March 13, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
सुनील पांडे यांचे ‘पत्रामागची गोष्ट’ हे पत्रसंग्रह पुस्तक – स्नेहवर्धन प्रकाशन पुणे
Home » पत्रामागची गोष्ट : सांगे एक छंदिष्ट !
मुक्त संवाद

पत्रामागची गोष्ट : सांगे एक छंदिष्ट !

स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले `पत्रामागची गोष्ट’ हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचण्यात आले. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. संगीत ऐकण्याचा, गाण्याचा, वाचनाचा, लेखनाचा, खेळण्याचा, पोहण्याचा तर कुणाला एकांतात बसण्याचा असे नानाविध छंद असतात. महाराष्ट्रातील नीरा गावी असाच एक छंदिष्ट आहे, ज्याला लेखक,‌ गायक, संगीतकार, नट- नट्या अशा विविध क्षेत्रातील लोकांना पत्र लिहिण्याचा छंद आहे. भ्रमणध्वनीवरील विविध संवाद माध्यमांच्या अगोदर पत्र हे एक लोकप्रिय माध्यम होते. त्यामुळे ही व्यक्ती न चुकता पत्रं पाठवून संबंधितांना प्रोत्साहित करित असे. ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त साहित्यिक सुनील पांडे !

नागेश शेवाळकर, पुणे [९४२३१३९०७१]

अनेक पिढ्यांनी लहानपणापासून ‘मामाचे पत्र’ हा खेळ खेळला आहे, आज ‘मामाचे पत्र हरवले’ अशा परिस्थितीत लेखक म्हणतात,’पत्र म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी पोहचवणे…’ लेखक पुढे लिहितात,’पुस्तकांच्या माध्यमातून अनेक मान्यवर लेखकांना मला पत्रातून भेटता आले… बोलता आले. हे माझे किती मोठे भाग्य!‌’ पुस्तकाची पाठराखण डॉ. स्नेहल तावरे यांनी केली आहे.

सुनील पांडे यांना त्या-त्या व्यक्तिंकडून आलेल्या पत्रोत्तराचा संग्रह म्हणजे ‘पत्रामागची गोष्ट !’ या संग्रहात एकूण ११६ व्यक्तिंच्या पत्रांचा कलावंतांची पत्रे, मान्यवरांची पत्रे, राजकीय क्षेत्रातील पत्रे साहित्यिकांची पत्रे, काही स्नेहीजनांची पत्रे या चार विभागांमध्ये समावेश केला आहे. हा आगळावेगळा प्रयोग निश्चितच दखलपात्र आहे. सुनील पांडे यांना तीनपेक्षा अधिक पत्रं पाठविणारे पत्रलेखक म्हणजे प्रा. ग. प्र. प्रधान, श्री. ना. पेंडसे तसेच शिरीष पै (प्रत्येकी ४पत्रं), विनोदी लेखक वि. आ. बुवा यांनी पाठविलेल्या पत्रांची संख्या १९, वि. म. कुलकर्णी तसेच रवींद्र पिंगे (प्रत्येकी ९ पत्रं),‌ चंद्रकांत महामिने (१५ पत्रे), प्रा. दत्ता भगत (७ पत्रं), प्रवीण दवणे (१४ पत्रं), सर्वाधिक ४० पत्रे लिहिणारे लेखक म्हणजे सुधीर सुखटणकर, रा. रं. बोराडे (६पत्रं), डॉ. द. ता. भोसले (५पत्रं),‌ अशोक स. वरुडे (५पत्रं), वर्षा शिदोरे (६पत्रं), तुषार पाटील (५पत्रं) यावरून लक्षात येईल सुनील पांडे यांनी किती ‘अक्षर’ मित्र मिळविले आहेत ! तसेच एक लक्षणीय बाब म्हणजे प्रत्येक लेखकाची डिजिटल स्वाक्षरी पत्राच्या शेवटी आहे.

ही सारी पत्रे वाचताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अनेक लेखकांना सुनील पांडे यांनी एक गोष्ट आग्रहाने सांगितली आहे, ती म्हणजे त्या लेखकाने आत्मचरित्र लिहावे. पांडे यांच्या या सुचनेची अनेकांनी दखल घेऊन उत्तर दिले आहे.

‘तू आत्मचरित्राबद्दल लिहिले आहेस. ते आठवणींच्या स्वरूपात लिहिण्यास हल्लीच सुरुवात केली आहे.’ इति- वि.आ. बुवा.

रत्नाकर मतकरी लिहितात,’आत्मचरित्राचा विचार मी करणार नाही; परंतु माझ्याविषयी काहीकाही मी वेळोवेळी लिहिले आहे. आपल्या लिखाणातून लेखक नकळत स्वतःविषयी सांगत असतोच.’

चंद्रकांत महामिने लिहितात,’आत्मकथेच्या आपल्या सुचनेवर विचार चालूच असतो.’ महामिने पुढे लिहितात,’मंझील अब दूर नहीं हैं ! महबुवा की तरह वह राह देखती रही है !’ सुधीर सुखटणकर हे त्यांच्या स्वभावानुसार लिहितात, ‘मी आत्मचरित्र लिहिण्यापेक्षा तूच लिही. माझ्या तऱ्हेवाईकपणाचा तुला हा अनुभव आला तसे आणखीनही काही मासलेवाईक प्रसंग तुझ्या खजिन्यात जमा असतीलच !’ विजया वाड यांनी’माझे आत्मचरित्र काही मी लिहिणार नाही.’ हे स्पष्टपणे लिहिले आहे.अस्मादिकालाही लेखक पांडे यांचा सातत्याने ‘आत्मचरित्र लिहा’ असा आग्रह आहे.

संबंधिताला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र पाठवताना लेखक पांडे यांनी त्यांच्याकडे लाडिकपणे ‘केक’ची मागणी केली असल्याचे वाचण्यात आले. वि. आ. बुवा त्याबाबत लिहितात,’आपण मला पाठवलेल्या पत्रात केक पाहिजे हं ! असं लिहिलं आहे, ही इच्छा मात्र पूर्ण होणार नाही. कारण आमच्या घराण्यात हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, ब्राह्मणी चालीरीती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत.’ तर भा. द. खेर पांडे यांना वाढदिवसाचा केक नव्हेतर पेढे खायला येण्याचे निमंत्रण देतात.

त्याचप्रमाणे सुनील पांडे यांना इतक्या व्यक्तिचे पत्ते मिळविण्यासाठी किती धडपड करावी लागली हे आत्माराम भेंडे यांनी लिहिल्यामुळे लक्षात येते, ‘माझ्या आणि प्रकाशकाच्या गलथानपणामुळे माझा पत्ता पुस्तकात नाही. यामुळे आपणास झालेला त्रास समजू शकतो.’

लेखक सुनील पांडे यांच्या वाचनवेडाचे एक वैशिष्ट्य अनेक लेखकांनी उद्धृत केले आहे. त्यातील प्रमुख नोंदी, शं. ना. नवरे यांची कादंबरी साठवेळा, लक्ष्मीकांत तांबोळी यांची कादंबरी सत्तावीस वेळा, सुधीर सुखटणकर यांचे पुस्तक एकशे एक वेळा वाचल्याची नोंद अनेक लेखकांनी घेतली आहे.

पत्रामागची गोष्ट या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पत्रलेखकाच्या कार्याची माहिती अगोदर देऊन नंतर त्यांची पत्रे छापली आहेत. लेखक पांडे हे आगळ्यावेगळ्या लेखन उपक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक लेखकांनी त्यांच्या लेखनाचा, लिखाण शैलीचा उल्लेख केला आहे. यशवंत पाटणे लिहितात,’आपल्या हातांना प्रतिभेचा स्पर्श आहे. जे ग्रंथांच्या माध्यमातून विचारांचे धन दिले आहे. ती खरी समाजाची उर्जा आहे. सन्मानाने जगण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते हेच कार्य आपले हात करताहेत. आपणास ‘चंदनाचे हात’ माझे पुस्तक भेट देत आहे.’

वि. म. कुलकर्णी यांच्या मते,’आपले हात म्हणजे एक निर्मळ मनातील आपला निर्व्याज आरसाच वाटला. अशा प्रेमळ भावनेच्या दर्शनाने मनास उल्हास वाटला.’

चंद्रकांत महामिने यांना पांडे यांच्या स्नेहवर्धक पत्रव्यवहाराची झिंग कोणत्याही पार्टीहून अधिक धुंद वाटते. लेखक सुनील यांच्या अन्य छंदाविषयी न. म. जोशी यांनी लिहिलंय,’तुमची प्रवासाची आवड यातून अधोरेखित होतेच पण तुमचा प्रवास हा नुसता स्थलदर्शनाचा नसतो तर पंचेद्रियांनी अनुभवाच्या ओंजळीत स्मरणीय क्षण साठवत तुम्ही शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध या पंचतत्वांनी मोहरत जाता याचा वाचकालाही अनुभव येतो.’

विजय तेंडुलकर यांनी पांडे यांना दिलेला सल्ला सर्वांसाठी उपयुक्त आहे,’फक्त मराठी वाचू नकोस. हिंदी वाचू लाग. हिंदी साहित्यातही (नाटकात नव्हे) खूप चांगले घडते आहे.’

सुनील पांडे यांच्या पत्रातील त्यांच्या कथेला सकाळच्या अमृतकलश स्पर्धेत एक ग्रॅम सोन्याचे बक्षीस मिळाले हे वाचून सुधीर सुखटणकर आनंद व्यक्त करतात.‌ अशोक वरुडे हे पांडे यांच्या लिखाणातील कथानक मांडणी, प्रसंग खुलवण्याची कला,‌ शेवटी दिलेला अनपेक्षित हास्यकारक धक्का ही वैशिष्ट्ये खूप आवडल्याची नोंद करतात. लता महाजन पांडे यांच्या एका वाक्याबद्दल, ‘माणसापेक्षा कागद फारच सोशीक असतो. कितीही लिहिले तरी तक्रार नाही. खरंच फार मोठा जीवनाचा आशय यात आहे.’ असे गौरवोद्गार काढतात.

डॉ. ज्ञानेश्वर थोरात हे सुनील पांडे यांच्यासाठी पु. ल. देशपांडे यांचे वाक्य उद्धृत करतात, ‘साहित्यिकाचे थोरपण हे त्याच्या अनुभव घेण्याच्या सामर्थ्याइतकेच तो अनुभव जगाला साहित्यरुपाने देण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. ह्या साहित्य समीक्षा विधानाची सत्यता सुनील पांडे ह्यांच्या बाबतीत पुरेपूर सत्य आहे.’

नामांकित व्यक्तिची पत्र किंवा स्वाक्षरी संग्रही असावी यासाठी लेखक सुनील पांडे यांना विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागले. सुप्रसिद्ध नट दिलीप प्रभावळकर यांची स्वाक्षरी मिळावी,‌ पत्र यावे यासाठी पांडे यांनी अफलातून योजना आखली. त्यांनी प्रभावळकरांना पत्र लिहिले, ‘आपली काही पुस्तके घेण्यासाठी मी आपणास एक महिन्यांपूर्वी पाचशे रुपयांची मनिऑर्डर पाठवली होती. परंतु अद्याप आपली पुस्तके मला मिळाली नाहीत.’ वास्तविक पाहता असा कोणताही व्यवहार झालेला नव्हता. त्यानंतर प्रभावळकरांनी पाठविलेले पत्रही लेखकाने छापले आहे. परंतु आपली क्लृप्ती यशस्वी झाली ह्याचा पांडे यांना अवर्णनीय आनंद झाला.

लेखक पांडे पोस्टात तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी करत असताना पडेल ते काम करत. त्यांनी आपल्या वेदना पत्राद्वारे माधव कोंडविलकर यांना कळवल्या, एका पुस्तकातही त्यांनी सोसलेले सारे तपशीलवार लिहिले आहे. कोंडविलकर यांनी त्यांना सकारात्मक उपदेश केला आहे, ‘सुनील, कोणतेही काम हलके फुलके नसतात. एवढे मोठे महात्मा गांधी हातात झाडू घेऊन साफसफाई करीत असत. आपण तर किती लहान आहोत.’ एकंदरीत लेखक सुनील पांडे यांचा हा पत्रलेखनाचा छंद वाचकांना‌ नक्कीच आवडेल हे निर्विवाद!

पुस्तकाचे नाव – पत्रामागची गोष्ट : पत्र संग्रह
लेखक : सुनील पांडे {९८१७८२९८९८}
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
किंमत – ७०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गुलाम…

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

।। जिजाऊंचा पाळणा ।।

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading