October 18, 2024
मराठी बोली भाषा कवितालेखन स्पर्धा २०२४ चे आयोजन
Home » Privacy Policy » मराठी बोली भाषा कवितालेखन स्पर्धा २०२४ चे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

मराठी बोली भाषा कवितालेखन स्पर्धा २०२४ चे आयोजन

सातारा – मराठी भाषेत काव्य लेखन करणाऱ्या सर्व कवी व कवयित्री यांना कळविण्यात येते की मराठी बोली भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ काम करीत आहे. महाराष्ट्रातील मराठी बोली भाषा, संस्कृती व आदिवासी बोलीभाषा यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी भाषामंडळ कार्य करते. या उद्दिष्टाची पूर्ती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन विद्यापीठात केले जात आहे. त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून मराठी बोली कविता लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

फक्त मराठीच्या विविध बोली भाषेतून लिहिलेल्या कवितांसाठी ही स्पर्धा असून कोल्हापुरी, चंदगडी, मराठवाडी, वऱ्हाडी ,बेळगावी, मालवणी, मॉरिशस मराठी, झाडी बोली, तंजावर मराठी, बागलाणी, नंदुरबारी, डोंगरागी, जामनेरी, खान्देशी, अहिराणी, माणदेशी, आदिवासी भाषा तसेच कोंकणी या स्वतंत्र भाषेतील कवितांचा देखील या स्पर्धेत समावेश करण्यात येईल. या शिवाय मराठी भाषेचा उपयोग ज्या ज्या बोलीत होतो त्या त्या बोली भाषा मधील कविता या स्पर्धेत सहभागी करून घेतल्या जातील.ज्या बोली भाषा संपुष्टात येताना दिसत आहेत अशा इतर बोलीतील कविता देखील सहभागी करून घेतल्या जातील.

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे,
मराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

कविता हा मनाचा उत्कट आविष्कार असतो, तसेच कविता ही एक कला देखील आहे. आपण ज्या परिसरात वाढतो तिथल्या बोली या आपले भावजीवन समृद्ध करीत असतात. कधी कधी आपल्या स्थानिक बोलीभाषेला आपण साहित्य आविष्कारात कमी स्थान देत असतो. वास्तविक आधुनिक काळात देखील परंपरेने चालत आलेले व नवीन तयार होणारे बोलीतील अनेक शब्द मागे राहतात. त्या बोलीतील शब्दांचा वापर न झाल्यास ते लोप पावत जातात. अशा बोलीभाषेतील शब्दांचे, अर्थाचे जतन होण्यासाठी, तसेच बोली भाषेला महत्व प्राप्त करून देण्यासाठी मराठी बोली कवितालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बोलीभाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठीच्या या कवितालेखन स्पर्धेत आपण सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे.

बोलीभाषेतून लिहिलेल्या व परीक्षकांनी उत्कृष्ट ठरविलेल्या पहिल्या तीन कवितांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५००० रुपये द्वितीय क्रमांकास ४००० रुपये व ,तृतीय क्रमांकास ३००० रुपये असे पारितोषिक असेल. तसेच उत्तेजनार्थ दहा पारितोषिके असून प्रत्येकास ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. कवींनी पाठवलेल्या कवितेतील प्रत्येक कवीच्या एका कवितेची निवड करून प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी कविंनी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, मराठी विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा या पत्त्यावर २० नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत पाठवाव्या. एका कवितेसाठी १०० रुपये इतके प्रवेश शुल्क असून 9890726440 या मोबाईल नंबरवर फोन पे, गुगल पे द्वारा पाठवावेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading