वडणगेसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास देशविदेशांत आयुर्वेदाचा गंध पसरवणाऱ्या वैद्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा यशोगाथा राहत नाही. डॉ. सुनिल पाटील यांच्या ‘वडणग्याचं पोरगं’ या आत्मचरित्रात एका लोकवैद्याचा संघर्ष, वैचारिक प्रवास आणि समाजकारणाशी असलेली बांधिलकी यांचा बहुरंगी पट उलगडतो. म्हणूनच हे पुस्तक एका व्यक्तीच्या आठवणींपलीकडे जाऊन एका काळाचे दस्तावेजीकरण बनते. डॉ. सुनिल पाटील यांचं वडगणग्याचं पोरगं या नावानं आत्मचरित्र प्रसिध्द होतं आहे. या निमित्ताने….
डॉ. श्रीराम पवार
डॉ. सुनिल पाटील यांचं वडगणग्याचं पोरगं या नावानं आत्मचरित्र प्रसिध्द होतं आहे. त्यासाठी प्रस्तावना लिहावी असं मला सागितंल तेव्हा मागच्या तीनएक दशकातील डॉक्टरांशी परिचयाचा एक पट तरळून गेला. मागं एकदा डॉक्टरांविषयी मी लिहिलं होतं, टाटांच्या कंपनीला ‘इस्पात भी हम बनाते है’ असं जाहिरात करुन सांगावं लागलं याचं कारण ती कंपनी इतक्या क्षेत्रात काम करते की आपला मूळचा व्यवसाय पोलाद निर्मितीचा आहे याची स्वतंत्र आठवणच काढावी लागते. सुनिल पाटील हे असंच इतक्या निरनिराळ्या क्षेत्रात सहजगत्या वावरता आले की ते डॉक्टरही आहेत असं वेगळं सांगायची वेळ यावी. अर्थात टाटांनी पोलादाच्या मूळ कामातील गुणवत्ता सोडली नाही तसंच सुनिल पाटील यांनी आयुर्वेदाची प्रॅक्टिस सोडली नाहीच, पण त्यात गुणवत्तेशी तडजोडही केली नाही हा त्यांच्या निकरानं जपलेल्या त्यासाठी पडेल ती किंमत मोजायची तयारी असलेल्या मूल्यव्यवस्थेचा भाग आहे. देशविदेशात आयुर्वेद आणि पंचकर्म यासाठी ख्याती मिळवलेल्या सुनिल पाटील यांची वैद्यकिय पेशातील कामगिरी खणखणीत आहे. सोबत ते जगण्याच्या इतक्या रंगात रंगून गेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तितकचं समरसून काम करत आले आहेत की खरे डॉक्टर कोणते असा प्रश्न पडावा. वडणग्याचं पोरगं मधून या प्रश्नाला प्रतिसाद देणारे अनेक कवडसे गवसतात. ते एका लोकवैद्याचं जीवनगाणं बनतं.
डॉक्टरांच्या आयुर्वेदाच्या क्षेत्रातील काम लक्षवेधी आहे मात्र ते केवळ डॉक्टर नाहीत अनेक क्षेत्रात त्यांनी सहज विहार केला आहे. अशा समाजातील सजग वावरासाठी अनेक गोष्टींवर पाणी सोडावं लागतं ती तयारी त्यांनी दाखवली निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून त्यांची खासियत आहे, पण त्यापलिकडं सामाजिक क्षेत्रात त्यांनी जाणिवपूर्वक वेळ दिला. त्यांचा प्रवास वडणगेसारख्या गावातून सुरु झाला ते देशविदेशांत फिरले या वाटचालीत त्यांच्या विचारांची प्रगल्भताही निर्माण झाली त्याचा एक पट हे आत्मचरित्र मांडतं. विचारसरणी वैचारिकता आणि त्यावर आधारलेल्या भूमिका एक गुतंगुतीचं प्रकरण असतं. माणूस ज्या विचारांशी बांधिल आहे किंवा ज्या विचारसरणीशी जोडलेला आहे त्यापलिकडच्या विचारांशी संबंध टाळायचा प्रयत्न करतो. व्यक्तिगत जीवनात सुनिल पाटील यांनी सर्व छटांच्या विचारधारा असलेल्या माणसांशाी उत्तम संबंध जोपासले आहेत मात्र मुद्दा विचारांच्या स्पष्टतेचा येतो तिथं ते तडजोड करत नाहीत.
