मुंबई कॉलिंग –
काँग्रसचे २४ नगरसेवक सत्तेचा मोह, अमिषे आणि आश्वासनांपासून किती काळ दूर राहतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत पंतप्रधानांच्या आसनासमोर घोषणा देऊन रणरागिणीचा अवतार दाखवला. आता मुंबईत काँग्रेस संघटनेला संजिवनी कधी देणार याची कार्यकर्ते वाट पाहात आहेत.
डॉ. सुकृत खांडेकर
ठाकरेंची शिवसेना आणि मोदी –शहांची भाजप यांच्याशी मुंबईत लढत देताना काँग्रेसची दमछाक होते आहे. ठाकरे बंधुंनी एकत्र येऊन विरोधी बाकांवर पुरेशी जागावर पुरेशी जागा तरी मिळवली. काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजनशी युती करूनही त्याचा अपेक्षित लाभ दोन्ही पक्षांना झाला नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेसची मुंबई महापालिकेत सर्वात खराब कामगिरी यंदाच्या निवडणुकीत बघयला मिळाली. महापालिकेच्या २२७ जागा वंचितशी युती करून लढवल्या तरी जेमतेम २४ जागांवर नगरसेवक निवडून आणताना काँग्रेसला घाम फुटला.
निवडणूक प्रचारात ठाकरे बंधुंचा व महायुतीचा ( भाजपा व शिंदेंची शिवसेना ) धुमधडाका चालू असताना काँग्रेस कुठे दिसत नव्हती. काँग्रेसच्या सभा नाहीत, जाहीर सभा नाहीत किंवा कुठे रोड शो झाले नाहीत. भाजपाच्या प्रचारासाठी विविध प्रांतांतील भाषिक नेते मुंबईत आले होते. पण काँग्रेसच्या प्रचारासाठी अन्य राज्यातून कुमक आली नाही किंवा काँग्रेसचे स्टार प्रचारकही फिरताना दिसले नाहीत. प्रचाराची आखणी आणि रणनिती यामधेही काँग्रेसची कुठे चमक दिसली नाही. राज्यावर व देशावर अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाची मुंबईत दयनिय अवस्था झाली आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे. त्यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे मुंबई काँग्रेसचे आघाडीचे नेते होते. पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष होते, खासदार होते व राज्यात मंत्रीही राहिले. स्वत: वर्षा गायकवाड या खासदार आहेत. आमदार व मंत्रीही होत्या. त्यांची बहिण डॉ. ज्योती गायकवाड या धारावीतून आमदार आहे. घरात राजकीय वारसा असताना व पक्षाने त्यांना व त्यांच्या परिवाराला भरपूर काही दिलेले असताना वर्षा गायकवाड पक्षाला यश मिळवून देण्यात असमर्थ का ठरल्या ? १९८५ साली ज्या शहरात काँग्रेसची स्थापना झाली, त्याच मुंबई शहरात काँग्रेस संकुचित आणि दुर्बल झाल्याचे बघायला मिळत आहे. पक्षाचे संघटन कमकुवत असल्याने मुंबईत काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे.
नऊ वर्षापूर्वी सन २०१७ मधे झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्याच निवडणुकीत स्वतंत्रपण लढलेल्या भाजपाचे ८२ आणि अविभाजित शिवसेनेचे ८४ नगरसेवक विजयी झाले होते. यंदाच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे ८९, ठाकरेंच्या शिवसेनेचे ६५, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९ त्यानंतर काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले. काँग्रेसचे संख्याबळ महापालिका निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर आले. काँग्रेसच्या अधोगतीला जबाबदार कोण आहे ? निवडणुकीतील दारूण पराभवानंतर वर्षा गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी पक्षातूनच मागणी झाली. त्या स्वत:हून राजीनामा देणर नाहीत , पक्ष त्यांना पद सोडायला सांगणार नाही आणि वर्षा गायकडवाड यांना हटवले तरी मुंबई काँग्रेसला सक्षम पर्याय देऊ शकेल असेल असे पर्यायी नेतृत्व तरी कोण आहे ?
काँग्रेस पक्षाने मुंबईत २२७ पैकी १५२ जागा लढविल्या. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजेंद्र गवई यांचा रिपब्लिकन पक्ष ( गवई ) यांच्याशी काँग्रेसने आघाडी केली होती. मुस्लिम, दलित व उत्तर भारतीय ही काँग्रेसची परंपरागत व्होट बँक गेल्या दहा वर्षात दुरावात चालली आहे. उत्तर भारतीय मतदारांना जपण्यासाठी काँग्रेसने ठाकरे बंधुबरोबर जाण्यास नकार दिला. पण त्याचा फारसा लाभ पक्षाला झाला नाही. अमराठी मते भाजपाकडे जातात हेच अनुभवायला मिळाले. मुस्लिम मतदारांना आता एमआयएम चा पर्याय मिळाल्याने ती मतेही काही अपवाद वगळता काँग्रेसला मिळाली नाहीत. उद्धव ठाकरे हे भाजपाला कठोर विरोध करीत असल्यामळे मुस्लिम मतदारांची पसंती लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला होती. आता बहुसंख्य मुस्लिम मतदार एमआयएमकडे झुकला असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतून प्रथमच मुस्लिम प्रबाल्य असलेल्या मतदारसंघातून एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत.
काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली असली तरी प्रचारात तसे दिसले नाही. वर्षा गायकवाड व प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त प्रचार सभा कुठे घेतली नाही किंवा दोन्ही ने्त्यांनी मिळून शहर व उपनगरात रोड शो केले नाहीत. प्रचारात दोन्ही नेते एकत्र दिसले असते तर त्याचा लाभ काँग्रेसला निश्चित झाला असता. काँग्रेस- वंचित व राष्ट्रीय समाज पक्षाला निवडून द्या असे कोणीही मतदारांना आवाहन करताना दिसले नाही. मग काँग्रेसने युती केली तरी कशाला ? गेली काही वर्षे मुंबई काँग्रेसला गटबाजाने पोखरले आहे. उमेदवार ठरवताना या गटबाजीचा फटका कार्यकर्त्याना बसतो. पक्षाच्या अध्यक्षाच्या विरोधात इतर सर्वजण असे चित्र गेली अनेक वर्ष आहे. पक्षाचे अन्य नेते पक्षाच्या अध्यक्षाला साथ देत नाहीत आणि अध्यक्षही त्यांना कोणाला विचारत घेत नाहीत, मग पक्ष वाढणार कसा ? सन २०२४ मधे झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवले होते पण तसे महापालिका निवडणुकीत झाले नाही. सन २००७ मधे झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ७१ नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या निवडणुकीत ५२ नगरसेवक विजयी झाले. २०१७ च्या निवडणुकीत ३१ तर २०२६ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २४ नगरसेवक महापालिकेत पोचले आहेत. उत्तर भारतीय, दाक्षिणात्य आणि मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावत चालला आहे.
वर्षा गायकवाड या पक्षाच्या प्रमुख असल्या तरी आमदार अमिन पटेल व अस्लम शेख या दोन नेत्यांनाच पक्षात महत्व आहे. त्यांच्या भरंवशावर पक्ष चालला आहे असे चित्र आहे. पक्षातील अनुभवी नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही, पक्षाच्या अध्यक्ष मुंबईत वॉर्डनिहाय भेटी देत नाहीत. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद नाही. त्यामुळे तळागाळात काय घडते हे नेतृत्वाला समजतच नाही. अनेक ठिकाणी ज्यांचे काम चांगले आहे, नेटवर्क उत्तम आहे, तिथे जागा वंचित किंवा जानकरांच्या पक्षाला सोडली. वंचितकडे उमेदवारच नाहीत म्हणून अनेक जागा त्यांनी काँग्रेसला परत केल्या. मग ऐनवेळी तरी काँग्रेस कुठून उमेदवार आणणार ? नेत्यांच्या घरातच तिकीटे दिली गेली अशी उदाहरणेही बरीच आहेत. अनेक जण त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे दुसऱ्या पक्षात गेले पण त्यांना दुसरीकडे जाण्यापासून कोणी रोखले नाही. पक्षाच्या अध्यक्षांनी स्वत:च्या घरातच दोन तिकीटे दिली मग अन्य नेत्यांना त्या कसे रोखू शकणार ? जागा वाटप करताना त्या वॉ्र्डातील परिस्थिती काय आहे याचा नीट अभ्यासही केला गेला नाही. २२७ पैकी २७ वॉर्डात काँग्रेसला उमेदवार सापडले नाहीत यापेक्षा दुर्दैव कोणते असू शकते ?
महायुती विरूध्द ठाकरे बंधू अशा घनघोर संघर्षात काँग्रेस पक्षाचे चोवीस नगरसेवक निवडून आले ही मोठी कामगिरी आहे असे काहींना वाटते. पक्षाच्या दहा उमेदवारांचा पराभव तर पाचशेपेक्षा कमी मतांनी झाला आहे. एमआयएमचा उदय ही तर काँग्रेसला धोक्याची घंटा आहे. राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून गेल्या दहा- बारा वर्षांत सर्व राजकीय पक्षांना फुटीचा धोका निर्माण झाला आहे. भाजपाकडे जाणे म्हणजे सत्तेच्या परिघात जाणे. कामे करून घ्यायची असतील व प्रशासनाकडून कोणताही त्रास नको असेल तर भाजपाकडे जाणे हा एकच मार्ग आहे. काँग्रसचे २४ नगरसेवक सत्तेचा मोह, अमिषे आणि आश्वासनांपासून किती काळ दूर राहतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत पंतप्रधानांच्या आसनासमोर घोषणा देऊन रणरागिणीचा अवतार दाखवला. आता मुंबईत काँग्रेस संघटनेला संजिवनी कधी देणार याची कार्यकर्ते वाट पाहात आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
