कोल्हापुरातील दसरा चौकात उभारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या शताब्दी वर्षाची आजपासून (१२ एप्रिल २०२६) सुरुवात होत असून, लोकवर्गणीतून उभ्या राहिलेल्या या स्मारकातून शंभर वर्षांपासून समता, शिक्षण आणि समाजपरिवर्तनाचा प्रेरणादायी विचार अखंडपणे प्रवाहित होत आहे. त्यानिमित्ताने…
वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक
कोल्हापुरातील दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे आजपासून (रविवार १२ एप्रिल २०२६ ) शताब्दी वर्ष सुरू होत आहे. लोकवर्गणीतून उभा करण्यात आलेला हा कोल्हापुरातील पहिला पुतळा स्मारक रूपाने उभा करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर कोल्हापुरात नर्सरी बागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी समाधी स्थळ बांधण्यात यावे, अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची इच्छा होती. त्यानुसार कोल्हापूरच्या शाहू समाधी स्थळ पूर्ण केले आहे. त्याला जवळपास शंभर वर्षे जावी लागली हे दुर्दैवाने येथे नोंद करावे लागते. शाहू महाराज यांच्या निर्णयानंतर त्यांचे जेष्ठ सुपुत्र आणि कोल्हापूर संस्थानाचे अधिपती छत्रपती राजाराम महाराज यांनी ऐतिहासिक अशा दसरा चौकात त्यांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला. हा पुतळा उभा करण्यामागे त्यांचे स्मारक रूपाने सातत्याने स्मरण व्हावे, अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. या स्मारकाची उभारणी लोकसभागातून व्हावी, अशी कल्पना शंभर वर्षांपूर्वी छत्रपती राजाराम महाराज यांनी व्यक्त केली आणि त्याला कोल्हापूरकरच्या जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या संस्थानाला हा पुतळा उभा करणे अशक्य नव्हते. त्यासाठी निधी देणे देखील अशक्य नव्हते. मात्र लोकांचा सहभाग असावा असा विचार समोर आल्याने छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानातील जनतेला आवाहन केले आणि जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या लोकवर्गणीतून शंभर वर्षांपूर्वी एक लाख ४० हजार रुपये जमा झाले.
दसरा चौकातराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक रुपी पुतळ्याच्या उभारणीची सुरुवात झाली. तत्पूर्वी कोल्हापूर संस्थानाचे दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी मराठी आणि इंग्रजी मधून शाहू महाराजांचे चरित्र लिहिले होते. त्याचे प्रकाशन देखील हा पुतळा उभा करण्यापूर्वीच झाले होते. अशा प्रकारे चरित्रात्मक तोही खरा इतिहास लिहिला जावा, अशी इच्छा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीच व्यक्त केली होती आणि त्यासाठी अण्णासाहेब लठ्ठे यांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे उच्चविद्याभूषित अण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू चरित्र लिहून एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी केली.
छत्रपती राजाराम महाराज आणि कोल्हापूरच्या जनतेने घेतलेल्या निर्णयानुसार दसरा चौकात पुतळा उभा करण्यासाठी मुंबईचे विख्यात शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांना हे काम देण्यात आले. सुमारे दोन वर्षाच्या त्यांच्या कलाकुसरीतून हा सुंदर पुतळा तयार झाला. या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी समारंभ आयोजित करण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते व्हावे, अशी इच्छा छत्रपती राजाराम महाराजांची होती. त्यानुसार मुंबईच्या गव्हर्नर यांनी तीन दिवसाचा कोल्हापूर दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर मोठ्या उत्साहाने सजले होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा खास रेल्वेने मुंबईहून कोल्हापूरला आणण्यात आला. हा पुतळा आल्यानंतर रेल्वे स्थानक ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळेला लोक भावना अशी होती की, ज्या रेल्वेचा विस्तार करून कोल्हापूरला रेल्वेच्या नकाशावर आणले होते त्याच स्थानकावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आगमन झाले आहे. या लोकभावने बरोबरच कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या पुतळा रुपी स्मारकाचा अनावरण कार्यक्रम हा लोकोत्सव ठरला होता. १२ एप्रिल १९२७ रोजी या पुतळ्याची समारंभ उभारणी केली आणि त्याचे अनावरण गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते पार पडले.
लोभाचा महापूर
लोकांच्या प्रति राज्यकारभार चालवणारे, समाज परिवर्तनाचा आदर्श घालून देणारे आणि बहुजन समाजाला विकासाच्या मार्गावर आणणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा अनावरणाच्या लोकोत्सवाचा कार्यक्रम पाहून गव्हर्नर विल्सन हे भारावून गेले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर असलेल्या लोकांच्या लोभाचा महापूर पाहायला त्यांना मिळाला. लोकवर्गणीतून जमलेल्या पैशातून ७५ हजार रुपये हा पुतळा बसवण्यास खर्च आला. उर्वरित रक्कम संस्थांच्या तिजोरीमध्ये जमा न करता त्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडेच ठेवण्यात आली. त्या पैशातून शेतकऱ्यांसाठी शेतकी शाळा बांधण्याचा निर्णय छत्रपती राजाराम महाराज यांनी घेतला आणि त्याला कोल्हापूरच्या जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी स्वराज्य स्थापन केले होते, असे स्वराज्य स्थापन करणारे अखंड भारतातील ते एकमेव राजे होते. त्याच विचाराने कोल्हापूर संस्थांचा कारभार पाहताना शाहू महाराज यांनी अनेक गोष्टी रयतेच्या उन्नतीसाठी केल्या. तीच विचारधारा समोर ठेवून आणि त्यांचाच वारसा चालवणारे छत्रपती राजाराम महाराज यांनी शाहू विचार कोल्हापुरात रुजवण्यासाठी ही शेतकी शाळा बांधण्याचा निर्णय घेतला. सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय ज्या इमारतीमध्ये कार्यरत आहे तीच शेतकी शाळेची इमारत होय.
संस्थान रूपाने मिळालेली राजकीय सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते हा विचार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आयुष्यभर जपला. तोच वारसा छत्रपती राजाराम महाराज यांनी देखील त्यांच्या नंतर अमलात आणला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी जी जी कामे सुरू केली होती ती सर्व पूर्णत्वास नेण्यासाठी छत्रपती राजाराम महाराज यांनी आखणी केली. औद्योगिक विकास व्हावा, यासाठी आईसाहेब महाराज उर्फ लक्ष्मीबाई महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लक्ष्मीपुरीची स्थापना केली होती त्यांच्या पुतळा अनावरणाच्या समारंभातच्यावेळी विद्यमान शाहूपुरी ते लक्ष्मीपुरी हा मार्ग जोडण्यासाठी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली. गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या आगमना प्रित्यर्थ बांधलेल्या या पुलाचे नंतरच्या काळात विल्सन ब्रिज असे नाव रूपाला आले. या पुलाचे देखील त्याचवेळी उद्घाटन करण्यात आले. ही लक्ष्मीपुरी व्यापारी संकुल उभारणारी वसाहत उभारण्याची पायाभरणी शाहू महाराजांनी केली होती.
शाहू विचारांची शताब्दी
दसरा चौक ते आईसाहेबांचा पुतळा असलेल्या चौकापर्यंत हा सर्व मार्ग एका सरळ रेषेत जोडला गेला. या सर्व घटना घटित होत्या त्याला आता शंभर वर्षे होत आहेत. ही एक प्रकारे कोल्हापुरातील शाहू विचारांची शताब्दी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक रूपाने कोल्हापुरात उभारण्यात आलेल्या हा पहिला पुतळा आहे. त्यानंतर याच विचाराने कोल्हापूरच्या अनेक नेत्यांनी, समाज सुधारकांनी आणि विविध चळवळी करणाऱ्या जनतेने कोल्हापुरात अनेक पुतळे उभे केले. हे पुतळे उभे करताना लोकवर्गणी जमा करण्यात आली. बिंदू चौकात उभारण्यात आलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, त्या पुतळ्याच्या शेजारी उभारलेला महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा, शिवाजी विद्यापीठामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर उभारलेला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा अशी अनेक उदाहरणे देता येतील.
लोक चळवळ
महाराष्ट्राला शाहू महाराज यांच्या रूपाने जो विचार मिळाला तो कायम जपण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या जनतेने केला. त्याचा अभिमान बाळगला आणि तो विचार सतत सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत राहील यासाठी प्रयत्न देखील केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानातील जनतेचा सर्वांगीण विकास होईल यासाठी जे जे करावे लागेल ते आयुष्यभर केले. आपली जनता साक्षर झाली पाहिजे यासाठी त्यांनी शिक्षणाचा पाया घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. अनेक शाळा काढल्या. अनेक वसतिगृहे स्थापन केली. अनेक शिक्षकांच्या पिढ्या तयार केल्या. शिवाय बहुजन समाजातील अनेक मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यासाठी मदत केली. त्यातून एक नवी पिढी उदयास आली.
हे करीत असताना कोल्हापूर संस्थानाच्या बाहेर जे जे लोक भेटले. त्यांची मदत घेतली. त्यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाच्या दरबारी मोठी पदे दिली. त्यांना कामे नेमून दिली. त्यातूनच शिक्षण, सहकार, शेतीविकास, व्यापार वृद्धी, उद्योगाची भरारी, क्रीडा क्षेत्राची सुरुवात, कला आणि संगीत यांचा पाया घालण्यात आला. शिवाय धार्मिक रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी धर्म परिवर्तनाचे कार्य देखील त्यांनी केले. त्यासाठी खास शिक्षण देऊन नव्या पुरोहित वर्गाची निर्मिती केली. हे सर्व करीत असताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागला. प्रस्थापित आणि परिवर्तनास विरोध करणाऱ्यांच्या विरूद्ध संघर्ष तीव्र स्वरूपात द्यावा लागला. हा संघर्ष करीत असताना काही वेळा त्यांना आपला प्राण देखील पणास लावावे लागले.
अनेक वेळा कोल्हापूर संस्थानाच्या विरोधात खोट्या-नाट्या तक्रारी देखील तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेकडे करण्यापर्यंत सनातनी लोकांनी मजल मारली होती. आपल्या संस्थानातील जनतेच्या प्रति प्रामाणिक राहणाऱ्या तसेच त्यांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विविध थरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. बारा बलुतेदारांना त्यांनी एकत्र केले. भटक्या विमुक्ताना त्यांनी मदत केली. दलित पददलित, इतर मागास समाज, बहुजन समाज या साऱ्यांना त्यांनी जवळ घेतले. परिणामी संपूर्ण समाज परिवर्तित होतो आहे याची लक्षणे दिसू लागल्यानंतर शाहू विचार हा लोक विचार झाला आणि ती लोक चळवळ देखील बनली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या निधनाला काही वर्षांपूर्वी शंभर वर्षे झाली. कोल्हापूरच्या जनतेने तसेच महाराष्ट्रातील आणि देशातील परिवर्तनाच्या विचारावर आढळ विश्वास असणाऱ्या जनतेने शाहू विचाराचा जागर यानिमित्ताने केला. त्या सर्व विचार जागराचे प्रतीक किंबहुना प्राथमिक स्वरूप दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य दिव्य पुतळ्यातून गेली शंभर वर्ष व्यक्त होत आहे. ही स्फूर्ती घेऊनच आजवर महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, समाज सुधारक ज्योतिराव फुले आणि ज्यांना आधुनिक भारतातील दलित उपेक्षित समाजाचे पुढारी म्हणून पुढे आणले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची वाट मोकळी करून दिली. वर्ण वर्चस्वादी जात व्यवस्थेला कडाडून विरोध करीत समतेचा विचार मांडण्यासाठी जे जे काही करता येईल. त्याची पायाभरणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी घातली. त्याचबरोबर लक्ष्मीपुरी किंवा जयसिंगपूर सारखी व्यापारी वसाहत स्थापन करून तसेच कॉटन मिलची स्थापना करून औद्योगीकरणाची पायाभरणी देखील त्यांनी आपल्या कार्यकर्दीत केली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी युरोप सारखा खंडात औद्योगीकरणाच्या मार्गाने वेगाने बदलत होता. त्या बदलत्या काळाची दखल घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये उद्योग उभे करायला सुरुवात केली होती. हा एक प्रकारे जागतिकीकरणाचा मार्गच त्यांनी स्वीकारला होता. स्वतंत्र भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारून जागतिकीकरणाची वाट धरली असे म्हटले जाते. मात्र जगभरातील बदलाची दखलशाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी घेऊन औद्योगिक वसाहती स्थापन करणे, व्यापारी पेठा उभारणे, धरणे बांधणे, शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रांचा विकास करणे तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे अशी धोरणे त्या काळात घेऊन एक प्रकारे कोल्हापूर संस्थांनाला जगाच्या बदलत्या धोरणाशी जोडून घेतले होते.
ते एक प्रकारे कोल्हापूर संस्थांनाचे जागतिकरणच होते. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कुस्तीला प्रोत्साहन देत असताना खासबाग मैदान सारखे कुस्तीसाठी देशातील पहिले स्टेडियम उभारण्याची कल्पना देखील ही जगाबरोबर वाटचाल करण्याचीच पायरी होती. वेगवेगळ्या प्रकारची पीक पद्धती विकसित करण्यासाठी उचललेली पावले देखील ही त्याचीच नांदी होती. धरण बांधून त्यात साठलेले पाणी प्रामुख्याने शेतीच्या विकासासाठी वापरणे. शेती बारमाही करणे हा विचार देखील ज्या काळात समोर आला त्याच वेळी राधानगरीला धरण बांधण्याचा प्रारंभ देखील त्यांनी केला.
पायाभूत सुविधा
नव्या बदलाचा वेध घेण्याची ही विचारसरणी होती. त्यामुळेच आज देखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासंदर्भातील मूलभूत विचार जो आहे तो कधीच कालबाह्य होत नाही. नवी आव्हाने वेगळी असतील, नव्या समस्या वेगळ्या असतील किंवा अनेक गरजा नव्याने निर्माण झाल्या असतील. पण मार्ग तोच आहे. पायाभूत सुविधा उभा करणे. नव्या गरजांची पूर्तता करणे, नव्या समस्यांची सोडवणूक करणे यासाठी शाहू महाराजांनी सर्वांगीण विचार केला. त्याच मार्गाने आज देखील जावे लागते. रस्ते बांधणी, औद्योगीकरण करणे, रेल्वे मार्गाची उभारणी करणे, हवाई वाहतूक सुधारणे, पाण्याची सोय करणे, शेतीचा विकास करणे आणि सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणे तसेच शिक्षणाची वाट धरून स्वतःचा विकास करणे ही सर्व कामे आजही आपण करीत आहोत. जी शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सुरू केली होती. म्हणूनच त्यांच्या दसरा चौकातील पुतळा रुपी स्मारकाकडे पाहताना ती भव्य दिव्य दृष्टी आपल्याला आजही दिसते आहे.
कोल्हापुरातील या पहिल्या पुतळ्याचे यासाठीच शताब्दी वर्षानिमित्त स्मरण करणे महत्त्वाचे ठरते. शाहू महाराज यांच्या विचाराने आजही महाराष्ट्र मार्गक्रमण करतो आहे असे राज्यकर्त्यांना वारंवार सांगावे लागते. हीच ती विचारातील ताकद आहे आणि त्याचा स्रोत त्यांच्या स्मारक रुपी पुतळ्यातून आपल्याला मिळतो आहे. त्यामुळे तो केवळ एक पुतळा उभा करणे याचा अर्थ एक वास्तू किंवा एक शिल्प उभारणे एवढ्या पुरताच त्याचा अर्थ नाही. ज्या काळामध्ये भारतात पुतळे उभा करण्याची पद्धत रूढ झाली नव्हती. त्याकाळी छत्रपती राजाराम महाराज यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक आपल्याला दिले त्याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण जनतेला आपला राजा हा लोकराजा आहे. लोकांच्या हिताचा विचार करणारा राजा आहे. ही भावना त्याकाळी प्रभावी होती आणि आजही तितकीच ती प्रभावी आहे. मार्गदर्शक आहे. समाजाचा सर्वांगीण विचार करणारा आहे. ते एक भारतीय समाजाच्या विकासाचे मॉडेल आहे. हे आपण जाणले पाहिजे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
