वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा…
कवी – संदीप जगताप
वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा...
मी लिहिलेल्या पुस्तकाला
एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा
या पेक्षा
वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा..
मला संमेलनात बोलवावं
पेपरात माझा फोटो यावा
टीव्हीवर मी दिसावा
या सगळ्यांपेक्षा..
पिक भर फुलाऱ्यात गेल्यावर
विहिरीने पाण्यासाठी तळ गाठू नये
बापाच्या डोळ्यातलं हिरवं स्वप्न
दुष्काळान फाटू नये
हीच धास्ती जास्त असते काळजात
कारण काल बापाआधीच पोरीनं आत्महत्या केली
तेंव्हापासून माझी कविता
आतून बाहेरून हादरली
कारण नुसत आभाळच फाटलं असं नाही
तर मातेसारखी माती सुद्धा
आमच्या वरती रुसली आहे
या देशातली अख्खी व्यवस्थाच
चिखलात जाऊन बसली आहे
त्यांनी गावं बुडवून धरणं बांधली
पाणी फायलीमध्ये गडप
यांनी समृद्धीसाठी रस्ते केले
त्यावर गिधाड्यांचीच झडप
कर्जमुक्तीच हिरवं कणीस
दाणं कुठं आहे...?
अच्छे दिनचे नुसतेच ढोल
गाणे कुठं आहे...?
मी लाभार्थी माझं सरकार
माझ्यावरतीच गोळ्या झाडतं
आश्वासनांचा रोज मुसळधार पाऊस
रान पाण्यासाठी जळतं
जाहीरातीतल्या पोरींसारख्या
योजना दिसतात देखण्या
मान अन् धनांच्या तुकड्यांसाठी
सत्ताधाऱ्यांच्या दारात लाळ घोटतात लेखन्या
टीआरपीचा खिसा भरून बातम्या
आत्महत्येचा टाहो फोडतात
टाळ्या मिळतील अशाच
साऱ्या संघटना भाषण झोडतात
जो तो उठतो
आमच्या टाळूवरंच लोणी खातो
शेतकरी मात्र वावरामध्ये
वावरासारखाच भेगाळत राहतो
म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत
आता खोल नांगरट घ्यावी लागेल
तेंव्हाच तुमच्या माझ्या आयुष्यातलं तन जाईल
अन् या नांगरटीला
मी तुमच्या पुढे
अन् माझी कविता माझ्या पुढे राहील
माझी कविता माझ्या पुढे राहील...
कवी - संदीप जगताप
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.