चिकोडे ग्रंथालयातील परिसंवादात विचारमंथन
कोल्हापूर – कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत ‘वार्तांच्या कथा व कथांची पुस्तके’ या विषयावर मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात पुढारीचे पत्रकार श्रीराम पचिंद्रे, लोकमतचे विश्वास पाटील व समीर देशपांडे, सकाळचे राजेंद्र घोरपडे आणि पुण्यनगरीचे चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बदलती संस्कृती, वाढत्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मराठी भाषेची सजगता वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी मराठी भाषेचे विविध पैलू, तिची प्रगल्भता आणि विश्वव्यापी स्वरूप याचे प्रभावी विवेचन केले. महाविद्यालयीन जीवनापासूनचा स्वतःचा प्रवास सांगताना मराठी भाषेबद्दलचे महत्त्व आणि ममत्व त्यांनी अधोरेखित केले.
राजेंद्र घोरपडे यांनी वाचकांच्या पत्रव्यवहारातून लेखक होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. ब्लॉग निर्मिती, पारंपरिक संत साहित्य आणि आधुनिक शेती यांची सांगड कशी घातली याचे अनुभव त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले.
समीर देशपांडे यांनी वडिलांचा प्रभाव आणि घरातील संस्कार यांमुळे लेखनाकडे कसे वळलो, घरात सापडलेल्या नोंदी आणि वडिलांसोबत ऐकलेल्या प्रसंगांमधून जिल्हा परिषद विषयक पुस्तकाचा प्रवास कसा घडला, हे त्यांनी स्पष्ट केले. अजरा येथील प्रतिभावंतांपासून ते कोरोना काळातील अनुभवांवर लिहिलेल्या पुस्तकांपर्यंतचा प्रवास आणि त्यासाठी मराठी शब्दकोशाचा कसा उपयोग झाला, हे त्यांनी ओघवत्या शैलीत मांडले.
विश्वास पाटील यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत कोल्हापूरातील सामाजिक परंपरा आणि चुकीच्या प्रथांवर वृत्तपत्रांतून लेखन करत ते पुस्तक स्वरूपात कसे आले, याचा आढावा घेतला. टोल आंदोलनातील बारकावे आणि त्या विषयावरील पुस्तकाचा लेखनप्रवासही त्यांनी सांगितला.
श्रीराम पचिंद्रे यांनी शालेय जीवनातील दीक्षित गुरुजींचा प्रभाव, कवितेपासून कथालेखनापर्यंतचा प्रवास आणि सामाजिक जीवनातील प्रसंग व चिंतन यावर आधारित लेखनाची दिशा स्पष्ट केली. अनेक पुस्तके लिहिताना समाजाशी नाते जपण्याचा प्रयत्न कसा केला, हे त्यांनी अधोरेखित केले.
श्रोत्यांनी सलग दोन तास उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन योगेश चिकोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयदीप मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी मधुरीमा चिकोडे, सचिन साळोखे, आशिष बामणे, कृष्णा आतवाडकर आणि निलेश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
