ईश्वरपूर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या येथील ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय २०२५ पुरस्कारांची घोषणा केली आहे.
कादंबरी विभागात रश्मी पदवाड – मदनकर (नागपूर) लिखित ‘कायांतर’, कवितासंग्रह विभागात अजीम नवाज राही (साखरखेर्डा – बुलडाणा) यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ पुस्तकाला तर कथा/ ललित विभागात आलोक जत्राटकर (कोल्हापूर) लिखित ‘ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे’ आणि कृष्णात पाटील (तासगाव) लिखित ‘नियतीचे खटले’ पुस्तकांना विभागून जाहीर करण्यात आला आहे.
राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी पुरस्कारांची घोषणा केली. ते म्हणाले, “महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. या संमेलनात बापूंच्या नावे उत्कृष्ट लेखक, कविंच्या साहित्यकृतींना सन्मानित करण्यात येते. येत्या ८ मार्चला, महिलादिनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली ३० वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षी राज्यभरातून आलेल्या पुस्तकांतून तज्ज्ञांची समिती त्याची निवड करते. यावर्षी पासून मुख्य पुरस्कारांसह वरील प्रत्येक साहित्यप्रकारातील एका ‘लक्षवेधी साहित्यकृतीची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार कादंबरी विभागात माहुली (ता. खानापूर) येथील सचिन फक्कड अवघडे यांना ‘फक्कड’ पुस्तकासाठी, कवितासंग्रह विभागात येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील सोनिया पाटील यांना ‘थिजलेल्या माणुसकीचा गहिवर’ पुस्तकासाठी तर कथासंग्रह विभागात प्रा. डॉ सूरज चौगुले यांना ‘काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा’ या पुस्तकासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.
रोख रक्कम, बुके, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. .या संमेलनाला कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
‘आर्याबाग’ दिवाळी अंक प्रथम
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा ईश्वरपूर आयोजित आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा २०२५चाही निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत विविध दर्जेदार दिवाळी अंकांनी सहभाग नोंदवला होता. ‘आर्याबाग’ या दिवाळी अंकाला प्रथम क्रमांक मिळाला असून विश्वास कणेकर यांनी त्याचे संपादक म्हणून काम पाहिले आहे. द्वितीय क्रमांक ‘अक्षरधारा’ या अंकाला मिळाला असून त्याचे संपादन स्नेहा अवसरीकर यांनी केले आहे. तर तृतीय क्रमांक ‘अक्षरदान’ या दिवाळी अंकाला प्राप्त झाला असून मोतीराम पौळ हे त्याचे संपादक आहेत. तसेच लक्षवेधी दिवाळी अंक म्हणून ‘पुरुषस्पंदन’ (संपादक हरीश सदानी) आणि ‘अक्षरमुद्रा’ (संपादक दीपक चिद्दरवार) या दिवाळी अंकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
