May 14, 2026
Ashadi Ekdashi Special article
Home » कानडा राजा पंढरीचा !
मुक्त संवाद

कानडा राजा पंढरीचा !

कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे. हा भक्ती योगाचा सिध्दांत संतांनी जगापुढे मांडला आहे.

सौ पुष्पाताई सुनिलराव वरखेडकर,
पर्यवेक्षिका पी डी कंन्या शाळा वरूड

आज आषाढी एकादशी यालाच देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला भक्त वारकरी बहुसंख्येने विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता पंढरपूरला जातात. महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पांडुरंग
विठ्ठल टाळ नामाच्या गजरात
अवघी दुमदुमली पंढरी
हे दृश्य म्हणजे स्वर्गीचा सुखद सोहळा !
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी !
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा तेथे !
मनात भक्तीच्या बीजाचे रोपण झाल्यावर भक्तीचा मळा फुलून येतो. त्याचे प्रात्यक्षिक म्हणजे पंढरपूरची यात्रा.
“अबीर गुलाल” या रंगाची उधळण व नामघोष करून पंढरपूरला वारकरी भक्ती रसात न्हाऊन निघतात. प्रपंचाच्या तापाने होरपळून निघालेला हा भक्त आनंदाचा अनुभव घेतो. या दिनाच्या सोयऱ्याला आपली गाऱ्हाणी सांगून लोटांगण घालतात .हा अनुपम्य सोहळा पाहण्याचे सुख अनुभवतात.
हा दिनाचा सोयरा भक्त पुंडलिकाची भक्ती पाहून अठ्ठावीस युगे उभा आहे. माता-पित्याची सेवेत धन्य झाला. व भक्ताच्या हाकेला धावून आला. माता पित्याची सेवा ही कर्म पूजा होय. याला पांडुरंगाने अग्रस्थान दिले.

आपले कर्म म्हणजेच ईश्वराकडे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग होय
मातृदेवो भव!! पितृ देवो भव!
ही संस्कृती जपणे म्हणजे मानवाची युती कर्तव्यता व श्रेष्ठ कर्म होय. ही पांडुरंगाच्या दर्शनाची साक्ष होय. या पांडुरंगाने कर्मयोग भक्तीयोग जगाला दाखवून दिला. विठ्ठलभक्त श्री संत सावता माळी यांनी सुद्धा
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
यातून कर्मयोगाची साक्ष दिली. व प्रत्यक्ष पांडुरंग सावत्याच्या हृदयात प्रगटला.

महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत जन्माला आले दरवर्षी पंढरपूरची पायीवारी करणारे भक्त संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरा कुंभार, सावता माळी, चोखोबा, जनाबाई, सखुबाई ही संतांची मांदियाळीत पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पावन होत असत.

या सर्वांनी कर्म सिद्धांत मांडला. प्रत्येक संतांनी आपल्या कर्माला प्राधान्य दिले आहे. धर्म, अर्थ, काम मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहे.त्यानुसार निसर्गाने बहाल केलेला जो धर्म आहे त्यानुसार वागून प्रपंच, गृहस्थाश्रम घालण्याकरिता अर्थाची गरज आहे. अर्थ प्राप्ती करणे म्हणजेच पर्यायाने कर्म करणे आवश्यक आहे.

संतांनी आपल्या कृतीतून कर्म प्रधानता जगापुढे मांडली आहे व कर्म जर केले नाही तर शरीर निर्वाह चालणार नाही. व मोक्ष सिद्धांत देखील जगापुढे मांडला . आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या माणसांनी करमात अकर्म पहावे. म्हणजे ईश्वराला शरण जाऊन सर्व कर्म ईश्वरा अर्पण करावे व जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होण्याकरिता ईश्वर भक्तीचे महत्त्व विशद केले.

