March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Bali island Nyepi Day silent streets and empty roads during Hindu New Year celebration
Home » निर्मनुष्य नववर्षाचा अद्भुत सण : बालीतील ‘नेपी डे’ जगाला देतो शांततेचा संदेश
पर्यटन

निर्मनुष्य नववर्षाचा अद्भुत सण : बालीतील ‘नेपी डे’ जगाला देतो शांततेचा संदेश

नवीन वर्षदिन ‘निर्मनुष्य दिन’

बालीमध्ये नवीन वर्ष मार्च-एप्रिलपासून सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. या दिवसाची खासियत म्हणजे हा दिवस त्यांचा शांतता दिन असतो. या दिवशी सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येतात. वैद्यकीय आणीबाणी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नाही. सर्व दुकाने बंद राहतात. रस्ते, मॉल निर्मनुष्य असतात…

जयप्रकाश प्रधान, ज्येष्ठ पत्रकार अन् जगप्रवासी

गुढी पाडवा नुकताच साजरा झाला. तो हिंदू धर्मातील नववर्षदिन म्हणून आपल्याकडे पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी हिंदू धर्मीय मोठ्या संख्येने जमा होतात. मिरवणूका काढल्या जातात. रांगोळ्या काढल्या जातात. पण इंडोनेशियातील बाली येथील हिंदू समाज मात्र हा दिवस प्रदूषण, रोगराई यांच्यावर मात करण्यासाठी निर्मनुष्य दिन म्हणून पाळतो. ही परंपरा तेथे फार पूर्वीपासून सुरू आहे. बालीच्या आठवड्याच्या मुक्कामात त्याची माहिती हिंदू धर्मीयांकडूनच करून घेता आली.

इंडोनेशिया हे मुस्लीम राष्ट्र. पण बालीमध्ये जवळजवळ शंभर टक्के हिंदू. अर्थात् अन्य राष्ट्र व बाली यांच्यात कोणताही तणाव नाही. बालीतील हिंदू बांधव नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतात. आजच्या काळात साऱ्या जगानेच त्याचे अनुकरण करावे अशी ही प्रथा आहे. तेथील हिंदू कॅलेंडरला ‘साक’ म्हणतात. त्यांचं नवीन वर्ष मार्च – एप्रिलपासून सुरू होतं. तो दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. वाईट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा म्हणून नवीन वर्षाच्या आधल्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. पण ‘नेपी डे’ हा शांतता दिन असतो. त्या दिवशी काही बंधनांची अंमलबजावणी संपूर्ण बालीमध्ये अत्यंत काटेकोरपणे केली जाते. प्रत्येकजण प्रामाणिकपणे ते नियम पाळतो. त्या दिवशी सर्व बाली बेटाला सुट्टी असते. पण ती मौजमस्ती करण्यासाठी नसते. या दिवशी सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येतात. वैद्यकीय आणीबाणी वगळता एकही वाहन रस्त्यावर दिसत नाही. सर्व दुकाने बंद राहतात. रस्ते, मॉल निर्मनुष्य असतात. बाली रेडियो – दूरचित्रवाणीही थंड असते. प्रत्येकजण घरात बसून वाचन, अन्य कामे किंवा ध्यानधारणा, पूजाअर्चा करीत असतो.

त्याचवेळी विजेचा अगदी गरजेपुरता वापर करून विजेची मोठी बचत केली जाते. विशेष म्हणजे सन २००० पासून या दिवशी बालीचा आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद ठेवण्यात येतो. म्हणजे जवळजवळ चोवीस तास बाली हे संपूर्ण बेट निर्मनुष्य असते…. आणि मग दुसऱ्या दिवशी अत्यंत शुद्ध, प्रसन्न वातावरणात बालीमधील नवीन वर्षाला सुरुवात होते. सारे बेट जणू प्रदूषण विरहित झालेले असते. रोगराईवर मात करण्यासाठीही त्याचा फार उपयोग होतो असे तज्ञांचे मत पडते. पुण्या-मुंबईसारखी शहरे प्रदूषण, अस्वच्छता यांची माहेरघरं झाली आहेत. गुढीपाडवा किंवा अन्य कोणत्याही एखाद्या दिवशी असा ‘व्यवहार बंद’ दिन आपल्याकडेही पाळायला काय हरकत आहे?

