बुधवार दि.२२ नोव्हेंबर २०२३
माणिकराव खुळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ
एक -दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता असुन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होवून बांगला देशकडेच त्याची वाटचाल असु शकते, असे वाटते.
ढगाळलेले एकादशीला तर पाऊस पौर्णिमेला
१. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व ७ आणि खान्देश व नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व १० तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अश्या महाराष्ट्राच्या एकूण (७+१०+६) २३ जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान (म्हणजे गुरुवार-शुक्रवार, २३-२४नोव्हेंबर,२ दिवस) केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता असुन अगदीच तूरळक ठिकाणी कुठे तरी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परंतु 👇
२. त्यानंतर म्हणजे शनिवार ते सोमवार, २५, २६, २७ नोव्हेंबर दरम्याच्या ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मात्र मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार (.२६ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला) पावसाचे वातावरण अधिक गडद होवून खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, ह्या जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे. मुंबईसह कोकणात ह्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मात्र अधिक असुन कालावधी ह्या तीन दिवसाचाच जाणवतो.
ह्या अवकाळी पावसाचे नेमके कारण काय?👇
३. तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टी समोर बंगालचा उपसागरात समुद्रसपाटी पासून तीन किमी उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरलेल्या ‘आस ‘ मुळे १५ डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या व तामिळनाडू व केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या जबरदस्त ‘ पुर्वी वारा झोता ‘ तून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे व चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून गुजराथ राज्य कव्हर करून उत्तर महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर दरम्यान डांगी परिसरातून उतरणार आहे त्यामुळे वर अ. क्रं.२ परीक्षेत्रात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी (ता.२५ नोव्हेंबरला) वायव्य उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्यप्रदेश, गुजराथ मधून उत्तर महाराष्ट्रापर्यन्त होणार असल्यामुळे ह्या दोन्हीही प्रणल्यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर २३ ते २७ नोव्हेंबरच्या ५ दिवसाच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे.
४. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या एक -दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता असुन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होवून बांगला देशकडेच त्याची वाटचाल असु शकते, असे वाटते. त्यामुळे त्या दरम्यान मीडियातून कदाचित चक्रीवादळाच्या बातम्या आदळतील. परंतु महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम असणार नाही, ह्याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी, असे वाटते.
