खांबाडा – सध्या महाराष्ट्राच्या काव्यप्रांतात अतिशय चर्चेचा विषय झालेल्या कवितेच्या घराच्या उपक्रमात एक नव्या व विशेष अशा उपक्रमाची भर पडली आहे. कवितेसाठी वाहिलेल्या शेगांव (बु.), ( ता. वरोरा जि. चंद्रपूर ) येथील कवितेच्या घरात महाराष्ट्रातील कवींच्या दर्जेदार कवितासंग्रहाचा सन्मान होणार आहे. या सन्मानार्थ तीन पुस्तकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती कवितेचे घरचे कार्यवाह डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.
कवितेच्या घराचे देण्यात येणारे तीन पुरस्कार असे –
१. बापुरावजी पेटकर कवितासंग्रह पुरस्कार डॉ. माधुरी मानवटकर, चंद्रपूर यांच्यातर्फे ५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह,
२. बापुरावजी पेटकर गझलसंग्रह पुरस्कार श्रीकांत पेटकर, कल्याण यांच्यातर्फे ५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह,
३. बापुरावजी पेटकर बालकवितासंग्रह पुरस्कार, किशोर पेटकर, नागपूर यांच्यातर्फे ५ हजार रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह.
तरी कवींनी १ जानेवारी २०२४ ते ३० जुलै २०२५ या काळात प्रकाशित झालेल्या (प्रथम आवृत्ती) आपल्या कवितासंग्रहाच्या / गझलसंग्रहाच्या / बालकवितासंग्रहाच्या तीन प्रती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, ( कार्यवाह, कवितेचे घर) शाहू ले आऊट, प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाजवळ, वर्धा ४४२००१ या पत्त्यावर ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवाव्या असे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील दोन प्रसिद्ध कवींच्या / समीक्षकांच्या मार्फत कवितासंग्रहाचे परीक्षण करण्यात येईल. ७ सप्टेंबर २०२५ रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असून दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कवितेचे घर, शेगांव (बु.), त. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते हे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी कवींनी आपले साहित्य पाठवावे असे आवाहन श्रीकांत पेटकर, कल्याण ९७६९२१३९१३ ( संस्थापक, कवितेचे घर ), किशोर पेटकर, नागपूर ८८०६२४७६८६ ( संकल्पनाकार, कवितेचे घर ), डॉ. प्रमोद नारायणे, वर्धा ९८५०३०९६६५ ( कार्यवाह, कवितेचे घर ) डॉ. संदीप भेले, बदलापूर ९८८१४२२४५३ ( कार्यक्रम समन्वयक, कवितेचे घर ), सूर्यकांत पाटील, वरोरा ९४२२१९१५२४ ( प्रसिद्धी प्रमुख, कवितेचे घर ) यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.