June 12, 2025
‘माणसं – मनातली’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे दर्शन, ज्यात जीवनमूल्ये आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची छायाचित्रं
Home » ‘माणसं मनातली’ : माणूसकीचा मंगल साक्षात्कार…
मुक्त संवाद

‘माणसं मनातली’ : माणूसकीचा मंगल साक्षात्कार…

कोल्हापूर निवासी माझे परममित्र वैद्यराज सुनिल बंडोपंत पाटील यांनी लिहिलेले ‘माणसं मनातली’ हे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने….

प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर.

‘माणसं मनातली’ या पुस्तकात लेखकाने आपल्या जीवन प्रवासात भेटलेल्या आणि आपल्या प्रतिभेच्या आणि प्रज्ञेच्या कसोटीवर पात्र ठरलेल्या सुमारे सत्तावीस व्यक्तींमधील माणूसकीच्या विविध पैलूंचे प्रभावी अशा लेखन शैलीत दर्शन घडविले आहे. हे पुस्तक संपूर्णपणे मी वाचून काढले म्हणण्यापेक्षा यातील प्रत्येक व्यक्तीला व व्यक्तीतील माणूसपण शोधणाऱ्या लेखकाच्या उदात्त दृष्टीकोनाला समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखक वैद्य सुनिल पाटील यांनी त्यांच्या बालपणापासून ते वैद्यकीय व्यवसाय करीत असतांना आणि आयुर्वेद शास्त्राचा प्रचार-प्रसार हेच आपले जीवित कार्य समजून गेल्या चार दशकापासून केलेल्या अनेक देशांच्या भ्रमंतीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा सहवास लाभला त्यापैकी मोजक्या व्यक्तीत्यांमधील अंतरंगी दडलेल्या माणूसकीचा वेध घेऊन मानवी सद्गुणांचा साक्षात्कार ‘माणसं – मनातली’ या पुस्तकात घडविला आहे.

माणसं मनातली’ हे पुस्तक वाचल्यानंतर माझी अशी खात्री झाली आहे की एरवी मानवी शरीराच्या स्वास्थ्यासाठी त्रिदोषांची चिकित्सा करणारा हा नाडी – विज्ञान तज्ञ आत्ता माणूसकीची नस शोधण्यातही यशस्वी झाला आहे.

‘माणसं-मनातली’ या पुस्तकात एकूण सत्तावीस व्यक्तींचा परिचय करून दिला आहे. यातील बहुतांश व्यक्ती हयात नाहीत. पण त्या व्यक्तींच्या सहवासातील आठवणींचा गहिवर येऊन त्यांना आदरांजली वाहतांना त्यांच्यातील माणूसकीच्या पैलूंचे जे दर्शन वैद्य पाटील यांनी घडविले आहे ते वाचकांच्या मनावर खोलवर परिणा करणारे आणि त्यास अंतर्मुख करणारे आहे.

‘माणसं-मनातली’ या पुस्तकातील व्यक्तींची निवड करतांना मानवी सद्गुणांच्या विविध पैलूंचे दर्शन वाचकांना घडविण्याची दक्षता घेतली असल्याचे जाणवते. माणूसकीचे हे विविध पैलू निश्चितच वाचकांना प्रभावित करतात. उदाहरणार्थ नरसोबावाडी येथील श्रीदत्तांच्या पादुकांचे पुजाऱ्यांनी दिलेले तीर्थ-अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने घेणाऱ्या डॉ. शेरलॉट बेहची सहज आणि प्रांजळ शुभभाव, अॅना मॅसिडोनियाची पितृभक्ती, ब्रॅन्को चिचिच चे बंधूवत प्रेम, डॉ. प्रिजकेल (पी.जे.) यांची आतिथ्यशीलता, निओली – समसम चे फुलां – पानांवरील निसर्गप्रेम या परदेशी परिचितांव्यतिरिक्त इस्माईल शेरवची मायबोलीवरील प्रेम, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाडीतज्ञ वैद्य बृहस्पतीदेव त्रिगुणा यांची शास्त्र निष्ठा – निष्णात ज्ञान कौशल्य, डॉ. रवि जवळगेकर आणि वैद्य अचला कुलकर्णी यांची विद्यार्थीप्रियता आणि आयुर्वेदातील वैज्ञानिक विश्वासता, वैद्य सुनिल यांच्या वडणगे या मूळगावातील शेलार आबांविषयीची ग्रामीण मनातील उदारता आणि आस्था-सहअस्तित्व, लेडीज टेलर बाळू नावलेची निरागसता, तर पत्रकार जगन फडणीसांच्या शोध पत्रकारितेतील साहस व धाडस आणि अभिनेता कुलदीप पवारांची कर्तव्यतत्परता आणि कलाप्रेम अशा अनेक मानवी अलंकारांचे जणूत्र प्रदर्शनच या ‘माणसं – मनातली’ या पुस्तकात लेखकांने मांडले आहे.

