जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच, की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याचे हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायां जाय ।।६२६।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला, तरी त्याचा त्याला काय उपयोग ? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान, जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जें जें काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो.
जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे. प्रगतीच्या वाटा आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे, हेही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच.
देहाच्या सुखासाठी ही सारी धडपड सुरूच आहे; पण हे सुख क्षणभंगूर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल, असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते, हेही खरे आहे, पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची, हे समजून घेणे आवश्यक आहे.
जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच, की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याचे हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल.
ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरुपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.
आत्मज्ञानाचा शोध घेत आहोत. मग हे आत्मज्ञान प्राप्त कसे होते हे समजून घ्यायला नको का ? स्वतःजवळच आहे पण दिसत नाही अशी आपली अवस्था झाली आहे. यासाठी स्वतःजवळची ही वस्तू शोधणे महत्त्वाचे आहे. स्वतःजवळची वस्तू डोळसपणे पाहायला हवी. त्याची अनुभुती घ्यायला हवी. म्हणजेच आपण आत्मज्ञानाकडे वाटचाल करू शकू. आत्मज्ञानी झाल्यानंतरही त्या आत्मज्ञानचा योग्य उपयोग करता आला नाही तर ते ज्ञान व्यर्थच आहे. इतरांना त्या ज्ञानाचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच त्या ज्ञानाच्या संवर्धन होईल. यासाठी इतरांनाही त्या ज्ञानाची अनुभुती द्यायला हवी. यातून त्यांनाही आत्मज्ञानी करायला हवे. अन् ही परंपरा वाढवायला हवी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
