केले. मधुभाई म्हणजे लक्षावधी साहित्यप्रेमींना जोडून ठेवणारा असामान्य साहित्यिक आहे.
माहीमची खाडी किंवा भाकरी आणि फूल अशा पुस्तकांच्या वाचनानंतर मधुभाईंकडे आकर्षित झाली, त्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आहे. आपल्या शब्दातून वाचकांना खिळवून ठेवणारा व विचार करायला लावणारे मधुभाई हे लक्षवधी मराठी मनाचे स्फूर्तीस्थान आहे. १९५८ मधे त्यांच्या कोकण गं वस्ती या पहिल्या कथा संग्रहाचे प्रकाशन पु. ल . देशपांडे यांच्या हस्ते झाले, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितले नाही. मधुभाईंच्या हस्ते शेकडो पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे आणि अनेक लेखक आपल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावे याच्या प्रतिक्षेत आहेत. तळ कोकणातील करूळ मधे जन्माला आलेला मुलगा विजय दुर्ग येथील एस टीच्या भांडारात लिपिक म्हणून नोकरीला लागला होता. पण साहित्य क्षेत्रातील योगदानातून मधुभाई लक्षावधी रसिकांच्या गळ्यातील ताईद बनले आहेत. मधुभाईंच्या साहित्य सेवेबद्दल महाराष्ट्राला अभिमान आहेच पण वर्षानुवर्षे तरूण पिढीला आनंद आणि उर्जा देणारे प्रेरणास्थान आहे. मधुभाईंचा सहवास आणि साहित्य हा आनंदाचा सागर आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
