वस्ती करण्यास सुरुवात झाल्यानंतर, प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे मृत्यूदर घटला आणि लोकसंख्या वाढू लागली. मानव शेतीवर जास्त अवलंबून राहू लागला. यातून पाउस न पडणे, पिके नष्ट होणे, पिके शाकाहारी प्राण्यांनी खाऊन टाकणे, इत्यादी कारणांनी अन्नाची टंचाई भासू लागली. त्यातच आवडीचे पिक पुन्हा पुन्हा लावण्यात येऊ लागले. त्यामुळे एकाच पिकावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले. शेतीचाही, एकच पिक घेतल्याने कस कमी होऊ लागला. उत्पादन घटू लागले. यातून भीषण अन्न टंचाई निर्माण झाली. जमिनीवर मालकी निर्माण होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब अशा भेदाची सुरुवात झाली. सर्वांनाच सर्व कामे करता येत नव्हती. वेगवेगळी कामे करणारे हात तयार होऊ लागले. त्यातून वर्गव्यवस्था तयार झाली. जमीन, पाणी, संसाधने यावरून भांडणे होऊ लागली. यातून लुटमार आणि आक्रमणे वाढली.
डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
‘विचार करणारा, बुद्धीचा वापर करणारा मानव, टोळीचे किंवा आपल्या समुहाचे रक्षण करू शकतो. त्याचे सर्वांनी ऐकले पाहिजे’, हा मानवी इतिहासात अस्तित्वात आलेला, पहिला नियम होता. खरेतर, हा नियम अन्य प्राणीही पाळत होते. त्यातून अन्य प्राण्यांसारखेच मानवाचेही वर्तन होते. मात्र त्यानंतर ज्यावेळी मानवाने शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर समुहाला एकसंघ ठेवण्यासाठी आणखी नियम बनवण्याची गरज निर्माण झाली. मानवाने मुलत: संरक्षणासाठी एकत्र राहण्यास, टोळी बनवण्यास सुरुवात केली. अन्न मिळवताना शिकार करणे, हेही एकट्या-दुकट्याच्या जीवावर बेतणारे असायचे. त्यामुळे टोळी बनवून राहणे गरजेचे होते. अशा टोळ्या प्रामुख्याने गुहांमध्ये रहात. त्या निसर्गत: तयार झालेल्या असत. गुहेच्या आतमध्ये उन्हाळ्यात थंड, तर हिवाळ्यात उबदार वातावरण रहात असल्याने आपल्या टोळीला सामावून घेऊ शकेल अशी गुहा सापडली की, निवाऱ्याचा प्रश्न सुटत असे.
त्यानंतर मानवाने वस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कृत्रीम पद्धतीने निवारा तयार करण्याची गरज निर्माण झाली. हा निवारा दगड, झाडांच्या फांद्या, गवत इत्यादी वापरून करण्यात येत असे. अशा निवाऱ्यामध्ये संपूर्ण टोळीला एकत्र रहाणे शक्य नव्हते. त्यामुळे टोळीमध्ये काही लोकांसाठी निवारा, अशी रचना होत गेली. यामध्ये पूर्वीही अनेक टोळ्यांनी स्त्री-पुरूष आणि त्यांची मुले असा समुह एका आसऱ्यामध्ये अशी ती व्यवस्था बनवणे गरजेचे बनले. तशी ती विकसीत होत गेली. साधारण दोन ते तीन लाख वर्षांपूर्वीपासून दैनंदिन जीवनात ही व्यवस्था कमी-जास्त प्रमाणात टोळ्यांकडून पाळण्यात येत होते. त्यांच्या जगण्याला टोळी बाहेरून कोणी धोका निर्माण केला, तर त्यावर संपूर्ण टोळी हल्ला करत असे. मात्र अंतर्गत असा कोणी असेल, तर टोळीप्रमुख त्याला थेट टोळीतून काढून टाकत असे. एकट्याला जगणे, त्या काळात शक्य नव्हते. त्यामुळे सहसा कोणी अंतर्गत कुरघोड्या करण्याच्या नादाला लागत नसे.
शेती आणि वस्ती हे दोन्ही साधारण दहा हजार वर्षांपूर्वी सुरू झाले. मानवी इतिहासातील हा बदल अनेक समस्या निर्माण करणारा होता. तोपर्यंत मानवाने प्राणी पाळण्यास सुरुवात केली होती. प्राण्यांसमवेत तो रहात असे. अनेकदा निवाराही एकत्र असायचा. जनावरांना फिरण्यासाठी तशी मर्यादित बंधने असत. त्यातून रोगराईला निमंत्रण मिळू लागले. अनेक लोक एकाच ठिकाणी रहात असल्याने संसर्गजन्य रोग, प्राण्यांपासून मानवाकडे आजार येणे ही प्रमुख समस्या बनली. त्यातच स्वच्छतेचा अभाव असल्याने साथीचे रोग निर्माण होऊ लागले, पसरू लागले.
दुसरी समस्या निर्माण झाली ती अन्नटंचाईची. वस्ती करण्यास सुरुवात झाल्यानंतर, प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे मृत्यूदर घटला आणि लोकसंख्या वाढू लागली. मानव शेतीवर जास्त अवलंबून राहू लागला. यातून पाउस न पडणे, पिके नष्ट होणे, पिके शाकाहारी प्राण्यांनी खाऊन टाकणे, इत्यादी कारणांनी अन्नाची टंचाई भासू लागली. त्यातच आवडीचे पिक पुन्हा पुन्हा लावण्यात येऊ लागले. त्यामुळे एकाच पिकावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले. शेतीचाही, एकच पिक घेतल्याने कस कमी होऊ लागला. उत्पादन घटू लागले. यातून भीषण अन्न टंचाई निर्माण झाली. जमिनीवर मालकी निर्माण होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब अशा भेदाची सुरुवात झाली. सर्वांनाच सर्व कामे करता येत नव्हती. वेगवेगळी कामे करणारे हात तयार होऊ लागले. त्यातून वर्गव्यवस्था तयार झाली. जमीन, पाणी, संसाधने यावरून भांडणे होऊ लागली. यातून लुटमार आणि आक्रमणे वाढली.
या सर्व गोष्टींचे परिणाम त्या त्या टोळीतील ज्येष्ठांना जाणवत होते. दिसत होते. त्यांना शेतीतील कामे जमत नसली तरी, पूर्वीचा आणि आताचा काळ त्यांच्या डोळ्यासमोर येत होता. हे का घडत असावे, यावर ते विचार करत होते. मानव जात सुरक्षित ठेवायची असेल, तर त्याला हवे ते मिळायला हवे, यातून त्याने प्रयोग करायचे ठरवले. तोपर्यंत लेखन-वाचन प्रक्रिया सुरु झाली नव्हती. मात्र संवाद सुरु झाला होता. असाच एक प्रयोग म्हणून शेतीची जागा बदलली. जंगलातील झाडे तोडून नवी जागा तयार केली. नव्या जागेवर शेती केली, आणि ती पूर्वीसारखी पिकली. पुढच्या वर्षी हा प्रयोग अनेकांनी केला आणि निष्कर्ष तोच निघाला. यातून ‘शेतीची जागा दर दोन-तीन वर्षांनी बदलल्यास उत्पन्न चांगले मिळते’, हे लक्षात आले. हा खरे तर, शेतीबाबत वैज्ञानिक प्रयोग होता. मात्र तो शास्त्रीय पद्धतीने नव्हता. तरीही या प्रयोगातून मिळालेले ज्ञान मौखिक रुपात पुढच्या पिढीकडे दिले जात होते. शिकार, शेती, फळे आणि कंदमुळे काढण्याची कौशल्ये अशीच ज्ञान म्हणून हस्तांतरित होत होती.
याचबरोबर मानवाला शिकार करण्यासाठी जेवढे कष्ट पडत, त्यापेक्षा जास्त कष्ट शेतीमध्ये करावे लागत होते. मात्र स्थिरता आणि सरंक्षण या बाबीमुळे मानवाने वस्ती करून राहणेच पसंत केले. मात्र यातही कष्ट न करता सर्व काही मिळावे, अशी मानसिकता असणारे काही लोक होते. ते चोरी करणे, इतराना त्रास देणे अशा गोष्टी करत. त्यामुळे वाद निर्माण होऊ लागले. ते टाळण्यासाठी सभ्यता निर्माण होण्याची गरज भासू लागली. ज्येष्ठांनी यासाठी नियम बनवण्यास सुरुवात केली. इसवी सन पूर्व ३००० ते २००० या कालखंडात प्रथम असे नियम बनवण्यात आले. अर्थात हे नियम लिखित स्वरुपात नव्हते. त्यातून रूढी, प्रथा आणि परंपरा निर्माण झाल्या. ज्या विषयासाठी नियम नसत, तेथे वडीलधारी मंडळी निर्णय घेत असत.
पुढे लिहिण्याची पद्धती विकसित झाली आणि ‘कोड ऑफ हमुराबी’ हे इसवी सन पूर्व १७५४ मध्ये अस्तित्वात आले. बाबीलोन येथे तयार झालेला हा कायदा, सर्वाधिक प्राचीन लिखित कायदा मानला जातो. प्राचीन ग्रीकमध्ये ‘१२ तक्ते’, हा कायदा प्रसिद्ध होता. जगभर असे नियम अस्तित्वात आले. समाज सभ्य रहावा, समाजात शिस्त, न्याय आणि सुव्यवस्था राहण्यासाठी नियम बनवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला हे सर्व नियम परंपरेवर आधारित होते. पुढे ते लिखित स्वरूपात आले. अर्थात हे सर्व विचारातून आणि पूर्वानुभवावरून आले. ‘चिंतन’, यातील अविभाज्य घटक आहे. चिंतनातून प्राप्त ज्ञानाच्या आधारावर, हे सर्व घडत गेले. एकिकडे समाजव्यवस्थेचे आरोग्य ठीक रहावे, यासाठी जसे हे चिंतन सुरू होते, तसेच किंवा त्यापेक्षा जास्त चिंतन मानवाचे जीवन कमी कष्टाचे व्हावे, यासाठी होते. यातूनच समाजशास्त्रांची सुरुवात झाली. मात्र, विज्ञान सुरू होण्यासाठी आणखी खूप वेळ होता.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
