लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत हे इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व. ते बाबासाहेबांच्या विचाराचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते बंधुतुल्य मानत होते. पुरोगामी असणाऱ्या श्रीधर पंतांचा इतिहास आपण मात्र लोकांसमोर आणू शकलो नाही. म्हणून साहित्यिकांनी आपल्या इतिहासाकडे एककल्ली न पाहता सामाजिक समतेचा एक हत्यार म्हणून पहायला हवं.
- आंबेडकर चौक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अजय कांडर यांचे प्रतिपादन
- साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी – सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक असून आता सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन मिळत आहे. अशा काळात व्यवस्थेला शरण न जाणारे लेखक कवीच यापुढे चांगलं लेखन करू शकतो. नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे हे या प्रकारचे लेखन करणारे महत्त्वाचे लेखक होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित केले गेलेले आंबेडकर चौक साहित्य संमेलन ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
सिंधुदुर्ग सुपुत्र नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ कवी वीरधवल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आणि सांस्कृतिक कार्यकर्ते प्रा.एस. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या या संमेलनाचे उद्घाटन सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कवयित्री संध्या तांबे, अनिल जाधव, संमेलनाचे प्रमुख आयोजक मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांना नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यकर्ते अनिल जाधव यांना नाटककार सिद्धार्थ विष्णू तांबे कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर कवी वीरधवल परब यांच्या हस्ते प्रभा प्रकाशन प्रकाशित कवी हरिचंद्र भिसे लिखित रानपुराण या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तर संध्या तांबे यांच्या हस्ते लेखक समीर वेंगुर्लेकर यांच्या वारसदार कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.
आपण का लिहितो ? याचे भान लेखकाला नसेल तर तो वाहत्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन धार्मिक उन्मादी राजकारण करणाऱ्या राजकीय लोकांना मिळतो आणि लेखक फक्त लाभाच्या गोष्टींचा विचार करतो. आज अपवाद वगळता साहित्य क्षेत्रात असे लाभ उठविणाऱ्या लेखकांची संख्या वाढत असून या सगळ्या पार्श्वभूमीवर आंबेडकर चौक सारखी छोटी साहित्य संमेलने विचार मंथन घडवून आणत असतात. विशिष्ट अस्मिता कुरवाळण्याच्या या काळात फक्त माणूस म्हणून जगणे फार कठीण होत आहे, अशावेळी साहित्यकाने फक्त लिहून वेगळं राहण्यात अर्थ नाही तर सामाजिक भूमिका म्हणून आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे. हा लिहिण्याचा आणि बोलण्याचाही काळ आहे.
अजय कांडर
यावेळी बोलताना कांडर म्हणाले, बहुजन साहित्यिकांनी आपली साहित्यिक भूमिका काय आहे याचा फार गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. बहुजन साहित्यिकांना आपला इतिहास डोळसपणे पाहता यायला हवा. जर असं झालं असतं तर महात्मा फुले यांचे फक्त विचार न सांगता त्यांचे एकूण कार्य कर्तुत्व समाजासमोर आणण्यासाठी या साहित्यिकांनी प्रयत्न केले असते. महात्मा फुले फक्त कार्यकर्ते आणि विचारवंत नव्हते तर ते एक यशस्वी उद्योजकही होते. 1876 ते 1883 या सात वर्षाच्या कालावधीमध्ये ते पुणे महानगरपालिकेचे कमिशनर होते. आपण या त्यांच्या बाजू लोकांसमोर आणल्यात नाही. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत हे इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व. ते बाबासाहेबांच्या विचाराचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते बंधुतुल्य मानत होते. पुरोगामी असणाऱ्या श्रीधर पंतांचा इतिहास आपण मात्र लोकांसमोर आणू शकलो नाही. म्हणून साहित्यिकांनी आपल्या इतिहासाकडे एककल्ली न पाहता सामाजिक समतेचा एक हत्यार म्हणून पहायला हवं. सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे लेखन सामाजिक समता निर्माण करणार होतं. जाता नाही जात सारखं नाटक समाजातील जातीभेदावर भाष्य करताना समतेचा आग्रह धरते. म्हणून हा लेखक पुढील अनेक काळ टिकणार आहे. यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या साहित्य संमेलनाचे मोल फार मोठे आहे.
सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्यासारख्या अकाली लेखकाचं निघून जाणं, आम्हा मित्रांसाठी फार त्रासदायक ठरलं. आज त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्रांनी हे संमेलन आयोजित करून मोठा व्याप केला आहे. जातीवादी व्यवस्थेची उतरण अभेद्य आहे. ही वेदना सिद्धार्थ तांबे यांनी लेखनात मांडली. अल्प आयुष्यात त्यांनी ठोस लेखन केल. आंबेडकर चळवळी बद्दल ते साशंक होते. त्यांनी आपल्या चळवळीची दिशा स्पष्ट केली होती. आंबेडकर चळवळीला त्यांनी काउंटर केले होते. आंबेडकर चळवळीतही बाबा बुवा निर्माण झाले आहेत. असे सिद्धार्थ तांबे यांना वाटत होते. आज परिवर्तन चळवळीतील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी विभागली गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे संमेलन महत्वाचे आहे.
वीरधवल परब
उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर म्हणाले, नगरपालिकेच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात होणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. मधुकर मातोंडकर आणि विठ्ठल कदम यांच्या संकल्पनेतून आंबेडकर चौक साहित्य संमेलन आयोजित करून सावंतवाडी शहराच्या सांस्कृतिक चळवळीत नव्याने भर टाकण्यात आले आहे. जिथे बाबासाहेबांचा विचार असेल तिथे आम्ही कायम सोबत असू. व्यक्तिगत पातळीवर मी तुम्हाला मदत करेन परंतु शासनाच्या पातळीवर जे काही सहकार्य हवं ते करण्यासाठी आमचा पुढाकार असेल. आपण सर्वांनी महानगरपालिकेकडे कधीही मदतीची अपेक्षा बाळगावी.
यावेळी प्रा. एस. एन. पाटील, संध्या तांबे, अनिल जाधव यांनी विचार व्यक्त केले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी अरुण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. त्याला साहित्य रसिक आणि कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मधुकर मातोंडकर यांनी प्रास्ताविक केले. तर विठ्ठल कदम यांनी आभार मानले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा

‘डब्लूटीओ’च्या मंत्रिपरिषदेत भारताला मर्यादित यश