पांडुरंग, विठ्ठल, कृष्ण, हरी, गोविंद ,विष्णू ही अनेक रूपे ईश्वराची आहे .तो ईश्वर निर्गुण निराकार आहे पण भक्तांच्या हाकेसाठी तो आपले वेगवेगळे रूप धारण करून भक्तांच्या हाकेला धावत येतो.

जो मी पणा विसरून आपली भक्ती समर्पण करतो. त्याचा पांडुरंग निर्वाह चालवितो. पण त्या अनन्यता हवी महाराष्ट्राचे दैवत असलेला पांडुरंग विठ्ठल भक्ताच्या हाकेला धावून गेला. कबीरा घरी शेले विनू लागला. जनाबाई संगे दळण दळू लागला. चोखोबाची गुरे त्यांनी राखली. नामदेवाचा हट्ट त्यांनी पुरविला. गोऱ्या कुंभाराला मडकी घडू लागला. त्यांच्या दर्शनाची आर्त पुरविली.

भगवद्गगीतेत भक्ताचे चार प्रकार सांगितले आहे . अर्थाथी जिज्ञासू व ज्ञानी या संत मंडळीची आर्त भक्ती होती. त्यांना दर्शनाची आस होती. ती आर्थता पाहून विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले. संकटात धावून येणारा सखा, मायबाप, श्रीहरी, अनाथाचा नाथ, जगजेठी, विश्वंभर, कृपावंत, विश्वाचा सूत्रधार, विश्वचालक, नियंता, सूत्रधार अनेक नावांनी हाक मारून आपल्या अभंगातून, भजनातून, काव्यातून आळविले व आपली भक्ती प्रगट केली. वारकरी संप्रदायांमध्ये जातीभेद, वर्णभेदाला प्राधान्य नाही.

अठरापगड जाती स्त्री पुरुष, सानथोर या सर्वांचा समावेश म्हणजे वारकरी संप्रदाय होय. निर्गुण निराकार भक्ती करणे कष्टप्रद आहे. त्या साधने कष्ट जास्त आहे. म्हणून हा पांडुरंग विठ्ठल आपले सावयव, सगुण रूप धारण केले व भक्तीची वाट सोपी करून दिली.

कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे. हा भक्ती योगाचा सिध्दांत संतांनी जगापुढे मांडला आहे. जरी कर्म स्वातंत्र्य असले तरी मनुष्य

“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”
याप्रमाणे या विश्वात एक अनामिक शक्तीचे नियमन नियंत्रण आहे. सर्वांच्या शरीरात एक चैतन्य शक्ती वास करते. त्याशिवाय शरीराचे हलन चलन होत नाही. मनुष्याच्या प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. परंतु ईश्वर सर्व शक्तिमान आहे. पुर्णपणे समर्पण शरणागती पत्करलया शिवाय ईश्वराची प्रचिती येत नाही.
नम्र झाले भुता..तेने कोंडियले अनंता.

या संत मंडळीने पांडुरंगा चरणी आपला संसार वाहिला.सर्वस्व पांडुरंग चरणी समर्पण केले तेव्हाच त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाचा साक्षात्कार झाला.

असा हा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला
कसा विटेवरी उभय ठेविले
हात कटेवर जणू पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा

सर्व शक्तिमान आहे. पूर्णपणे समर्पण शरणांगती पत्करल्याशिवाय ईश्वराची प्रचीती येत नाही.
नम्र झाले भूता तेने कोंडियेले अनंता!

या संत मंडळींनी पांडुरंग चरणी आपला संसार वाहिला. सर्वस्व त्याला मानले. त्यांचा अहंकार नष्ट झाला सर्वस्व पांडुरंग चरणी समर्पण केले तेव्हाच त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाचा साक्षात्कार झाला.

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रगटला कसा विटेवर
उभा ठेवूनी हात कटेवर
पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मुलांमध्ये नवचैतन्य जागवणाऱ्या कथा

कोकणची इरसाल माणसं…

ग्रामसंस्कृतीची पूरक ऊर्जा: गाव कवेत घेतांना

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!