कवितेची निर्मिती प्रक्रिया व्याख्यान आणि साहित्य रसिकांशी बातचीत
छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषद मराठीतील प्रमुख लेखक, कवी, नाटककार यांच्याशी रसिकांचा संवाद घडून आणण्यासाठी साक्षात या उपक्रमाचे आयोजन करत असते. यावेळी या उपक्रमात नामवंत कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार 7 मार्च रोजी सायं. 5.30 वा. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मराठीतील प्रमुख लेखक कवी आणि नाटककार यांच्याशी संवाद साधणारा साक्षात हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील विख्यात साहित्यिकांना यासाठी निमंत्रित करताना या कार्यक्रमात त्यांचं त्यांच्या लेखन प्रवासाविषयी, साहित्यिक भूमिकेबद्दल व समकालीन लेखक कवींच्या लेखनाविषयी भाष्य अपेक्षित असते. त्यानंतर निमंत्रित साहित्यिकाशी रसिकांचा संवाद ठेवला जातो. या कार्यक्रमात कवी कांडर स्वतःच्या काव्य निर्मितीच्या प्रवासाविषयी, लेखन भूमिकेविषयी आणि समकालीन लेखक कवींविषयी भाष्य करणार आहेत.
कवी अजय कांडर हे मराठीतील आजचे महत्त्वाचे कवी असून त्यांनी प्रयोगशील कविता लिहिली आहे सातत्याने त्यांनी दीर्घ कविता लिहिली असून त्यांचे हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी हे तीन दीर्घ कवितेचे संग्रह बहुचर्चित आहेत. त्यातील हत्ती इलो आणि युगानुयुगे तूच या दोन संग्रहांवरील नाटके त्यांची बहुचर्चित ठरली आहेत. यातही युगानुयुगे तूच या नाटकाचे प्रयोग सध्या मुंबईच्या रंगभूमीवर सातत्याने सादर होत आहेत.
तर आवानओल हा त्यांचा सर्व दूर पसरलेल्या कष्टकरी बायांचं जगणं मांडणारा काव्यसंग्रह लक्षवेधी ठरला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पर्यावरणासंदर्भात कठोर भाष्य करणारी कविता लिहून मराठी ग्रामीण कवितेलाच बळकटी दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी अजय कांडर यांना साक्षात या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
