March 4, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Arvind Kejriwal addressing media after court acquittal in Delhi liquor policy case with supporters in background.
Home » केजरीवाल जिंकले… पण प्रश्न अजून जिवंत आहेत!
सत्ता संघर्ष

केजरीवाल जिंकले… पण प्रश्न अजून जिवंत आहेत!

स्टेटलाइन –

केजरीवाल जिंकले, कोर्टाने इमानदार ठरवले…
दिल्लीच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या तथाकथित ‘शंभर कोटींच्या मद्य घोटाळ्या’प्रकरणी चार वर्षे आरोप, अटक आणि राजकीय रणधुमाळी सुरू होती. मुख्यमंत्रीपदावर असताना अटक, तब्बल १८० दिवसांचा कारावास आणि सततची बदनामी सहन केल्यानंतर अखेर सीबीआय न्यायालयाच्या ६०० पानी निकालाने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निर्दोष मुक्त केले. हा केवळ एका नेत्याचा न्यायनिवाडा आहे की देशातील तपास यंत्रणा, राजकारण आणि सत्तासंघर्ष यांचा मोठा आरसा — हा प्रश्न आता अधिक ठळकपणे पुढे आला आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे ( आप ) चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचारी म्हणून भाजपाने जंग जंग पछाडले. गेल चार वर्षे भ्रष्टाचाराचा महमेरू म्हणून त्यांच्यावर चिखलफेक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री असताना पोलिसांनी त्यांना घरात घुसून अटक केली. तब्बल १८० दिवस जेलमधे काढावे लागले. केजरीवाल, त्यांचे सरकार व आपचे नेते भ्रष्टाचारी आहेत, मद्य धोरण आखून शंभर कोटीचा घोटाळा केला आहे, असे आरोप करून सीबीआय व इडीने त्यांना चार वर्षे छळले. प्रत्यक्षात केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अशा तेवीस आरोपींना सीबीआय न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यांच्यावरील एकही आरोप सिध्द करण्यासाठी एकही ठोस पुरावा सादर करता आला नाही अशा कडक शब्दात कोर्टाने आपल्या ६०० पानी निकालपत्रात सीबीआयवर ताशेरे ओढले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करून थेट जेलमधे टाकण्याची घटना प्रथमच घडली. मात्र हे सर्व कट- कारस्थान होते, केजरीवाल व त्यांच्या पक्षाला बदनाम करून सत्तेवरून हटविण्यासाठी होते, हे कोर्टाच्या निकालाने सिध्द झाले.

गेल्या बारा वर्षात देशात अनेक राजकीय पक्षांची तोडफोड झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सीबीआय, इडीच्या धाडी पडल्या. इडीच्या नोटीसा आल्यानंतर जेलमधे जाण्यऐवजी अनेकांनी भाजपामधे जाणे पसंत गेले. स्वत:ला कारवाईपासून वाचविण्यासाठी त्या नेत्यांनी भाजपात जाऊन संरक्षक कवच प्राप्त केले. केजरीवाल , मनीष सिसोदिया अशा तेवीस जणांची सीबीआय कोर्टाने शंभर कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली तेव्हा दिल्ली आणि चंदिगडमधे आपने रस्त्यावर येऊन जल्लोष साजरा केला. ख्यातनाम कायदे पंडित कपिल सिब्बल निकालावर भाष्य करताना म्हणाले- जेल भेजो, सरकार गिरावो और चुनाव जितो हीच रणनिती गेली दहा बारा वर्षे देशात राबवली जाते आहे, तोच प्रयोग दिल्लीत झाला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदारांसह तेवीस जणांना जेलमधे सडत ठेवले गेले, पण न्यायालयाने स्पष्ट निकाल देऊन या सर्वांची सन्मानाने सुटका केली. त्यांच्या विरोधात एकही सबळ पुरावा सीबीआयला सादर करता आला नाही.

शंभर कोटीचा घोटाळा म्हणून भाजपाने गेली चार वर्षे केजरीवाल व आपला सतत बदनाम केले. तेवीस जणांना तपास यंत्रणांनी जेलमधे टाकले. संविधानिक पदावर म्हणजेच मुख्यमंत्रीपदावर असलेल्या केजरीवाल यांनाही सहा महिने जेलमधे टाकण्याचा पराक्रम सीबीआयने करून दाखवला. राज्यसभा खासदार संजय सिंह हे १८१ दिवस, मनीष सिसोदिया ५३० दिवस तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या ( बीआरएस ) च्या आमदार कविता यांनाही चौकशीच्या नावाखाली दिडशे दिवस जेलमधे ठेवले. या सर्वांनी जामीन मिळावा म्हणून अनेकदा अर्ज केले पण एकाही आरोपीवर एकाही गुन्ह्यात एकही पुरावा नसताना न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज वारंवार का फेटाळून लावले ? जेलमधे टाकलेले आरोपी हे सार्वजनिक जीवनातील नेते होते, व्यावसायीक होते, राजकीय पक्षांचे नेते होते . ते कोणी हत्या, अपहरण किंवा खंडणीच्या प्रकरणात गुंतलेले नव्हते. कोणी गँगस्टर तर मुळीच नव्हते. तरी सुध्दा त्यांना जेलमधे दिर्घ काळ सडविण्याची कल्पना कोणाची होती ? कोणाच्या सल्ल्यावरून चौकशी यंत्रणेचे अधिकारी तपास करीत होते ? शंभर कोटीचा घोटाळा झाला आहे हे गृहित धरून व त्याला हेच जबाबदार आहेत हे अगोदर ठरवून तपास केला गेला. पण ते पैसे कुठे आहेत, कुणी वापरले, कुठे गेले, व्यवहार काय झाला, याचे एकही उदाहरण तपास यंत्रणेला पुरावा म्हणून देता आले नाही, असे निकाल पत्रातच म्हटले आहे. केजरीवाल, सिसोदिया , संजयसिंह व इतर नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याचे कथानक रचले गेले व राबवले गेले पण त्याचा पायाच कमकुवत होता मग सिध्द तरी काय होणार ?

