वाचकांना समृद्ध करणारी संपादनदृष्टी
मराठी वाङ्मयीन नियतकालिकांच्या गर्दीत आशयाची उंची, संपादनाची शोधक दृष्टी आणि सांस्कृतिक बांधिलकी या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम क्वचितच दिसतो. ‘नव अनुष्टुभ’च्या सप्टेंबर–डिसेंबर २०२५ च्या जोड अंकाने मात्र ही त्रिसूत्री समर्थपणे साधली आहे. प्रा. प्रमोद मुनघाटे यांच्या सर्जक संपादनातून साकारलेला हा भरगच्च अंक केवळ वाचनानंद देत नाही, तर मराठी समाजाच्या सांस्कृतिक संवेदनांना नव्याने जागवतो—नियतकालिक म्हणजे केवळ लेखसंग्रह नव्हे, तर विचारांची आणि कलाभानाची जपणूक करणारी चळवळ आहे, याची ठाम जाणीव करून देतो.नंदकुमार मोरे
मराठी नियतकालिकांच्या वाटचालीत ‘नव अनुष्टुभ’ एक महत्त्वाचे नियतकालिक आहे. या नियतकालिकाची मागील वीस वर्षांपासूनची वाटचालही उल्लेखनीय आहे. याच्या ताज्या म्हणजे, सप्टेंबर-डिसेंबर, २०२५ च्या जोड अंकाचे संपादन प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी अथिती संपादक म्हणून केले आहे. सुमारे २०० पृष्ठांचा हा भरगच्च अंक संपादनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. संपादकाकडे नवी आणि शोधक दृष्टी असेल तर कशा पद्धतीचा नावीन्यपूर्ण मजकूर वाचायला मिळतो, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
या अंकामध्ये काही कविता, कथा, लेख आणि एक परिसंवाद असा भरगच्च मजकूर आहे. त्यातील काही लेख रसग्रहनपर आणि समीक्षणात्मक आहेत. काही संशोधन आणि अनुभव कथनपर आहेत. ‘सर्व प्रश्न अनुत्तरीत’ असे शीर्षक असलेल्या सदरात आजच्या काही नियतकालिकांच्या संपादकांचे विचारप्रवृत्त करणारे अनुभव आहेत. त्यामध्ये गीताली वि. म., रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, गणेश विसपुते, अरुणा सबाने, प्रफुल्ल शिलेदार आणि आसाराम लोमटे हे आजचे महत्त्वाचे लेखक-संपादक सहभागी झाले आहेत. या सदरातील चिंतन महाराष्ट्राच्या वर्तमान सांस्कृतिक वास्तवतेचे भान देते. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिलेला ‘दुस्तर हा घाट’ हा लेख प्रत्येक मराठी माणसाने वाचला पाहिजे. प्रफुल्ल शिलेदार आणि गणेश विसपुते यांचीही भूमिकाही मुद्दाम समजून घेतली पाहिजे. मराठी नियतकालिकांची वर्गणी फार नसते. परंतु, तीही भरायचे दातृत्व किंवा दृष्टी मराठी माणसाकडे दिसत नाही. जवळपास तेरा कोटी लोक मराठी बोलतात असे गृहीत धरले, तर त्यातील हजार लोकही एखाद्या नियतकालिकाची वर्गणी भरत नाहीत, हे किती चिंतनीय आहे.
येथे ज्या संपादकांनी आपले अनुभव लिहिले आहेत, ते सर्वच महत्त्वाचे आहेत. कारण नियतकालिके सांस्कृतिक सजगता असलेला समाज निर्माण करू शकतात. विचारांना चालना देऊ शकतात. लिहिणाऱ्या आणि गंभीर विचार करणाऱ्या लोकांचा वर्ग निर्माण करू शकतात. कलावादी मन घडवू शकतात. जीवनात पोटापाण्याचा उद्योग प्रत्येकाला करावाच लागतो. परंतु, जीवन संपन्न करण्यासाठी एखाद्या कलेशी, वाचनाशी जोडून घेतले तर ते सुंदर आणि आनंदी होऊ शकते. चित्रकला, संगीतादि कलांचा परिचय, साहित्यातील विविध लेखन प्रकरांची जाण, वैचारिक लेखनातून बौद्धिक मशागत या गोष्टी फार सीमित वर्गात चालतात. त्याला जर व्यापकत्व आले, तर आपल्या भाषेत लिहिणाऱ्या आणि विचार करणाऱ्या, भवताल समजून घेणाऱ्या लोकांची संख्या वाढू शकते. परिणामी समाज अधिक सुसंस्कृत-संपन्न होण्याकडे वाटचाल होईल. याबद्दलचे या सदरातील चिंतन फार मौलिक आहे.
नागपूर येथील रघू नेवरे यांचे मुखपृष्ठ, त्यांची इतर दोन अमूर्त चित्रे आणि मनोगतही चित्रकलेची दृष्टी घटवण्यास साहाय्यभूत आहे. राजू महाजन यांची रेखाचित्रे या अंकातील लेखांना दृश्यरूप देताहेत. वरती म्हटल्याप्रमाणे कलेची दृष्टी घडवणारे काही लेख या अंकात आहेत. त्यापैकी ‘चित्रकलेच्या क्षेत्रावर ए आय चा प्रभाव’ हा चित्रकार पल्लवी पंडित यांचा लेख, सुयोग देशपांडे यांच्या ‘व्हाया सावरगाव खुर्द’ या नाट्य निर्मितीची गोष्ट, किरण येले यांचा पटकथा लेखनावरील लेख खूप नवं काही देणारा आहे.
या अंकातील सर्वात उल्लेखनीय लेख अमित भगत यांचा आहे. ते पुरातत्त्वशास्त्रातील अभ्यासक आहेत. त्यांचा ‘कथा दोन गावांची’ हा लेख म्हणजे इतिहास लेखनाचे एक प्रारूप आहे. हा अभ्यासपूर्ण लेख भारतातील खेड्यांचे वेगळेपण सांगतोच. शिवाय खेडे हे अभ्यासाचे एक प्रारूप आणि व्यापक क्षेत्र असल्याचेही सूचन करतो. भगत यांचा हा लेख इतिहासातील विस्मयचकीत करणाऱ्या गोष्टी समोर आणणारा आहे. वाचक त्यामधील लोकांचा इतिहास वाचून शब्दश: थक्क होतो. योजना यादव कथा प्रारंभीच एक वाचनानंद देते. तर निसर्ग आणि माणसाचे सूक्ष्म निरीक्षण टिपणारी अनिल साबळे यांच्या ‘खोडवा’ या आगामी कादंबरीतील एक अंश वाचकांना येत असलेल्या नव्या चांगल्या कलाकृतीची चाहूल देतो. ऐश्वर्या रेवडकर यांचे नव्या प्रदेशातील रिपोर्टाज स्टाईलचा ललितलेखही एक अनवट वास्तव समार आणतो.
याशिवाय प्रा. रणधीर शिंदे यांचा ‘दिलीप धोंडो कुलकर्णी’ या अलक्षित कवीवरील लेखही भगत यांच्याप्रमाणेच साहित्यातील उत्खनन आहे. या लेखात वाङ्मयीन आस्था असलेल्या चारसहा मित्रांकडून एकत्रितपणे स्वत:बरोबर समष्टीला देत असलेले साहित्यिक भान अनुभवण्यासारखे आहे. डॉ. सिसिलिया कॉर्व्हालो यांनी मांडलेला ख्रिस्ती मराठी साहित्याचा लेखाजोखा अभ्यासनीय आहे. तर सांस्कृतिक व वाङ्मयीन व्यवहारातील प्रदूषण समोर आणणारा श्रीकांत साहेबराव देशमुख यांचा लेखही विचारप्रवृत्त करणारा आहे. राहुल पुंगलिया, दासू वैद्य, गणेश कनाटे, एकनाथ पाटील, अंजली धमाल, पद्मरेखा धनकर, सुचिता खल्लाळ, सुनीता झाडे, सारिका उबाळे आणि मेघराज मेश्राम यांच्या कविताही वाचनीय आहेत. नव्या कविता वाचनाचा आनंद देणाऱ्या आहेत.
खरेतर ‘नव अनुष्टुभ’चे मागील तीन चार विशेषांक संग्राह्य झाले आहेत. जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त काढलेला जयवंत दळवी विशेषांक, कथा विशेषांक आणि प्रमोद मुनघाटे यांनी संपादित केलेला हा ताजा (सप्टेंबर ते डिसेंबर २०२५) चा जोड अंक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांची स्थिती हा नेहमी चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिला आहे. वाचकांची वर्गणी भरून अंक घेण्याची उदासिनता, योग्य मजकूर वेळेत उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी आणि अंकाचे आर्थिक गणित अशी तिहेरी कसरत करीत काही नियकालिके तग धरून आहेत. त्यामध्ये ‘नव-अनुष्टुभ’ हे एक महत्त्वाचे नियतकालिक आहे.
प्रमोद मुनघाटे यांनी संपादिक केलेला हा ताजा अंक वाचकांना समृद्ध करणारा आहेच. शिवाय प्रा. मुनघाटे यांच्या सर्जक संपादनदृष्टीचा उत्कृष्ट असा आविष्कारही आहे.
पुस्तकाचे नाव – नव अनुष्टुभ
संपादक – शीतल पावसकर-भोसले
अतिथी संपादक – प्रमोद मुनघाटे
किंमत – १५० रुपये
(पुस्तकासाठी संपर्क : ८३१७२६५७०५)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
