June 1, 2025
Alamatti Dam Height issue Raju Shetti meets Karnataka CM Basavraj Bommai
Home » अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध
काय चाललयं अवतीभवती

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध

महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल.

राजू शेट्टी

माजी खासदार,
स्वाभिमानी शेतकरी संघटना

कोल्हापूर ,सांगली व बेळगांव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा. तसेच कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून कमानी बांधकाम करावे अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचेकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.


श्री. शेट्टी म्हणाले, सीमाभागामध्ये महापुराने यंदाही थैमान घातले. या महापुराची पाणीपातळी कमी होण्यासही वेळ लागला. नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांसह शेतकऱ्यांच्या संसाराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ , २००६, २०१९ व २०२१ या महापुराचा विचार करता २०२१ च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलली असल्याचे जाणवून आले आहे.

कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यावर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पूलाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नद्यांच्या पात्रापासून दोन – दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात, म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते, असेही शेट्टी म्हणाले.

महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे ६ पूल , हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील ५ पूल व दुधगंगा -वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असून चिक्कोडी तालुक्यांतील अंकली – मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले, चिक्कोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली, असेही शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले असल्याची माहिती दिली.

हा अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजनासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून निमंत्रीत केले जाईल असे बोम्मई यांनी सांगितले. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार संजय पाटील , आमदार कल्लाप्पाणा मग्यान्नावर , सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर व बेळगांव जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading