काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि प्रोत्साहित झालेल्या लेखकाचा समृद्ध लेखन प्रवास कसा झेपावत जातो याचे सुंदर चित्रण म्हणजे सर्जनशीलतेचे साहित्यिक संचित असलेले ‘ पत्रामागची गोष्ट ‘ हा ग्रंथ होय.
डॉ. स्नेहल तावरे
साहित्यिक, कलावंत, राजकीय क्षेत्रातील आणि अन्य मान्यवरांबद्दल अनेकांच्या हृदयात एक विलक्षण आपुलकीचे स्थान असते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर , कलाकृतीवर अपार प्रेम करणारी त्यांची चाहती मंडळी असतात. असेच एक सह्रदयी , प्रेमळ , तरुण, तडफदार व्यक्तिमत्त्वाचे , आघाडीचे लेखक सुनील पांडे यांनी जोपासलेल्या छंदाचे एक साहित्यिक संचित ‘ पत्रामागची गोष्ट ‘ या ग्रंथाच्या रूपाने महाराष्ट्रातील रसिकांना उपलब्ध करून दिले आहे.
महाविद्यालयीन जीवनात वाचनाचा छंद जोपासणाऱ्या सुनील पांडे यांनी विविध क्षेत्रातील नामवंतांना वयाच्या विसाव्या वर्षांपासून पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांना तत्परतेने उत्तरे दिली तर काहींनी उशीर केला पण उत्तर दिले. या पत्रमैत्रीतूनच अनेकांशी त्यांचे चांगलेच सूर जुळले. मधल्या काळात सुनील पांडे लेखन करू लागले, त्यांच्या कथा, लेख विविध मासिकांतून , दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या. त्या वाचून त्यांना काही साहित्यिकांनी पत्रे पाठवली , त्यांचे अभिनंदन केले आणि एक वेगळा उलटा गौरवास्पद प्रवास सुरू झाला.
वयाच्या ४५ व्या वर्षांपर्यंत त्यांना ज्यांचे पत्रव्यवहारतून प्रेम , मार्गदर्शन मिळाले , त्याचा चालता बोलता इतिहास त्यांनी ‘ पत्रामागची गोष्ट ‘ या ग्रंथातून सर्वांसाठी खुला केलेला आहे. काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि प्रोत्साहित झालेल्या लेखकाचा समृद्ध लेखन प्रवास कसा झेपावत जातो याचे सुंदर चित्रण म्हणजे सर्जनशीलतेचे साहित्यिक संचित असलेले ‘ पत्रामागची गोष्ट ‘ हा ग्रंथ होय. मला खात्री आहे या संचिताचे मराठी भाषक सहर्ष स्वागत करतील.
पुस्तकाचे नाव – पत्रामागची गोष्ट
लेखक – सुनील पांडे
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन पुणे
पाने ३६६
किंमत : ७०० . सवलत मूल्य : ४५० रुपये
पुस्तकासाठी संपर्क : 9423643131
