मुंबई कॉलिंग
वैमानिकाच्या भूमिकेबद्दलही रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. विमानात अतिरिक्त इंधन भरण्याची मुळात गरजच काय होती ? तपास यंत्रणांनी कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष चौकशी करावी… ब्लॅकबॉक्सची तपासणी करण्यासाठी तो विदेशात पाठविण्यात येणार असेल तर इथे कागदपत्रात व नोंदीत फेरफार करण्याची संबंधितांना आणखी संधी व वेळ मिळू शकेल अशीही त्यांनी भिती व्यक्त केली.
डॉ. सुकृत खांडेकर
अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यु होऊन तीन आठवडे उलटले तरी प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त झालेला नाही. २८ जानेवारी रोजी सकाळी बारामती येथे व्हीसीआर कंपनीचे लेअरजेट ४५ हे विमान कोसळून झालेल्या अपघातात अजित पवार, वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अजितदादांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि विमान परिचारीका पिंकी माळी यांचा मृत्यु झाला. अजितदादांचे पुतणे व शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या चौकशीला विलंब होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून विमान कंपनीच्या मालकांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. अपघात नव्हे तर घातपात असल्याचाही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
रोहित पवार हे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत. विमान अपघातात अजितदादांचा मृत्यु झा्ल्यापासून ते सातत्याने संशय व्यक्त करीत आहेत. अजितदादांच्या मृत्युमागे कोण आहे, याचा छडा लावण्यासाठी ते बारीक सारीक पुरावे जमा करीत आहेत. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर थेट निशाणा साधलेला नसला तरी चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्यात यावा, श्वेतासिंह यांना डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल ए’व्हिएशनमधून हटवावे व व्हिव्हीआयपींना विमान सेवा देणाऱ्या व्हीसीआर कंपनीवर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचे अगोदरच जाहीर केले होते, पण आदल्या दिवशीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विमान अपघाताची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात यावी अशी मागणी केली. अजितदादांचा मृत्यु झाल्यावर सारा महाराष्ट्र हळहळला होता. सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ब’नर्जी यांनी विमान अपघाताविषयी संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी भाजपाने ममता यांची मागणी धुडकावून लावताना राजकारण करू नये असे बजावले होते. आता अजित पवार यांच्या पक्षाचे प्रमुख नेतेच त्यांच्या मृत्युनंतर तीन आठवड्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहेत.
२ सप्टेंबर २००९ रोजी आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर राजशेखर रेड्डी यांचा विमान अपघातात मृत्यु झाला होता. तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांनी एक आठवड्याच्या आतच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआय चौकशीचा अहवाल तीन वर्षांनी प्राप्त झाला तेव्हा रेड्डी यांचा मृत्यु हा अपघाती झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
विमान अपघातात अजितजदादांचा मृत्यु झाला या घटनेला तीन आठवडे झाले तरी चौकशी पुढे का सरकत नाही ? विमानाची वेळ व वैमानिक ऐनवेळी का बदलण्यात आले ? वैमानिक सुमीत कपूर हा मद्यप्राशन करायचा हे ठाऊक नव्हते का ? विमान मुद्दाम आदळण्यात आले का ? अपघातात विमानातील कागद जळाले नाहीत मग तीव्र उष्णतेने ब्ल’कबॉक्स कसा जळून खराब होतो ? विमानाचे रजिस्ट्रेशन संशायस्पद आहे का ? विमानाचे उड्डाणच नियमानुसार झाले नाही का ? विमानाची उड्डाण क्षमता संपायला केवळ ८५ तास शिल्लक असताना ते अजितदादांसारख्या व्हिव्हीआयपींना का देण्यात आले ? कंपनीचे मालक असलेल्या सिंग पितापुत्रांशी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांचे जवळचे संबंध आहेत, म्हणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होतो आहे का ?
वैमानिकाच्या भूमिकेबद्दलही रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. विमानात अतिरिक्त इंधन भरण्याची मुळात गरजच काय होती ? तपास यंत्रणांनी कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष चौकशी करावी… ब्लॅकबॉक्सची तपासणी करण्यासाठी तो विदेशात पाठविण्यात येणार असेल तर इथे कागदपत्रात व नोंदीत फेरफार करण्याची संबंधितांना आणखी संधी व वेळ मिळू शकेल अशीही त्यांनी भिती व्यक्त केली.
अजितदादांच्या मृत्युचे गूढ उकलावे म्हणून आपण सत्तेच्या परिघातील मोठ्या दिग्गजांना जाब विचारत आहात, आपल्याला भिती वाटत नाही का ? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले- मला नाही पण माझ्या कुटुंबियांना भिती वाटते. ही घटना घडवायला जे कोण मोठे लोक जबाबदार असतील त्यांना मी अंगावर घेतो आहे, अशा वेळी मी लढणार नाही तर कोण ? मी मराठी स्वाभिमानी माणूस आहे…
अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण म्हणजे सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, रोहित पवारांनी हे धंदे बंद करावेत असे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांना डिवचले आहे. डीजीसीएला पत्र लिहून संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे, चौकशीतून सर्व तथ्य बाहेर येईलच. मात्र दु:खाच्या काळात आधार देण्याऐवजी काही लोक जाणीवपूर्वक बुध्दीभेद करीत असल्याची टीका विखेपाटील यांनी केली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