ज्या प्रवाहाला सर्वसाधारणपणे प्रागितक – पुरोगामी म्हटल जातं त्याच्याशी सुनिल पाटील जोडले गेले आहेत, मात्र हा प्रवास उजवीकडं वळता वळता मध्याच्या डावीकडं असा झाला आहे. त्याची एक कहाणी या पुस्तकातून समोर येते. ती पुरेशी बोलकी आहे. लहानपणी मित्रांच्या आग्रहावरून ते संघशाखेत गेले. कित्येकांचा शाखा प्रवेश बहुदा असाच होतो. लहान मुलांसाठी असलेला खेळांवरचा भर शाखेकडं खेचणारा असतो. तिथल्या बौध्दिकात शत्रुशी मुकाबला कसा करावा हे सांगितलं आणि त्याच दिवशी शाखा संपल्यानंतर संघाचा गणवेश असलेल्या हाफ चड्डी काळी टोपी वरुन मुलांचा एक घोळका चिडवायला लागला. तेव्हा बरोबरचे सारे शाखा मित्र पोबारा करते झाले होते. तिथं सुनिल पाटील यांनी बौद्धिकं आणि प्रत्यक्ष अनुभव यातील विसंगती जाणवली त्यांनी संघशाखा सोडली ती कायमची. संघात गेलेले आणि नंतर तिथून बाहेर पडलेले अनेकजण असतात. त्यातील अनेकांनी हे का घडलं यावर लिहिलंही आहे. त्यात अनेकांनी बोट ठेवलं आहे ते दुजाभाव भूमिकेतील दुटप्पीपणा यावर सुनिल पाटील यांना संघाला रामराम ठोकावा वाटला. तो प्रसंग येताच समोरं जाण्यापेक्षा संघ सवंगड्यांच्या पलायन करण्यामूळं. हे त्यांच्यातील एक टिपिकल कोल्हापूरी लक्षण.
किशोरवयाताच देश धर्म याविषयीच्या विशिष्ट धारणा तयार करणं हा उजव्या प्रवाहाचा सतत चालणारा खटाटोप असतो. त्याची फळंही हा प्रवाह चाखतो आहे. सुनिल पाटील यांनीही हा अनुभव त्याच्या असलेल्या जीवनात घेतला. त्यांच्याहून थोड्या अधिक वयाच्या मुलांनी त्यांना महात्मा गांधीच्या हत्येविषयीची, या हत्या प्रकरणातील एक आरोपी गोपाळ गोडसेंचं गांधी हत्या आणि मी हे पुस्तक वाचायला दिलं. त्यावर बंदी आहे खास तुझ्यासाठी आणलं असं सांगून त्याची उत्सूकताही चाळवली. पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तकही त्यांना असंचं दिलं गेलं. ही पुस्तकं त्यातील मांडणी आणि त्यातून घडवायचा परिणाम स्पष्ट आहे. याच पद्धतीचा अवलंब करुन कित्येकांच्या मनात गांधींविषयी तिरस्कार निर्माण केला गेला असेल. सुनिल पाटील यांनाही गांधी यांच्याविषयी तिरस्कार तयार झाला. खरंतर हेच गांधी ज्यांना खुपतात त्यांना घडवायचं असतं. अत्यंत शांतपणे हे द्वेषाचं बीज पेरायचा प्रयत्न सुरू असतो. एकदा त्या प्रवाहात समाविष्ट झाल्यानंतर त्याच प्रकारची माहिती आणि त्यातून तयार होणारा कन्फर्मेशन बायस माणसाच्या बौध्दिक वैचारिक दिशा ठरवणार बून शकतो. सुनिल पाटील यांचा गांधींविषयीचा तिरस्कार काम राहिला नाही याचं कारण त्यांना पुढच्या काळात गांधी हत्येचं वास्तव पुराव्यानिशी समजाऊन सांगणारी माणसं भेटली. स्वतंत्रपणे वाचून आपल्या निष्कर्षावर येण्याइतपत शहाणीव जोपासली गेली. सुनिल पाटील त्या सापळ्यातून बचावले ते त्यांच्या पुढच्या वाटचालीतून स्पष्टपणे दिसते. द्वेषपेरणीचा प्रयोग कसा होऊ शकतो याचं एक दस्ताएवजीकरण या निमित्तानं पुस्तकात झालं आहे ते निश्चित महत्वाचं.
सुनिल पाटील यांच्या जीवनातलं एक वादळी प्रकरण आहे. ते त्यांची आयुर्वेद आणि अन्य भारतीय वैद्यकीय शाखांच्या व्यावसायिकांची नोंदणी नियमन करणाऱ्या महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या वैद्यक परिषदेवर निवड झाल्यानंतर. या निवडीनं त्याच्या शुद्ध आयुर्वेदाचा अवलंब करणाऱ्या प्रॅक्टिसचा एका अर्थानं गौरव झाला होता. त्यांच्यातील कुशल संघटकाचा सन्मान झाला होता. तसच निदान आपल्या क्षेत्रात बनावटगिरीला थारा असू नये, काही निकष, मापदंड पाळले गेलेच पाहिजेत यासाठीच्या त्यांच्या आग्रहाचाही सन्मान झाला होता. मात्र हेच पद त्यांच्याभोवती एक विचित्र फास ठरलं. ज्यांच्या बेदाग चारित्र्यावर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही कधी शंका वाटली नसेल त्यावर या प्रकरणात शिंतोडे उडाले. बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या सुनिल पाटील यांनी त्यासाठी परिषदेतील आपल्याच सहकाऱ्यांनाही एकाच शास्त्रकाट्यावर तोलण्याचा प्रयत्न केला. यात कोणाचे लागेबांधे कुठवर याची फिकीर केली नाही. राजकीय व्यवस्थेच्या दबावालाही जुमानलं नाही. त्याचं फळ म्हणून सुनिल पाटील यांच्यावरच बोगस डॉक्टर नोंदणीसाठी बालंट आलं. त्यांनी गैरमार्गानं नोंदणी केलेल्या वैद्यकिय व्यावसायिकांविरोधात मोहिमच उघडली होती. यात कित्येकांचे संभावित बुरखे फाटले असतील. सुनिल पाटील वैद्यकिय शिक्षणातील गुणवत्तेबाबत कमालीचे आग्रही राहिले आहेत. ते आणि त्यांचे अशीच भूमिका असलेले सहकारी यांच्यामुळे कोल्हापूरातील ‘गंगा आयुर्वेद’ची चौकशी सुरू झाली. त्यानंतर डॉक्टरांना आवरायला हवं या भूमिकेतून परिषदेवर आरोपांच सत्र सुरू झालं. जी परिषद वेचून बोगस डॉक्टर शोधत होती तिच्याविरोधात बोगस डॉक्टरांना बळ दिल्याचे आक्षेप घेत हे वादळ सुनिल पाटील याच्यापर्यंत पोचले अशी व्यवस्था झाली. याचे सविस्तर वर्णन आणि यंत्रणा हितसंबंध जपताना किती विपरित काम करू शकते याचं दर्शन हे पुस्तक घडवतं.
राजकीय नेत्यांना भोवतालची व्यवस्था आपल्या इशाऱ्यानुसार चालावी. त्यात कोणी प्रश्न विचारु नयेत असं वाटत असतं. राजकीय सत्तेचा जणू तो गुण बनतो आहे. आपले हितसंबध लक्षात घेऊन अन्य पदांवर बसलेल्यांनी निर्णय घ्यावेत ही त्यातील अपेक्षा असते. न बोलता ती समजून घ्यावी, सन्मानानं पदं भोगावीत पण राजकीय व्यवस्थेला त्यांच्या चेल्याचपाट्यांना अडचणीत आणू नये, त्यांचे हितसंबंध धोक्यात घालू नयेत हे त्या अपेक्षांचं सार. सुनिल पाटील यांनी हा व्यवहार समजून घेऊन परिषदेचं अध्यक्षपद हाकलं असतं तर कदाचित त्यांचा कार्यकाळ सुफळ संपूर्ण झाला असता. कदाचित आणखी काही वेळा त्या पदावर विराजमान होता आलं असतं, मात्र त्यांच्यातील विवेक जागा राहिला. आपल्या सत्यान्वेषीपणानं सारी व्यवस्था बदलेल किंवा नाही मात्र माझं काम कायद्याच्या चौकटीत आणि नैतिकतेच्या निकषांवरच करेन हा बाणा ते दाखवत राहिले. त्यातून एक ससेहोलपट वाट्याला आली. पोलिसी ससेमिरा मागं लागला. पोलीस कोठडी अनुभवावी लागली. आणि या काळात दाखवायचे आणि खायचे दात वेगळे म्हणजे काय याचा आयुष्यभर पुरेल असा अनुभवही त्यांनी घेतला. हे खरंतर कोणाही सामान्य सुसंस्कृत माणसाला संपूर्ण उद्धस्त करुन टाकण्याची क्षमता असणारं प्रकरण होतं. डॉक्टर सुनिल पाटील यांनी त्याला तोंड दिलं. त्याचा परिणाम म्हणून ज्या उद्देशानं हे सारं उभं केलं गेलं तो मात्र सफल झाला नाही याचं कारण सुनिल पाटील यांचा आपल्या कृतीवर विश्वास कायम राहिला, त्यांना ओळखणाऱ्या कोणीही त्यांच्यावर जे बालंट आलं त्यावर जराही विश्वास ठेवला नाही. बोगस डॉक्टरांना बळ दिल्याच्या आरोपातून आलेली कुप्रसिद्धी, पोलिस कोठडीतील अनुभव आणि अनेकांचे उलगडलेले अंतरंग यातून अनुभवाचं एक आगळं गाठोडचं त्यांच्यापाशी जमा झालं.
कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा सामाजिक वावर पूर्ववत झाला आणि समाजानं काही झालचं नाही इतक्या सहजतेनं तो स्वीकारला. या कटू अनुभवाचा अत्यंत विस्तारानं आढावा या आत्मचरित्रात घेतला आहे. यातील कायदेशीर बाबी, पत्रव्यवहार असे तपशील किती असावेत असा प्रश्न पडू शकतो मात्र त्या निमित्तानं एक दस्ताएवजीकरण सुनिल पाटील यांनी केलं आहे. आपल्या धारणा आणि मूल्यांसाठी जबर किंमत मोजायीच की तडजोड करुन सुखासीन पण कोडगं जागयचं यातील निवड भल्याभल्याच कस पाहते. सुनिल पाटील यांनी आपल्या धारणांशी तडजोड केली नाही. त्याची किंमतही मोजली. याचे तपशील हे पुस्तक पुरवतं. तेव्हा ती केवळ व्यक्तीची कहाणी उरत नाही.
याच कटू प्रकरणाचं एक उपाख्यान नंतरच्या सुनिल पाटील यांच्या विधानसभा निवडणूकीच्या राजकारणातील भूमिकेशी जोडलं गेलं. दीर्घकाळ ज्यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलं त्याच नेत्याला पराभूत करण्यासाठी सारे प्रयत्न त्यांनी केले. याला त्या कटू प्रकरणाची पार्श्वभूमी होती. त्यांनी आपला हेतू तडीसही नेला. करवीर विधानसभा मतदारसंघात भाकरी परतली. दिग्विजय खानविलकर यांच्या घरात किचनपर्यंत वावर असणारे कार्यकर्ते असा लोकिक असलेले डॉक्टर त्या निवडणूकीत सतेज पाटील यांच्या प्रचाराची सुत्रं हलवणाऱ्या यंत्रणचे घटक बनले. नॅरेटिव्ह बिल्डिंग परसेप्शन मॅनेजमेंट हे शब्द निवडणूक प्रचारात रुढ नसल्याच्या त्या काळात प्रतिमा निर्मितीच्या लढाईत स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय घडवू शकतं याची झलक डॉक्टरांनी दाखवली. खानविलकरांचा तो पराभव महाराष्ट्रात धक्कायदायक होता. त्यात अनेकांनी आपल्या समिंधा टाकल्या त्यातील डॉक्टरांचा सहभाग थेट होता. तो का, कसा याची उत्तरं हे पुस्तक देतं. त्या एका निकालानं पुढं जिल्ह्याच्या राजकारणातील व्यापक बदलाची नांदी केली.
तसं सुनिल पाटील याचं राजकारणाचं आकर्षण कायमचं आहे. किंबहूना तो त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेला आहे. तसंही राजकारण सर्वस्पर्शी असतं आणि त्यापासून दूर राहण्याच्या कल्पनांना काही अर्थ नसतो. डॉक्टर आपल्याला राजकारणाशी काही देणंघेणं नाही असल्या मध्यमवर्गीय तुच्छतावादात कधीच रमले नाहीत. वैचरिकदृष्ट्या एक विशिष्ट भूमिका निभावत आले, तसंच निवडणूकीच्या मैदानी राजकारणात त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. राजकारणात दोन द्यावेत दोन घ्यावेत याच अनुभवही त्यांनी घेतला. निवडणूकही लढवून पाहिली आणि निवडणूकीचे म्हणून हिशेब आणखी निराळेच असतात याचा अनुभव गाठीला बांधला.
सुनिल पाटील यांच्या कामातील प्रचंड वैविध्यामूळं त्यातून आलेल्या अनुभवसंपन्नतेनं हे आत्मचरित्र कोणाही डॉक्टरच्या आपली प्रॅकिचस त्यातील अनुभव, रुग्णांना बरे करण्यातील कौशल्य व्यक्तिगत आठवणी या पलिकडं बराच ऐवज पुढं आणते हे वडणग्याचं पोरगं या पुस्तकाच वेगळेपण. त्यांचं आयुर्वेदातील कौशल्य सर्वविदित आहे. त्यासोबत ते अगदी तरुण वयातच महर्षी आयुर्वेद या महेश योगी यांच्या संघटनेशी जोडले गेले. हा अनुभव त्यांना प्रगल्भ करणारा होता. या संस्थेचे काम जगभर चालत होते आणि वैद्यकिय कार्यासोबतच ध्यान आणि अध्यात्म प्रसाराचं कामही संघटना करत होती. सुनिल पाटील यांना या संघटनेसाठी नेदरलॅंडमध्ये कामाची संधी मिळाली. ते पुन्हा स्वतःच्या व्यवसायात परतले मात्र भावातीत ध्यान ही संकल्पना आणि विदेशात आयुर्वेदचा प्रसार यावर पुढं काम करीत राहिले. कोल्हापुरात कित्येकांचा डॉक्टरांमुळेच भावातीत ध्यानाशी परिचय झाला. त्यांनी नेपाळपासून सिंगापूरपर्यंत आणि मॉरिशसपासून सर्बियापर्यंत विश्व आयुर्वेद परिषदांचं आयोजन केलं.
वनौषधी विद्यापीठ ही आणखी एक संस्था आयुर्वेद विकास आणि संशोधनासाठी स्थापन केली. आयुर्वेदाच्या पदवीधरांना अॅलोपथीचा वापर करण्याची अनुमती असते आणि बरेच आयुर्वेदाचे वैद्य या प्रकारची प्रक्टिस करतातही. सुनिल पाटील यांनी बव्हंशी आपली आयुर्वेदाशी बांधिलकी कायम ठेवली. याच काळात आयुर्वेद, पंचकर्म, योग – ध्यान आदी भारतीय पंरपरेतील बाबीविषयी जागरूकता, कुतुहल वाढत गेलं. गावोगावी पंचकर्म सेंटर दिसायला लागली. त्याभोवती एक ग्लॅमर आणि साहजिकच सुबत्ताही दिसू लागली. हे घडविण्यात डॉक्टरांसारख्या वैद्यांनी अविरतपणे केलेल्या कामाचं योगदान निर्विवाद आहे. या सगळ्याला असं कसलंही वलय नव्हतं. तेंव्हापासून सुनिल पाटील शुद्ध आयुर्वेद आणि पंचकर्म उपचारांचा अवलंब करीत आले. वनौषधि सारखा दिवाळी अंक चालवण्याचं खडतर काम ते अनेक वर्षे करत आले. त्यामागची भूमिकाही आयुर्वेदाच्या प्रसाराचीच राहिली.
त्यांना जशी सामाजिक कामाची हौस आहे आणि त्याचं दर्शन या पुस्तकात घडतं. तसच त्याचं माध्यमांविषयी कुतुहल अपार आहे. टिव्ही आणि डिजिटल माध्यमांचा स्फोट व्हायच्या आधी वर्तमानपत्रं हाच माहितीचा आधार होता. सुनिल पाटील यांनी वर्तमानपत्रात विपुल लेखन केलं आहे. ते केवळ वैद्यकिय माहती देणारं नाही तर एखाद्या पूर्णवेळ पत्रकारासारखं ते विविध विषयांवर व्यक्त होत राहिले. त्यांच्या या लेखन हौसेला पत्रकारितेच्या औपचारिक शिक्षणाची जोड मिळाली. त्यांचा हा वावर त्यातून भेटलेली माणंस यातून त्याच्यात मूळातच असलेली प्रागतिक पुरोगामी वैचारिक धाटणी आणखी पक्की झाली. लहानपणापासून लिहावं ही आवड होती त्याला पत्रकारितेच्या शिक्षणानं भक्कम आधार मिळाला. आयुर्वेदाचे प्रसिध्द डॉक्टर असा लौकिक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. या वाटचालीचं दर्शनही या पुस्तकात घडतं. काही काळ त्यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अद्यापनही केलं. त्यांच्या पत्रकारितेतील मुशाफिरीचा एक धागा ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करुन शोध पत्रकारितेसाठी पुरस्कार देण्याशी जोडला गेला. फडणीस आमचे शिक्षक होते. हा ट्रस्ट असो की पत्रकारितेचा पदव्यूत्तर अभ्यासक्रम पुर्ण करतानाचा अनुभव असो त्यांच्यातील मूल्यविवेक पाळणारा माणूस कायम होता.
सुनिल पाटील सामाजिक कामातही तितक्याच आत्मियतेनं सहभागी होत राहिले. चेतना ही मतिमंद मुलांची शाळा सुरू करण्याची कहाणी या पुस्तकात आली आहे. या प्रकारची विशेष मुलाची शाळा चालवण्याची कल्पना ८० च्या दशकात राबवणं हे धाडस होतं. ते करणाऱ्यांत सुनिल पाटील होते आणि नंतर अनेक आव्हानं अडचणींना तोंड देण्यातही त्यांच्या संपर्काचा वाटा मोठा राहिला. चेतना शाळा असेल, वाहतूक सुरक्षेसाठीचे उपक्रम असतील, नाटकाची हौस असेल किंवा चित्र, वादनाची सुनिल पाटील प्रत्येक ठिकाणी मनापासून रमले. साहजकिच साठी पार करता करता त्यांचं आयुष्य विविध अनुभवरंगानी भरलं, बहरलं. डॉक्टरांचे लक्ष्मीपूरीतील पंचकर्म सेंटर हे म्हंटल तर वैद्यकिय उपचारांचं केंद्र – दवाखाना, पण दीर्घकाळ हा दवाखाना विविध क्षेत्रातील मान्यवरांचा हक्काचा एकत्र जमण्याचा, चर्चेचा एक कट्टा बनला. तो त्याच्या स्वागतशील स्वभावानं.
एखाद्या गावच्या राजकारणापासून जागतिक घडामोडींपर्यंत, सिनेमा, इतिहास, समाजकारण कोणताही विषय या दवाखान्याला वर्ज्य नव्हता. तिथंच अनेक मोहिमांची आखणी झाली. बेत ठरले आणि भवताली परिणाम करणारया परफेक्ट कार्यक्रमांचं नियोजनही झालं. अनेक उलथापलथींना वात लावून देण्याचं काम तिथंच झालं. अस्वस्थता माणसाला उपक्रमशील सृजनशील बनवते. डॉक्टर हे त्याचं उदाहरण. पेशानं डॉक्टर असलेले सुनील पाटील त्या विषयात माहितीसाठी कधीही उपलब्ध असतातच, पण त्यापलीकडे अनेक बातम्यांचा स्रोत ते बनतात याचं कारण त्यांनी स्विकारलेली मुशाफिरी. ती त्यांना राजकारणापासून साहित्य संगीत वादन चित्रकला ते मतीमंदाच्या शाळेसाठी सहयोग देण्यापर्यंत कुठंही घेऊन जाते आणि डॉक्टर असं जातील तिथं तिथलेच होऊन जातात, जणू तेच त्याचं मुख्य काम आहे. आयुर्वेदातील डॉक्टरांचा हातखंडा निर्विवाद. पांरंपरीक ज्ञान त्याला आधुनिक आयुधांची जोड आणि पारंपरीक ज्ञानही विकसित होत जातं ही धारणा यातून त्यांच्या वैद्यकीच्या ज्ञानाला आगळी बैठक लाभली आहे.
हा माणूस हाडाचा डॉक्टर आहे. आता आयुर्वेदाला ग्लॅमर आलं आहे. कोरोनाच्या काळात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी म्हणून आयुर्वेदाला भलतंच महत्व आलं. डॉक्टर पदवी घेऊन बाहेर पडले तेंव्हा बुहतांशी पदवी आयुर्वेदाची पण प्रक्टीस अॅलोपॅथीची असाच मामला होता. त्यांनी आयुर्वेदाची प्रॅक्टीस करेन असं ठरवून आयुष्य त्यात वेचलं. पंचकर्म ही आता गावगन्ना प्रसिध्दी पावलेली पध्दती डॉक्टर 35 वर्षांपूर्वीपासून शास्त्रशुध्दपणे राबवत होते. ज्याला समाजात लष्कराच्या भाकरी भाजणं असं म्हंटलं जातं अशी कसलाही लाभ नसलेली काम समाजासाठी करत राहणं हा सुनिल पाटील यांचा गुणं तो या पुस्तकातूनही समोर येतो. अशा लष्कराच्या भाकरी का भाजाव्यात असं अनेकांनी त्यांना सुचवंल असेल पण तो त्याचा स्थायीभाव बनला आहे, आणि अशा सर्वसंचारी माणसांची गरज प्रत्येक काळात प्रत्येक समाजात असते.
इतक्या नानविध क्षेत्रातील मुशाफिरी करताना चार चांगले चार कटू अनुभव आले. त्याची फिकिर न करता सुनिल पाटील एका पक्व प्रगल्भ टप्प्यावर उभे आहेत अशावेळी वडणग्यासारख्या गावातून सुरू झालेला त्याचा प्रवास या आत्मचरित्रातून येतो आहे. वडणग्याच्या या पोराचं अनुभवसंपन्न जीवनगाणं मांडणाऱ्या या पुस्तकाचे विवेकी मराठी वाचक स्वागतच करतील याची खात्री वाटते. या पुस्तकातून सुनिल पाटील यांचे अनेक पैलू समोर येतात पण लिहिण्यासारखं अजून बरंच काही त्यांच्याकडं आहे हेही जाणवतं, तेंव्हा त्यांचा लेखनप्रवास सुरु राहो या शुभेच्छा !
