अशोक (वेणुगोपाल) ही चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रात फार मोठे नाव असलेली व्यक्ती आहे. १९७५ मध्ये कन्नड चित्रपटक्षेत्रात प्रवेश करून (हेण्णु, संसारद कण्णु) या चित्रपटात त्यांनी पहिली भूमिका केली. यानंतर त्यांनी सनादी अप्पण्णा, भाग्यवंतरु, रंगनायकी, क्रांतियोगी बसवण्णा, तायिय मडिलल्लि, चेल्लिद रक्त, दीप अशा अनेक चित्रपटांतून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री श्रीदेवी हिनेही त्यांच्याबरोबर अभिनय केला आहे. अर्धसत्य, दंडपिंडगळ, कथे, आघात, निक्षेप आणि गुप्तगामिनी या दूरदर्शनवरील कन्नड मालिकांमध्येही अभिनय केला आहे. कर्नाटक चित्रपट कामगार-कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विविध संघटनांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमेलनात भाग घेण्यासाठी फ्रान्स, स्विझरलँड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या देशांना भेटी दिल्या आहेत. अशोक (वेणुगोपाल) हे ‘रजनीकांत’चे परममित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘रजनीकांत’वरील कमालीच्या प्रेमापोटी माझा मित्र रजनीकांत या पुस्तकाचे कन्नडमध्ये लेखन केले आहे.
कन्नड पुस्तकाचे मुळ लेखक अशोक (वेणुगोपाल) यांचे मनोगत
मी शिवाजीला (रजनीकांतला) १९७४ मध्ये पहिल्यांदा पाहिले. मैत्री झाली. घट्ट मैत्री झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे पन्नास वर्षांचा काळ लोटला. या पन्नास वर्षांच्या प्रवासात मला ‘तो एक चमत्कार’ वाटत आला आहे. काळ्याकुट्ट रंगाचा, पोट सुटलेला, ब्रिस्टॉल सिगारेट ओढणारा, दारू पिणारा शिवाजी असा जागतिक कीर्तीचा होईल असे वाटले नव्हते. तमिळी लोकांचा तो आराध्यदैवत झाला आहे. चार दशके उलटून गेली तरी त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्याची कार्यक्षमता, त्याच्यातला सळसळता उत्साह थोडाही कमी झालेला नाही, हे मोठे आश्चर्य आहे. असे असूनही आम्ही जेव्हा एकमेकांना भेटतो, तेव्हा मी तोच ‘वेणू’ असतो आणि ‘तो तोच शिवाजी’ असतो. आम्हा दोघांची मैत्री इतकी वर्षे टिकून राहिली याचे सारे श्रेय त्याच्या मोठेपणालाच द्यावे लागेल, की माझ्या स्वभावाला द्यावे लागेल हे मला सांगता येणार नाही.
आम्ही शिकत असताना दहा रुपयांसाठी, वीस रुपयांसाठी धडपडणारा शिवाजी आज एका चित्रपटामागे कोट्यवधी रुपये कमावतो तरीही त्याला पैशाचा व्यामोह नाही. ही खरोखरच मोठी साधनाच आहे असे म्हणावे लागेल. याचा अर्थ तो पैशाला दुय्यम लेखतो असेही नाही. त्याने स्वतःवर पैशाला ताबा मिळवू दिलेला नाही. त्याला जेवढे महत्त्व द्यायचे, तेवढेच तो देत आलेला आहे.
राजकारणाबद्दल त्याच्या मनात निश्चित असे मत नाही. बहुतेक त्याची तीक्ष्ण बुद्धी आणि परिस्थितीचे आकलन करून घेण्याची असामान्य क्षमता हेच त्याचे कारण असावे. आरोग्याचे कारण, दैवी प्रेरणा ही कारणे माध्यमांना खुराकासारखी वाटत असावीत. भारताचे- त्यातही तमिळनाडूचे राजकारण शिवाजीला बारकाईने समजले आहे, तेवढे कुणालाच समजले नसावे. या सगळ्या गोष्टी तसेच शिवाजीचा असामान्य लौकिक आणि अलौकिक प्रतिभा लक्षात घेऊन मी हा सगळा विचार मांडलेला आहे. त्याचा आणि माझा दीर्घकाळचा मैत्रीचा अनुभव लक्षात घेऊन तो त्याच्या प्रतिभेचा आणि पैशांचा कसा वापर करेल, याबद्दलची काही निरीक्षणे मी मांडलेली आहेत.
शिवाजीबद्दल मला जेवढे समजले आहे, तेवढे मी लिहिले आहे. वाचकांना जर हे आवडले तर माझे श्रम सार्थकी लागतील. आम्हाला घडविण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे त्या श्री. राजा रामदास, श्रीमती उषा अरसु, श्री. जी. वि. शिवानंद, देवदास कनकल, प्रभाकर, गोपाली या सगळ्यांची या प्रसंगी आठवण येते. त्या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार.
अशोक (वेणुगोपाल),
ई-मेल : actorashok@yahoo.com
मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ. अमृत राघवेंद्र यार्दी यांचे मनोगत
‘चित्रपट’ या माध्यमामुळे समाजमनावर फार मोठा परिणाम घडून येतो. शिक्षण, साहित्य, संगीत, ललितकला, वृत्तपत्रे, ग्रंथनिर्मिती या क्षेत्रात आपापले योगदान देऊन भारतीय शिक्षणप्रेमींनी, लेखकांनी, संगीतकारांनी, कलाकारांनी, वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणि प्रकाशन संस्था चालवणाऱ्यांनी भारतीय समाजात परिवर्तनाच्या लाटा निर्माण केल्या. प्रत्येक माध्यमाचे स्वतःचे असे महत्त्व आहेच. त्याला पर्याय नसतो.
आजपर्यंतच्या चित्रपटांचा इतिहास पाहता भारतीय चित्रपटाच्या क्षितिजावर अनेक तारे झळकले. काहींनी तर आपल्या पायवाटा निर्माण केल्या तर काहींनी आपले राजमार्ग बनविले. दादासाहेब फाळके यांचे नाव कोण विसरू शकेल ?
दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रातील नट आणि प्रेक्षक यांचे खास असे नाते आहे. भारतातल्या इतर राज्यांमध्ये अशा प्रकारचे नट-प्रेक्षक यांचे नाते फारच थोड्या ठिकाणी पहायला मिळते. एम. जी. आर., जयललिता, शिवाजी गणेशन अशा नट- नट्यांना तिथले चित्रपटरसिक देवासमान मानत. दक्षिणेत चित्रपटगृहांवर गगनगामी उंचीचे नट-नट्यांचे कटआऊटस् लावून त्यांची पूजा करण्याचे वेडे प्रेम ही मोठी कोड्यात टाकणारी गोष्ट आहे.
या पुस्तकाचा केंद्रबिंदू हा रजनीकांत. शिवाजीराव गायकवाड हा रजनीकांत कसा झाला, त्याचे अत्यंत गरिबीतून एवढ्या मोठ्या नटापर्यंतचे खडतर जीवन कसे आहे हे सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. नटाने समाजाभिमुख असावे असे वाटायला लावणारे अनेक नट मराठी आणि कन्नड चित्रपटक्षेत्रात होऊन गेले.
रजनीकांत हा अभिनेता, निर्माता आणि पटकथालेखक अशा विविध भूमिका तेवढ्याच समर्थपणे निभावणारा रजनीकांत हा आजच्या घडीचा जागतिक कीर्तीचा तमिळनाडूतला सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याची जडणघडण कशी होत गेली, याची नोंद या लेखनात घेतली आहे. अशा या समाजाभिमुख अभिनेत्याकडून समाजाच्या, रसिकांच्या कोणत्या अपेक्षा आहेत हे मांडण्याचा अशोक यांचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे.
बेळगावचे नाट्य, चित्रपटप्रेमी आणि सक्रिय चळवळीत भाग घेणाऱ्या डॉ. डी. एस. चौगले यांच्या अथक प्रयत्नांमुळे मी या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे कार्य करू शकलो. वाचक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी आशा आहे.
डॉ. अमृत राघवेंद्र यार्दी, धारवाड
भ्रमण : ७८२९००११८४ ई मेल : yardi.amrit@gmail.com
पुस्तकाचे नाव – माझा मित्र रजनीकांत
मुळ लेखक – अशोक (वेणुगोपाल)
अनुवाद – डॉ. अमृत राघवेंद्र यार्दी
प्रकाशक – विजय प्रकाशन www.vijayprakashan.com
फोन – 0712-2530539, 9822200283
किंमत ₹ २५०
