कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे गुरुवारी ( ता. १८ सप्टेंबर ) निधन झाले. शिवाजीराव कदम हे मुळचे कदमवाडी भोसलेवाडी येथील शेतकरी. बालपणापासूनच त्यांचा निसर्ग, शेती आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचं लग्न शेतकरी कामगार पक्षाचे नेते केशवराव जगदाळे ह्यांचा मुलीशी झालं होत.
शिवाजीराव शेतकरी कामगार पक्षाचे जुने कार्यकर्ते. १९६७ साली कोल्हापूर नगर परिषद येथे निवडून आले. त्या निवडणुकीत शेकाप व समाजवादी पक्षाची युती होती. ते आमचे पुरस्कृत उमेदवार होते. रवींद्र सबनीस समाजवादी पक्षाचे नेते होते. ते आणि आम्ही कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. त्या काळात शेतकरी कामगार पक्षाचा कोल्हापुरात मोठा दबदबा होता. शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर शहरातही कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क होते.
नगर परिषदेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे ७ नगरसेवक निवडून आले होते, त्यामध्ये प्रमुख उर्मिलाकाकी सबनीस व अॅड. अविनाश अडके व शिवाजीराव कदम यांचा समावेश होता. नगरपरिषद व महापालिकेत ते निवडून येत होते. ते डाव्या विचारसरणीचे असल्याने व या विचाराचे ते काम करत असल्याने त्यांचा आणि माझा त्या निवडणुकीपासूनच जवळचे संबंध प्रस्तापित झाले.
महापालिकेत मी नोकरी करत असल्यामुळे मी निवडणुक लढविण्याचा विचार केला नाही. पण अलीकडेच ते आणि मी कोल्हापूर शेतकरी संघाची निवडणूक एकत्र लढलो. त्यात आमचे पॅनल निवडून आले. संघातील अनेक नियम बाह्यकृतींना आमचा कडाडून विरोध होता. राजश्री शाहू कॉलेज, तसेच कोल्हापूर बाल कल्याण संस्थेमध्ये आम्ही एकत्र काम केले. सामाजिक बांधिलकीतून त्यांनी समाजकारण राजकारण केले. डाव्या चळवळीतील नेता आपल्यातून निघून गेला. त्यांची उणीव सगळ्यांना जाणवणार. त्यांना झोपडपट्टीवासिय, कष्टकरी कामगार व शेतमजूर चळवळीच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.
– साथी व्यंकाप्पा भोसले, दलितमित्र, कोल्हापूर.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका