मुक्तीसंग्रामातील सर्वच क्रांतीवीरांना शतशः नमन 🙏🙏
निवृत्ती सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
9423180393, 8668779597.
मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम म्हणजे भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासातलं एक धगधगतं पान ! फार पूर्वीपासूनच संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या अधिपत्याखाली गेलेला होता…! जर का इतिहासात बरंच मागे गेलं तर भारतावर खूप पूर्वीपासून मुगलांनी आक्रमणे केली. बऱ्याचदा लढाया जिंकल्या आणि हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचे प्रस्थ वाढत गेले. हैदराबाद स्टेट म्हणजेच पूर्वीचं निजाम राजवटीतलं एक खूप मोठं भारतातलं बलाढ्य संस्थान ! मुगलशाहीमध्ये सुद्धा दिल्लीनंतर निजामाचीच सत्ता भारतात बळकट होती हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. मानवतावादी विचारांनी व्यापलेले सर्वच धर्मांचे तत्त्वज्ञान आहे परंतु स्पर्धेमुळे आणि वैयक्तिक स्वार्थापोटी बऱ्याच राज्यकर्त्यांनी त्यांना तिलांजली दिली.
त्यात आणखी व्यक्तिपरत्वे राज्यकारभाराचे अनेक बदल घडतात आणि ते विचार एका पिढीतून पुढच्या पिढीकडे संक्रमण करताना हळूहळू घडणारे बदल कालांतराने खूपच आश्चर्यकारक दिसतात. अशाच काही साम्राज्यवादी विचारसरणींनी अनेक लढाया, युद्ध व चढाओढ या कारणांमुळे निजामासारखे विघातक वृत्तीचे आणि स्वार्थी राज्यकर्ते तेव्हा चांगलेच फोफावले.
जात- धर्म – समाज कोणताही असो मानवतावादी विचार असले म्हणजे ते सर्वांनाच मान्य असतात. परंतु निजामाने हळूहळू त्याच्या रझाकारांच्या मदतीने मराठवाड्यातील सर्वच जनतेवर अन्याय अत्याचार सुरू केले. आणि झालं उलटंच, सर्वांनाच त्याच्या वागणुकीचा तिटकारा वाटू लागला. त्याचे वैयक्तिक असलेले विचार प्रजेला मान्य आहेत- नाहीत याचा निजामाने कदापिही विचार न करता एका अर्थाने त्याने जनतेची मोठ्या प्रमाणात पिळवणूकच केली. इंग्रजांचं भारतावर राज्य होतं परंतु ते मिळवत असताना जवळपास ५६५ संस्थाने स्वतंत्रपणे नांदत होती म्हणजेच या संस्थानांवर इंग्रजांचा कोणताही अधिकार नव्हता. जुन्या काळात तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर अशी वेगवेगळी धोरणे राबवून त्यांनी संस्थानांना सुद्धा हतबल केलेले होते. परंतु खूप सार्या राजा महाराजांनी इंग्रजांना त्यांचे स्वतःचे अस्तित्व आणि मानमरातब टिकवून ठेवण्यासाठी वेगळीच गळ घातली. म्हणूनच मधला मार्ग म्हणून इंग्रजांनी ही संस्थाने भारताअंतर्गत जरी असली तरी काही अटी शर्तींवर स्वतंत्र ठेवली. जर का भारताचा नकाशा आपण बघितला तर अगदी पोटचा गोळा सांभाळावा अगदी तसंच भारतानं निजामाच्या संस्थानाचं चोहोबाजूंनी संरक्षण केलं ! एवढं असूनही त्याला कशाचीच कदर नव्हती ! हे सगळं तो त्याच्या हटवादी भूमिकेमुळे व बाहेरून मिळणाऱ्या विध्वंसक वृत्तीच्या खतपाण्याने करत होता हेही भारताला बऱ्यापैकी समजलं. परंतु बऱ्याचदा मोठा भाऊ म्हणून दुर्लक्ष केल्यासारखं भारत करत होता. निजामाला स्वतःच्या धनदांडगेपणाचा खूपच गर्व होऊ लागला आणि त्याचं कृतीत रूपांतर त्याचे रझाकार जनतेशी करत होते.
भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याबरोबरच सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थाने विलीनीकरणाचं फर्मान काढलं! लगेचच छोटी छोटी ५६२ संस्थाने भारतात सामील झाली मात्र जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद हे तीन मात्र भारतात येईनात ! थोड्याच दिवसांत काश्मीरचा राजा हरिसिंग आणि जुनागढचा नबाब यांनी शरणागती पत्करली आणि ही दोन संस्थाने भारतात विलीन झाले. मात्र काही केल्या हैदराबादचा निजाम कुणाचंही ऐकेना! मराठवाड्यातील अंतर्गत वाद पेटला, जनता आम्हाला भारतात सामील करा या भावनेने पेटून उठली. रझाकारांच्या छळाला सर्वच लोक त्रस्त झाले होते. एकूणच हैदराबादच्या गादीवर हा सातवा निजाम म्हणजे खूपच मुरब्बी, राजकारणी आणि अहंकारी होता. हैदराबादवर स्वतःचं राज्य म्हणल्यावर त्याने स्वतःची दळणवळण व्यवस्था, गंगाजळी, प्राथमिक सुविधा, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे संबंध हे सर्व जुळवून ठेवलेलं होतं. भारताबाहेर असलेल्या त्याच्या संबंधांमुळे तो स्वतःचं वर्चस्व सिद्ध करू बघत होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ.वाघमारे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने निजामाविरुद्ध एक प्रचंड लढा उभा केला. उस्मानिया विद्यापीठात शिकत असलेल्या सर्वांनीच तिथल्या शिक्षणावर पाणी सोडले.
निजामाविरुद्ध महाराष्ट्र परिषद सुद्धा उतरली आणि देश गीतांमधून देशभक्त निजामाच्या अमानुष छळांचे कारनामे गाऊ लागले! गावागावात निजामाच्या अत्याचारांचे बोल मनमोकळेपणाने व्यासपीठावर लोक बोलायला लागले. महिलांनीही रझाकारांच्या वाईट नजरांबाबत मुक्ती संग्रामातील क्रांतिवीरांना दाहकता सांगितली! आपल्या मायमाऊलीची केलेली विटंबना आपल्याच डोळ्यांसमोर बघवणे हे कोण सहन करणार ? म्हणून सर्वच जण निजामाच्या विरोधात रस्त्यावर उतरले !आता नाही तर पिढ्यानपिढ्या अत्याचार सहन करत जगावं लागणार हे सर्वांना कळून चुकलेलं होतं म्हणून आता थांबायचं नाही अशी खूणगाठ प्रत्येकानेच बांधली होती. अशाप्रकारे सहनशीलतेचा अंत संपल्याची कल्पना मराठवाड्यातील सर्वांनाच आली आणि बघता बघता संघर्षाच्या मशाली चोहीकडे पेटल्या.
सरदार वल्लभभाई पटेलांनी जनतेचा कौल आणि भारतीय एकात्मता या दोन्ही गोष्टी समोर ठेवून अगदी कणखर भूमिका घेत हैदराबादच्या निजामाविरुद्ध कारवाईचं पहिलं पाऊल उचललं. बेधडकपणे भारतीय सैन्याला शास्त्रशुद्धपणे पाच बाजूंनी पाचारण करत एकेक प्रांत जिंकून तिथल्या सरकारी कचेऱ्यांवर तिरंगे फडकू लागले! आणि बघता बघता पाच दिवसातच संपूर्ण हैदराबाद संस्थान भारताच्या अधिपत्याखाली आलं…! लाल हिरव्या चंद्रकोरीतला निजामाचा झेंडा खाली उतरून त्या जागी डौलाने तिरंगा फडकू लागला आणि चोहीकडे देशभक्तीपर गीतांचे सूर कानी येऊ लागले. सरदार वल्लभभाई पटेलांसोबत प्रत्येक भारतीयाने बघितलेलं एकसंघ भारताचं स्वप्न याच दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी साकार झालं…!
निजाम शरण आला पण वाकडं बोट केल्याशिवाय नाही हेही तितकंच खरं. पुढे भाषावार प्रांतरचनेत मराठवाडा हा महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण भाग बनला मात्र भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात सर्वात शेवटी कठीण परिस्थितीत कुणाला स्वातंत्र्य मिळाल असेल तर तो म्हणजे मराठवाडा…! तसं पाहिलं तर मराठवाड्याला अगदीच सहजासहजी मिळालं असं काहीच नाही. स्वातंत्र्य मिळताना सुद्धा खूपच मुक्तीसंग्राम ताणला गेला.अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणूनच मराठवाड्यातील प्रत्येकासाठीच हा ‘मुक्ती संग्रामदिन’ स्वातंत्र्य इतकाच प्रिय आणि मोलाचा आहे हे मला अभिमानानं सांगावसं वाटतं …!
मुक्तीसंग्रामातील सर्वच क्रांतीवीरांना शतशः नमन 🙏🙏
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