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल मागणीसाठी दिल्लीत झालेल्या आंदोलनात अरविंद केजरीवाल हे आघाडीवर होते. स्वच्छ व प्रामाणिक चेहरा म्हणून दिल्लीत लोकप्रिय झाले. दिल्लीत काँग्रेस व भाजपा यांचे नेहमी वर्चस्व राहीले आहे पण केजरीवाल यांच्या आपने त्या दोन्ही पक्षांना कात्रजचा घाट दाखवला. सन २०१३ मधे आपने दिल्ली विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा ७० पैकी २८ आमदार निवडून आले व आपला २९. ७ टक्के मते मिळाली. त्या निवडणुकीत काँग्रेसला २४ टक्के मते मिळाली. सन २०१५ मधे झालेल्या निवडणुकीत आपने ५४. ५ टक्के मते मिळवली व दोन तृतियांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले. त्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ९. ७ टक्के मते मिळाली. आपने काँग्रेसला जसे संपवले तसेच भाजपालाही आपची अडचण होऊ लागली. केजरीवाल यांना दिल्लीतून हटवणे हे भाजपाला मोठे आव्हान वाटू लागले. केंद्रात सत्ता मिळावली पण दिल्लीत आपचे सरकार येते हे भाजपाला खटकत राहीले. करोना काळात केजरीवाल सरकारने राज्याचा महसुल वाढविण्यासाठी नवे मद्य धोरण आखले. पण त्या धोरणामुळे खाजगी कंपन्यांचा लाभ होतो व सरकारचे नुकसान होते असा अहवाल दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना पाठवला. त्या अहवालाच्या आधारे प्रथम दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला नंतर नायब राज्यपालांनी अवघ्या पंधरा दिवसात हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली. केंद्रीय गृहमंत्री भाजपाचे, नायब राज्यपाल भाजपाने नेमलेले, दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतले व सीबीआय केंद्राचेच. सर्व काही जुळून आले. त्यानंतर शंभर कोटीचा घोटाळा असा गाजावाजा सुरू झाला व आपचे अटकसत्र सुरू झाले.

केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या चार वर्षात जेलच्या भिंतीत दीर्घकाळ छळ सहन केला. भ्रष्टाचारी म्हणून बदनामी सहन केली. दिल्ली राज्याची सत्ता गमावली. केजरीवाल सरकारने शंभर कोटीचा घोटाळा केला असा घणाघाती प्रचार करून भाजपाने दिल्लीची सत्ता मिळवली व युध्द जिंकल्याचा जल्लोष साजरा केला. पण स्वत:ला वाचविण्यासाठी किंवा जेलमधून बाहेर येण्यासाठी आपचा कोणीही नेता सत्तेला शरण आला नाही. केजरीवाल यांची आता राष्ट्रीय पातळीवरील नेता म्हणून प्रतिमा उंचावली आहे. २०२६ या वर्षात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पॉँडेचेरी, या पाच राज्यात निवडणुका आहेत. पुढील वर्षी पंजाबमधे निवडणूक होणार आहे. केजरीवाल काय करणार हे लवकरच समजेल…

माजी मुख्यमंत्री अतिशी म्हणाल्या- एकीकडे भाजपाचे षडयंत्र, सत्तेची भूक व तपास यंत्रणाचा दुरूपयोग असताना दुसरीकडे केजरीवालांची प्रतिमा स्वच्छ व इमानदार आहे हेच सिध्द झाले आहे.

केजरीवाल म्हणाले, आम्हाला निवडणुकीत हरवू शकत नाहीत म्हणून आपला संपविण्याचा भाजपाने कट रचला. या कटामुळे आमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. आई रूग्णालयात गेली व रडत होती. मनीष सिसोदियांची पत्नी गंभीर आजारी होती. त्यांच्या कट कारस्थानामुळे दिल्लीचे तीन कोटी लोक त्रस्त झाले. हिम्मत असेल तर दिल्ली विधानसभेच्या लगेच निवडणुका घ्या, भाजपाचे दहा आमदार निवडून आले तरी मी राजकारणातून निवृत्त होईल…
मुझे अब तभी रोक पाएंगे , अगर मेरा कत्ल करवा दे.. असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचणाऱ्यांना दिले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेतीतील पेच: जमीन धारणा एक तृतीयांशाने कमी झाली अन् शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणात वाढ

मीपणा गेल्यावरच आध्यात्मिक प्रगती

गावाकडे चल माझ्या दोस्ता – इंद्रजीत भालेराव

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading