कोकणातील रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या दोन जाती सुप्रसिद्ध आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उत्पादन क्षम क्षेत्र ८७ हजार ८८२ हेक्टर आहे आणि प्रमाणबद्ध तीन टन हेक्टरी उत्पादन गृहीत धरले तर दोन लाख ६३ हजार ६४६ टन उत्पादन होऊ शकते. यापैकी पाहणी समितीच्या निष्कर्षानुसार नव्वद टक्के उत्पादन घटले तर केवळ २६ हजार ३६४ टन आंब्याचे उत्पादन यावर्षी मिळू शकेल आणि नुकसान मात्र दोन लाख ३७ हजार २८२ टनाचे होणार आहे. या हिशोबाने अंदाज केला तर यावर्षी कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे असाच निष्कर्ष काढावा लागेल.
वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक
दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे त्यांनी गेल्या २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषी खात्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालातील एका ओळीतील निष्कर्ष असा नोंदविला आहे की, “सद्यस्थितीत क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त पाहणीनुसार चालू हंगामात आंबा उत्पादनात सरासरीच्या तुलनेत जवळपास ८५ ते ९० टक्के पेक्षा जास्त घट होणार असल्याचे दिसून येते.”
गेल्या वर्षीच्या तिन्ही ऋतूतील हवामान बदलामुळे शेतीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्याचाच हा निष्कर्ष एका ओळीत मांडलेला आहे. यावर्षी १५ मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आणि तो नोव्हेंबरच्या १५ तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पडत होता. त्यानंतर थंडी सुरू झाली आणि ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहिली. थंडी देखील इतकी जबरदस्त होती की कोकणातले लोक स्वेटर चा शोध घेऊ लागले होते.
उशिरापर्यंत पाऊस पडणे आणि थंडीचे प्रमाण अधिक असल्याने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याच्या झाडाला मोहोर मोठ्या प्रमाणात आला तरी त्याची फळधारणा झाली नाही. मोहोर काळा पडून करपून गेला आणि समतोल परागीकरण न झाल्याने फळधारणा पुरेशी झाली नाही. झालेली फळधारणा देखील गळती लागल्याने पडून गेली. रोग व कीडनाशके, संप्रेरकांचा मारा करून देखील सुमारे नव्वद टक्के फळधारणा वाया गेली, असा हा समितीचा निष्कर्ष सांगतो आहे.
हवामान बदलामुळे आंब्याचे उत्पादन घटणार हे लक्षात आल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हालचाल सुरू केली. राज्य शासनाने मदत करावी अशा मागण्या होऊ लागल्या. १५ जानेवारी २०२६ रोजी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी रत्नागिरी आणि ओरोस येथे जिल्हाधिकारी तसेच कृषी अधीक्षकांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. या प्रश्नावर शासकीय यंत्रणा पुरेशा हालचाल करीत नाही हे लक्षात आल्यानंतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या उपस्थितीमध्ये देवगड येथे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. त्याच मेळाव्यामध्ये गेल्या १२ मार्च रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पाहणी दौरा
दरम्यानच्या काळात कृषी खात्याच्या अधीक्षकांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा आदेश निघाला. कृषी खात्याने याचे चांगले नियोजन केले आणि तालुकावार गट स्थापन करून कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन संचालकामार्फत प्रत्येक गटामध्ये विद्यापीठाच्या प्रतिनिधींना स्थान दिले. रत्नागिरी जिल्ह्याच्या नऊ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आठ तालुक्यात या शिष्टमंडळांनी काही निवडक गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष आंबा उत्पादकांशी चर्चा केली. अनेक भागांची पाहणी केली अनेक बागांची पाहणी केली. या पाहणी मध्ये त्यांना आढळून आलेले निष्कर्ष पुढील प्रमाणे मांडण्यात आलेले आहेत.
१) सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागांवर हवामान बदलामुळे झालेल्या विपरीत परिणामामुळे आंब्याचा मोहोर सुकणे, मोहोर करपणे, फळगळ होणे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे कृषी विभाग आणि विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समितीकडून क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समितीकडून देवगड, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, खेड, मंडणगड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी. लांजा आणि राजापूर या तालुक्यात पाहणी करण्यात आली. त्याचे निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत
१) सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. या काळात रात्रीचे तापमान कमी राहिल्याने संयुक्त फुलांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे परागीकरणासाठी आवश्यक असलेल्या मित्र कीटकांच्या हालचाली मंदावल्यामुळे परागीकरण न झाल्याचे व संयुक्त फुलांचे प्रमाण कमी असल्या ने मोठ्या प्रमाणात मोहोर सुकून गेला
२) आंबा पिकाला दुसरा बहार डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला. परंतु या कालावधीत थंडीचा कालावधी लांबल्याने याही वेळी कीटकांच्या हालचाली मंदावल्याने परागीकरण न झाल्याने व संयुक्तपणांचे प्रमाण कमी असल्याने मोठ्या प्रमाणात मोहर सुकून गेला.
३) सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पुन्हा मोहोर येत असून काही भागांमध्ये कणी, वाटाणा आणि सुपारी आकाराची फळधारणा दिसून येते. परंतु हा हंगाम लांबण्याची शक्यता असून गतवर्षीप्रमाणे अवकाळी पावसाचा धोका संभवतो. त्यामुळे यावर्षी प्रत्यक्ष किती उत्पादन मिळू शकेल याविषयीचा अंदाज सद्यस्थितीत वर्तवणे कठीण आहे.
या अहवालाच्या शेवटी स्पष्ट एका ओळीत जो निष्कर्ष कोकण कृषी विद्यापीठाने नोंदविला आहे तो म्हणजे यावर्षी सरासरी ८५ ते ९०टक्के उत्पादन कमी येऊ शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा लागवडीखालील एकूण क्षेत्र ३४ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी उत्पादनक्षम असलेले २५,६०२ हेक्टर आहे. सरासरी हेक्टरी तीन टन आंब्याचे उत्पादन गृहीत धरले तर ७६,८०६ टन उत्पादन मिळू शकते. रत्नागिरीमध्ये आंब्याचे क्षेत्र अधिक आहे. एकूण आंबा लागवडी खालील क्षेत्र ६६,८५५०हेक्टर असून उत्पादनक्षम क्षेत्र ६२ हजार २८० हेक्टर आहे. उत्पादन क्षम क्षेत्रातील सरासरी उत्पादन हेक्टरी तीन टन अपेक्षित असते.(असे संशोधन संचालकांचे मत आहे) त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लाख ८६ हजार ८४० टन आंबा उत्पादन अपेक्षित असते.
सुप्रसिद्ध हापूस
कोकणातील रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या दोन जाती सुप्रसिद्ध आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण उत्पादन क्षम क्षेत्र ८७ हजार ८८२ हेक्टर आहे आणि प्रमाणबद्ध तीन टन हेक्टरी उत्पादन गृहीत धरले तर दोन लाख ६३ हजार ६४६ टन उत्पादन होऊ शकते. यापैकी पाहणी समितीच्या निष्कर्षानुसार नव्वद टक्के उत्पादन घटले तर केवळ २६ हजार ३६४ टन आंब्याचे उत्पादन यावर्षी मिळू शकेल आणि नुकसान मात्र दोन लाख ३७ हजार २८२ टनाचे होणार आहे. या हिशोबाने अंदाज केला तर यावर्षी कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे असाच निष्कर्ष काढावा लागेल.
बदलत्या हवामानामुळे झालेल्या परिणामी जे काही निष्कर्ष निघाले आहेत. त्यावरून आंबा उत्पादकांना हेक्टरी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शिवाय काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणी सुद्धा त्यांनी पुढे ठेवलेल्या आहेत.
आंबा उत्पादक, काजू उत्पादक आणि मत्स्य व्यवसाय करणारे शेतकरी हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. संकटात राज्य सरकारने तातडीने आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने २३ मार्च रोजी मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत बंद करण्यात येणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी ओरोस (सिंधुदुर्ग ) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चामध्ये केली.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या मोर्चात भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा शासनाकडे मांडल्या असून मी स्वत : सर्व परिस्थितीची पाहणी केली असून ९० टक्के नुकसान झाले असल्याचे सांगितले. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या सोबत आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्य मागण्या मार्गी लावण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
चार प्रमुख मागण्या
बदलत्या हवामानामुळे तुडतुडे, फळमाशी तसेच विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकावर मोठा परिणाम झाला असून मोहोर करपल्यामुळे उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे राज्य व केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी पुढील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
१) आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी. तसेच आंब्यासाठी हेक्टरी पाच लाख रुपये आणि काजूसाठी हेक्टरी तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.
२) खते, किटकनाशके आणि बुरशीनाशके पुरवणाऱ्या काही कंपन्यांकडून बोगस औषधे तसेच खते मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीस आणली गेल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत कृषी विभागामार्फत सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी.
३) देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र स्थापन करून एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान, रोगनियंत्रण व आधुनिक शेतीविषयक माहिती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे.
४) आंबा आणि काजू या पिकांना हमीभाव (Minimum Support Price – MSP) जाहीर करण्यात यावा. उसाप्रमाणेच या पिकांनाही किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळेल व बाजारातील चढ-उतारापासून त्यांचे संरक्षण होईल.
हवामान बदलाचा जसा फटका सोयाबीन, कापूस, ज्वारी आधी पिकांना बसतो. त्याचप्रमाणे कोकणातील थांबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आंबा उत्पादनामध्ये चढ-उतार दिसतो आहे. गेल्या २०१५ या वर्षाच्या हंगामात आंबा उत्पादन प्रचंड झाले होते. त्यानंतर तशा प्रकारचे उत्पादन गेली दहा वर्षे झालेले नाही. त्यामध्ये सातत्याने चढ उतार आहेत. शिवाय अवकाळी पावसाने आंबा उत्पादकांच्यावर कधी संकट कोसळेल हे सांगता येत नाही. राज्य शासनाने आता हवामान बदलाच्या परिणामांचा सखोल अभ्यास तातडीने करून पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी किमान आधारभूत भाव न मिळाल्याने जो तोट्यात गेलेला आहे. तो पूर्णपणे संपूर्ण जाईल आणि शेती करणे कठीण होईल. शेतकरी हा वर्ग नष्ट होईल का अशी भीती तयार झालेली आहे. कदाचित पुढील काही वर्षांमध्ये ती सत्यात देखील उतरली तर आश्चर्य वाटायला नको. हे आगामी येणारे संकट लक्षात घेऊन हवामान बदलाचा होणारा परिणाम याचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभाग वार हवामान बदलाचा होणाऱ्या संभाव्य परिणामांची काळजी घेणे, त्याविषयी शेतकऱ्यांना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अद्यापही एकादे संशोधन केंद्र स्वतंत्रपणे नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. देवगडचा किंवा रत्नागिरीचा हापूस आंबा हा जगमान्य आहे. अशा हापूस आंब्याची लागवड फक्त याच परिसरात होऊ शकते. त्या परिसराचे हवामान, तपमान आणि त्यात होणारे बदल याचा सातत्याने अभ्यास करून नवीन वाण देखील आणण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