‘माणसं – मनातली’ या पुस्तकातील व्यक्तींचा परिचय वाचकांना करून दे असतांना लेखकाने केलेले शब्दांकन आणि मांडणी अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक झाली असून प्रत्यक्ष स्थळ, काळ आणि प्रसंगांच्या वर्णनामुळे ती पात्रे आणि ते प्रसंग वाचकांसमोर जीवंत उभी राहतात. ज्याचा परिचय लेखक करून देत आहे त्याच्यातील माणूसकीचा उलगडा लेखाच्या शेवटच्या काही परिच्छेदात करण्याची लेखकांनी येथे वापरलेले कौशल्य अभिनंदनीय आहे.

“माणसं – मनातली” या पुस्तकात सहवासातील एखाद्या व्यक्तीचा परिचय अत्यंत थोडक्यात, मोजक्या शब्दात, नेमक्या भाषेत त्याचे व्यक्तीत्व, त्याचा पेहराव, त्यांच्यातील मानवी सद्गुणांचा शोध कसा घ्यावा याचे हे पुस्तक आदर्श उदाहरण म्हणून प्रस्तूत करता येईल.

भाग्ययोगाने म्हणा वा संधी म्हणून आपल्या आयुष्यात अनेक थोर व्यक्ती येतात. काहींना प्रत्यक्ष, काहींना अप्रत्यक्षपणे आपण परिचित असतो. त्या व्यक्तीमधील ‘माणूस’ शोधून व समजावून घेऊन समाजासमोर आणणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे, हे कर्तव्य माझे परममित्र वैद्य सुनिल पाटील हे गेली अनेक वर्षे बजावीत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन !

‘माणसं – मनातली’ या पुस्तकाचे लेखक वैद्य सुनिल पाटील आणि मी आम्ही दोघे सोलापूरातील आयुर्वेद महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तसे आम्ही दोघे एकाच कोल्हापूर जिल्ह्यातील, एकाच करवीर तालुक्यातील. आम्ही दोघे एकाच ‘पंचगंगा नदीचे पाणी प्यालेले. वैद्य सुनिल कोल्हापूरच्या पश्चिमेकडील लगतच्याच वडणगे गांवचा आणि मी कोल्हापूरच्या पूर्वेकडील लगतच्याच चिंचवाड गावचा. एकाच मातीत, पाण्यात व संस्कृतीत आमचा पिंड पोसला आहे. त्यामुळे वैद्य सुनिल यांच्या तनामनात कोणते, किती पाणी आहे याची मला कल्पना असल्यानेच त्यांनी मला त्यांच्या या ‘माणसं-मनातली’ पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह केला असावा. त्यांचे अंतर्मन आणि भावविश्व मित्रच जाणू शकतात असा त्यांचा विश्वास आहे यापेक्षा आम्हां मित्रांना आनंद तो कोणता ?

निसर्गतःच माणूसकीचा गहिवर लाभलेल्या या माझ्या मित्राच्या प्रत्येक कृतीचा मला आनंद आणि अभिमान वाटत आला आहे. त्याची शुद्ध आयुर्वेदावरील निष्ठा असो, प्रॅक्टीस असो, वनौषधी विद्यापीठाची त्यांनी केलेली स्थापना असो कि त्यांनी सातत्याने प्रकाशित केलेला वनौषधी दिवाळी अंक असो, महर्षिचे कार्य असो वा देशोदेशी आयुर्वेद प्रचाराचे त्यांनी केलेले कार्य असो या सर्वांचा मी साक्षीदार आणि शुभेच्छुक आहे. पण या प्रदीर्घ सहवासात कधी जाहीरपणे वा मित्रांच्या समोर अभिनंदन करण्याची संधी मिळाली नाही. (आपल्या माणसाचं त्याच्यासमोर फार कौतुक करायचं नाही हा कोल्हापूरकरांचा शिरस्ता आहे.) पण हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र हा शिरस्ता मी मोडत आहे. कारण जर मी या पुस्तकातील मानवी प्रेरणांचा जाहीर पुरस्कार केला नाही तर हे शल्य मला सतत सतावत राहील. म्हणून मी या पुस्तकाबद्दल जाहीरपणे माझे परम्मित्र पायांचे अभिनंदन करून ‘माणसं मनातली’ या पुस्तकाच्या स्वरूपात त्यांनी माणूसकीचा जो मंगल साक्षात्कार घडविला आहे तो कोल्हापूरच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवशाली परंपरेतील एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे जो भाषा, देश, संस्कृतीच्या परिघाबाहेर जाऊन प्रकाश पुंज बनून दिशा दर्शन करीत राहील.

माणसे. आठवणीत हरवलेली

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहून जीवनमान व्यतीत करताना आपल्या आसपास हजारो प्रकारची वेगवेगळी माणस आढळून येतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येकाची ठेवण चालणे, बोलणे वागणे हे वेगवेगळे असले तरी काळाच्या ओघात आपल्याला मेटलेली काही मोजकी माणसे दिर्घकाळ लक्षात राहतात.
भय, राग, लोभ, इच्छा, ईर्ष्या, मद, मत्सर असे विविध भावनीक रस आणि त्यांचे विचारांच्या माध्यमातून त्या त्या व्यक्तीच्या वागण्यातून होणारे प्रकटीकरण कुणाला आवडते, कुणाल आवडत नाही.
माझ्या स्वतःच्या आयुष्याच्या वाटचालीत या जीवन प्रवासात अनेक मुसाफिर भेटले त्यातील काही मोजक्या अशा व्यक्तींची आठवण त्यांच्या स्वभावामुळे माझ्या मनात घर करून राहीली.
मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या आयुर्वेद शास्त्राच्या प्रसारार्थ जगातील विविध देशांत जाण्याचा मला योग आला देश-विदेशातील भूमी वेगळी तेथील प्रत्येक नदीचे पाणी वेगळे समाजजन वेगळे चाली गळ्यामात्र त्याही काही माणस मला गावली आहेत त्यापेक्षा त्यांची व्यकिमत्व मोठी दिसली.
या सगळ्या माणसांच्या मुळे माझ्यावरही कळत-नकळत जीवनाकडे काही चांगले संस्कार पडले. जीवनाकडे बघण्याचा माझा टीकोन बदलला अनेक सकारात्मक वैचारीक विद्या त्यामुळे मिळाली.
आज इतक्या वर्षानंतरही हो माणसं मनाच्या कप्यात खोलवर कुठारी पडून बसलेली आहेत. या लिखाणाच्या निमित्ताने ती आठवणींच्या हिंगेळ्यावर बसुन झुलू लागली त्यांना पकडुन खास तुम्हा वाचकांसाठी करण्याचा हा प्रयत्न. अशाच काही आठवणीत हरवलेल्या माणसांची पुन्हा एक आठवण

पुस्तकाचे नाव – माणसं मनातल
लेखक – वैद्यराज सुनिल बी. पाटील
प्रकाशक – आयुर्वेल प्रकाशन
किंमत – रु. २००/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading