२५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, यावर काम करत आहोत. स्त्रियांना माणूस म्हणून वागवलं जावं इथून हा संघर्ष आहे. ८ मार्च हा मॉडर्न हळदीकुंकू कार्यक्रम नाहीय, हे लक्षात घ्या. उपभोक्ता नावभांडवली शक्तीने असले उद्योग सुरू केले आहेत, यातून स्त्रिया तोडणे हाच प्रयत्न आहे.
डॉ. प्रज्ञा दया पवार
ईश्वरपूर (विश्वास सायनाकर साहित्यनगरी) : आज आपल्यावर अलगाववादी, हिसंक अजेंडा लादला जातोय. जेव्हा समाजात धोके निर्माण होतात तेव्हा लेखकाने सजगपणे आपली भूमिका पार पाडायला हवी. लोकशाही अखेरच्या घटका मोजत असताना एकाधिकारशाही अस्तित्वात येते आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्या त्याचेच निदर्शक असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, ईश्वरपूर शाखा तसेच राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने आयोजित ३० व्या मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. तहसील कार्यालय चौकातून ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. सु. धो. मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, जिल्हा प्रतिनिधी दशरथ पाटील, कवी सुरेश मोहिते प्रमुख उपस्थित होते. यावेळी राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्काराने रश्मी पदवाड-मदनकर, आलोक जत्राटकर, कृष्णा पाटील, सचिन अवघडे, सोनिया पाटील, प्रा. डॉ. सूरज चौगुले यांना सन्मानित करण्यात आले. ‘आर्याबाग‘, ‘अक्षरधारा’, ‘अक्षरदान’, ‘पुरुषस्पंदन’ या दिवाळी अंकांच्या संपादकांनाही सन्मानित करण्यात आले. प्राचार्य संपतराव जाधव लिखित हरिपाठ, कवयित्री स्वाती पाटील लिखित निळी सावळी नव्हाळी, सुलभा गायकवाड यांच्या रंगतरंग आयुष्याचे या पुस्तकांचे प्रकाशन झाले. इनरव्हील क्लबच्या संगीता शहा आणि योगिता पाटील यांचा सत्कार झाला.
डॉ. प्रज्ञा दया पवार म्हणाल्या, “शहरांची नावं बदलून इतिहास कापून काढण्याचे काम सुरू आहे. अल्पसंख्याकांना दुय्यम समजण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. हिंदू मुसलमान अलगाववाद कशासाठी ? महापुरुष कशासाठी लढले? असा प्रश्न पडतो. याला इतिहास म्हणत नाहीत. आज इराणवर अमेरिकेने युद्ध लादले आहे. आंतरराष्ट्रीय नितीमत्तेला हरताळ फसला गेला आहे. हे जगभर सुरू आहे. हजारो निरपराध बळी गेलेयत. आधारलेले दिवस नष्ट होत नाहीत. भयंकर विनाशकारी पर्वात आपण आलेले आहोत. अवघा जग फॅसिस्ट विचाराकडे झुकताना आपल्या पायाखाली काय जळते आहे याचा विचार करावा लागेल. यात सर्वाधिक बळी स्त्रिया जात आहेत. स्त्रियांनी कायम युद्धविरोधी भूमिका घेतली आहे. सर्जनशील माध्यमांचा वापर करून त्या ओरडून सांगतायत. ग्रहाला सर्वाधिक विनाशाच्या खाईत पुरुषी सत्तेने आणले आहे. भगिनीभावाला तडे जात आहेत. स्त्रियांच्या विरोधात स्त्रियाच उभ्या असलेल्या पाहून भगिनीभाव भोंगळ बाब असल्याचे जाणवत आहे. स्वातंत्र्यानंतर आजही भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. स्त्रीला खासगी मालमत्ता मानली जाते. जसजसे तळाशी जाऊ, तशी भीषणता, तीव्रता आणि दाहकता वाढत गेलेली दिसेल.”
त्या म्हणाल्या, “२५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा केला जावा, यावर काम करत आहोत. स्त्रियांना माणूस म्हणून वागवलं जावं इथून हा संघर्ष आहे. ८ मार्च हा मॉडर्न हळदीकुंकू कार्यक्रम नाहीय, हे लक्षात घ्या. उपभोक्ता नावभांडवली शक्तीने असले उद्योग सुरू केले आहेत, यातून स्त्रिया तोडणे हाच प्रयत्न आहे. आताच्या सरकारला तर सत्संगात जाऊन बसणाऱ्याच महिला हव्या आहेत, हे धोके वेळीच ओळखले पाहिजेत. परिवर्तनाला मागे सारणाऱ्या महिलांनी हे लक्षात घ्यावे. आपण मनुस्मृतीचे वाहक बनणार नाही याची काळजी घ्या. जे वाहक बनत असतील त्यांना बाजूने काढण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. स्त्रीच्या स्वायत्त अस्तित्वाचा बळी जातोय हे वास्तव आहे. त्यांच्या गुंतागुंतीचे प्रश्न वाङ्मयीन स्तरावर आणले पाहिजेत. इतिहासाचा अन्वेषक दृष्टीने वेगळा धांडोळा घेण्याची गरज आहे.”
त्या म्हणाल्या, “फॅसिझमचा काळ येतो तेव्हा काही लेखक व्यवस्थेचे समर्थक बनतात तर काही व्यवस्थेला विरोध न करता लेखण्या म्यान करतात आणि लेखकीय आत्महत्या करतात. तर तिसऱ्या गटातील लेखक व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतात. हा तिसरा गट सूक्ष्मदर्शकने शोधावा इतका कमी झालाय. कोणतीही भूमिका न घेणे ही भूमिका व्यवस्थाधार्जिणी असते. आज राजरोसपणे हुकूमशाही बुलडोझर फिरवते आहे. या काळात कथित निरपेक्ष भूमिका घेणे चुकीचे आहे. सरकारी समित्या, पुरस्कार मिळवणारे जागोजागी सरकारचरणी लीन झालेले लेखक, हे लाभार्थीप्रणित लेखक आहेत. सांस्कृतिक विश्व निकोप ठेवण्याचे आणि एजंटांना जाब विचारण्याचे काम कायम स्त्रियांनी केले आहे आणि यापुढेही करावे.”
रश्मी पदवाड, सुलभा गायकवाड यांची भाषणे झाली. स्वागताध्यक्ष शैलजा पाटील यांनी परिसरातील सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेतला. डॉ. दीपक स्वामी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य अर्चना थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. लता ऐवळे, सुरेश साळवे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. बी. एस. पाटील, आर. डी. सावंत, दि. बा. पाटील दीपा देशपांडे, एकनाथ पाटील, राजा माळगी आदी उपस्थित होते.
इनरव्हील संगीता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या पुढाकाराने तहसील कार्यालय चौकात ग्रंथदिंडी काढण्यात आली. टाळ मृदंगाच्या निनादात निघालेल्या ग्रंथदिंडीमुळे सांस्कृतिक वातावरणनिर्मिती झाली. प्रा. अरूणादेवी पाटील, नगरसेविका पुष्पलता खरात, शुभांगी शेळके, सोनाली माळगी, मीनल दीक्षित यांच्यासह बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
