कोल्हापूर : बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीच्या शाश्वततेसाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कमी पाण्यात, कमी जागेत आणि नियंत्रित वातावरणात दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेणे शक्य करणारे हे तंत्रज्ञान भविष्यातील शेतीसाठी फायदेशीर ठरेल, आणि यापुढेही अशाच प्रकारच्या प्रशिक्षणांचे आयोजन सातत्याने केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून तयार केलेला भाजीपाला डायट आणि फिटनेससाठी कमी कॅलरी, जास्त फायबर, जीवनसत्त्वे व अँटिऑक्सिडंट्सयुक्त असल्याने वजन नियंत्रण, पचन सुधारणा आणि निरोगी जीवनशैलीस उपयुक्त ठरतो. कोल्हापूरची ओळख असलेल्या मल्ल, मॅरेथॉन धावपटूंसह क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी हा भाजीपाला उपयुक्त ठरेल. आता समाजामध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण होत असल्याने हायड्रोपोनिक पद्धतीने उत्पादित कीड व रोगमुक्त भाजीपाल्यास बाजारात चांगली मागणी व योग्य दर मिळत असल्याचे सांगून, निर्यातक्षम उत्पादन आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संधीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले यांनी वाढती लोकसंख्या आणि जमिनीचे तुकडीकरण हे शेतीसमोरील मोठे आव्हान असताना, ‘मातीविना शेती’चे हे तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादनासाठी वरदान ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. हा पथदर्शी प्रकल्प शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून, याद्वारे जिल्ह्यातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि प्रगत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, दत्तात्रय उगले आणि बायोस्पेक्ट्रम सीड्सचे रवींद्र सावंत यांनी जिल्हा नियोजन समितीच्या ९६ लक्ष रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हायड्रोपोनिक्स युनिटला भेट देऊन तेथील संशोधन उपक्रमांची माहिती घेतली. या प्रशिक्षणात तज्ज्ञांनी यंत्रणेची उभारणी, पोषण द्रावण व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. उदय शिंदे, डॉ. मयुरी खराडे, गणेश नरुटे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे
शेतीसाठी ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञान म्हणजे मातीचा वापर न करता, पाण्यात विरघळवलेल्या आवश्यक अन्नद्रव्यांच्या सहाय्याने पिकांची लागवड करण्याची आधुनिक व नियंत्रित शेतीपद्धत होय. या तंत्रज्ञानात झाडांची मुळे थेट पोषकद्रव्ययुक्त पाण्यात किंवा कोकोपीट, रॉकवूलसारख्या माध्यमात वाढवली जातात, त्यामुळे पिकांना अचूक प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात आणि वाढ जलद होते.
हायड्रोपोनिक्स पद्धतीत प्रामुख्याने पालेभाज्या आणि सलाड भाज्या घेतल्या जातात. त्यामध्ये लेट्यूस, आइसबर्ग लेट्यूस, पालक, मेथी, कोथिंबीर, बेसिल, पुदिना यांसह चेरी टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, झुकीनी, स्ट्रॉबेरी यांसारख्या पिकांचा समावेश होतो. ही भाजीपाला स्वच्छ, मातीविरहित आणि रसायनांचा वापर कमी असलेला असल्याने दर्जेदार मानला जातो.
हायड्रोपोनिक्समधील भाजीपाल्याचा हॉटेल उद्योग, डायट आणि फिटनेस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये सलाड, सूप, सॅंडविच, इटालियन व कॉन्टिनेंटल पदार्थांसाठी ताजा व कुरकुरीत भाजीपाला सातत्याने उपलब्ध होतो. शेतीच्या दृष्टीने पाहता, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत, कमी जागेत जास्त उत्पादन, वर्षभर लागवड, मातीजन्य रोग व कीड कमी, तसेच उत्पादनाची गुणवत्ता व बाजारमूल्य वाढते. हवामानावर कमी अवलंबित्व असल्याने ही पद्धत शहरी, उपनगर आणि पाणीटंचाईच्या भागात विशेष फायदेशीर ठरत असून, भविष्यातील शाश्वत आणि आधुनिक शेतीचा एक प्रभावी पर्याय मानला जात आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