बालीमधील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे- ‘गालुगान.’ हा वर्षातून दोनदा येतो. चांगल्या प्रवृत्तींचा वाईट प्रवृत्तींवर विजय ही त्यामागची भावना. प्रत्येक देवळात तो दिवस रोषणाई करून व फळाफुलांचा नैवेद्य दाखवून साजरा होतो. शाळांना, कार्यालयांना या दिवशी सुट्टी असते.

बालीमधील हिंदू कमालीचे धार्मिक. देऊळ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. तेथील पावित्र्य, स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखी असते. प्रत्येक खेड्यात पाच देवळे असतातच. देवळांची रचना अगदी जुन्या पद्धतीची, दगडांची. प्रवेशद्वापाशी दीपस्तंभ असतात. विशेष म्हणजे गावातील सर्व बैठी घरं, देवळं यांची रचना, आकार जवळजवळ सारखाच असतो. कोणत्याही समारंभाच्यावेळी देवळांच्या प्रवेशद्वारावर नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या उंच कमानी उभारणे ही येथील पारंपरिक पद्धत. प्रत्येक गावातील कमानी निरनिराळ्या आकाराच्या असतात.

आजच्या काळात बालीमध्ये एकत्र कुटुंबपद्धती ऱ्हास पावत असली तरी तरुणवर्ग आपल्या आईवडिलांची चांगली काळजी घेताना दिसतो. नोकरी धंद्यानिमित्त तो शहरात राहायला गेला तरी आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्याला जाणीव असते आणि वृद्धांसाठी शासकीय योजनांचा फारसा आधार नसल्याने त्यांनाही मुलांच्या साहाय्याची जरुरी असते. लग्न जमविण्याच्या बाबतीत मात्र बाली तरुण- तरुणी स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल कमालीचे जागरुक आहेत. सर्व मुले-मुली आपापलं लग्न स्वतःच्या पसंतीनेच ठरवतात. पालक त्यात सहसा हस्तक्षेप करीत नाहीत व कोणी केला तर मुलं त्यांचं न ऐकता पळून जाऊन लग्न करतात. लग्नाचं वय आता वाढून २८ ते ३० वर्षांपर्यंत गेलं आहे. पण विशेष म्हणजे घटस्फोटाचं प्रमाण अगदी नगण्य आहे. कितीही मतभेद झाले तरी लग्नगाठ कायम ठेवायचीच अशी वृत्ती मुला-मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते.

बाली खाद्यपदार्थ

काही बाली कुटुंबांतही जाण्याचा योग आला आणि खास बाली खाद्यपदार्थांची माहिती पत्नी जयंतीने करून घेतली. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन जेवणाची पद्धत दिसली नाही. प्रत्येकजण आपापल्या सोईनुसार जेवतो. भात व मासे हे त्यांचे मुख्य जेवण, पण नानाविध प्रकारचे सॉस ही तेथील जेवणाची खासियत आहे. टोमॅटो सॉस, केचप, कांदा, लसूण, चिली, दालचिनी व साखर यांचं मिश्रण म्हणजे लालभडक बाली सॉस. थोड्या प्रमाणात काळपट रंगाचं आणखी एक सॉस असतं.
लाल सॉस खूप तिखट, पण चवदार असतं. काळं सॉस थोडं गोड. मासा भाजला किंवा तळला की त्यावर हे सॉस टाकण्यात येतं. चिकन प्रामुख्याने गावठी कोंबडीच. तीसुद्धा या सॉसमध्ये किंवा काही वेळेस नारळाच्या दुधात बनवली जाते. जेवणात भात हा हवाच. तो बाऊलमध्ये नुसता घेतला जातो किंवा प्लेटमध्ये त्याची उंच मूद असते. भात, सॉस, चिकन म्हणजे मस्त मेजवानी. बाली किंवा संपूर्ण इंडोनेशियातच एक पदार्थ परिचयाचा वाटला तो म्हणजे आपल्याकडच्या तांदळाच्या कुरडया. हे पापडासारखे भाजण्यात येतात. अगदी विमानतळापासून गावाकडच्या टपरीवरच्या हॉटेलमध्येही त्या दिसून आल्या. मासे खाणाऱ्या पर्यटकांची बालीमध्ये तबीयत खूश न झाली तरच नवल !

Related posts

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

प्रियकरात बाप शोधणारी मुलगी

आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!