February 25, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Cover or representation of ‘Nagara’, the Banjara language epic by writer Eknath Pawar Naik highlighting global human values.
Home » ‘नगारा’ : बंजारा भाषेतील मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार
मुक्त संवाद

‘नगारा’ : बंजारा भाषेतील मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार

‘नगारा’ हे महाकाव्य म्हणजे केवळ शब्दांचे लेणे नसून एक वैचारिक अधिष्ठान आहे. वैश्विक मूल्यांचा जयघोष करणारा जीवंत दस्तावेज आहे. बंजारा भाषेतून ‘नगारा’ सारखी समृद्ध साहित्यकृती साकारल्याने एकनाथ पवार नायक यांनी मातृभाषेचा गौरव तर केलाच, पण मानवी मूल्यांचा ‘नगारा’ संपूर्ण विश्वात निनादण्याचा स्तुत्य कार्य केले आहे. हे महाकाव्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देणारे, प्रेरणा देणारे आणि माणुसकीची शिकवण देणारे ठरेल.

शिव कुमार नाईक

प्रख्यात साहित्यिक, विचारवंत आणि कवी एकनाथ पवार नायक लिखित ‘नगारा’ हे महाकाव्य बंजारा साहित्य विश्वातील एक माईलस्टोन आहे. साहित्य क्षेत्रात बंजारा भाषेतील ‘नगारा’ हे वैश्विक मानवी मूल्यांचे संवर्धन करणारे एक अभिजात महाकाव्य म्हणून प्रचिती येते. तेलंगणा येथील पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात कवी व विचारवंत सोमलाल नायक यासह देशभरातील विविध नामवंत साहित्यिक व विचारवंतांनी नगारामधील साहित्यप्रभा व मूल्यप्रज्ञेची पाठराखण केली आहे. तर गुजरात येथील प्रख्यात साहित्यिक डॉ. गोवर्धन बंजारा यांची प्रगल्भ अशी प्रस्तावना लाभली आहे.

‘नगारा’ हे शिर्षकच मुलत: ऊर्जा , न्याय, विजय, संघर्ष, शौर्य , अस्मिता आणि उत्तुंगतेचे प्रतीक आहे. तसेच गौर बंजारा संस्कृतीत ‘नगारा’ या वाद्य तंत्राला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच कवीने ऐतिहासिक संदर्भ घेऊन मानवी चेतनेला जागृत करणारे महाकाव्य बंजारा भाषेत रचले आहे. त्यातील आशय , आधुनिक नवप्रतिमा , सौंदर्यदृष्टी, मानवी मनाचा वैश्विक वेध आणि बंजारा साहित्याला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात या ग्रंथाने मोठी भूमिका साकारली आहे.

या महाकाव्याचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यातील ‘एक धरती, एक परिवार’ (One Earth-One Family) ही वैश्विक संकल्पना होय. कवीने वैभवशाली बंजारा समाजाच्या स्वर्णिम मातीतील शब्दांचा वापर करून जागतिक शांतता आणि मानवी कल्याणाचा संदेश दिला आहे. हे काव्य केवळ एका प्रदेशापुरते एका समुदायापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहणारा आहे. ‘नगारा’ मानवी मनाशी साद घालणारा आहे. उपेक्षितांच्या आवाजाचे जागतिकीकरण आणि विश्वबंधुत्वाचा, शांततेचा आणि विश्वबंधुत्वाचा निनाद हे नगाराचे वैशिष्ट्य आहे.

[ “म आब सावध वेतांळी
पेरणी करेवाळो छू
जमीनेनच पेलो ॲण्टी बायोटीक देतांळी सशक्त सुदृढ बंळायवाळो छू
बियाणो भी स्किलबेस , ह्युमनबेस अन् फ्युचरबेस बंळातांळी वोन ह्युमन व्हर्जनेर डोज देयेवाळो छू” ]

कवींनी सावधानतेचा पवित्रा घेऊन आधुनिकतेने माणूस पेरणी करण्याचा निर्धार केला आहे. पेरणीपूर्वी जमीनीलाच प्रतिजैविके देऊन सुदृढ व सशक्त बनवीणार आहे. आणि बियाणे सुद्धा कौशल्यपूर्ण , मानवतावादी , आणि भविष्यवेधी पेरण्याची तयारी केली आहे. त्यावर द्वेष , दहशत , हुकूमशाही , हिंसाचा प्रादुर्भाव होऊन हानी पोहचवू नये यासाठी नवे ह्युमन व्हर्जनचा बुस्टर डोज देणार आहे. आज जगरुपी तांडा अनेक संकटांच्या चक्रव्यूहात फसला आहे, दररोज नवी संकटे पुढ्यात निर्माण होत आहेत. या संकटांविरुद्ध झुंजण्यासाठी माणसाला माणूस बनविणारे विचार मी पेरत राहील. पाऊस पडेल, कांही बिया मातीशी नाळ जोडतील, कांही सडून जातील पण मी निरंतरपणे पेरत राहील. एकदिवस जरुर हिरवाईने नटलेल्या धरतीचे माझे स्वप्न साकार होईल, लोकसुद्धा सोबत करतील म्हणून जागृतीचा प्रतिक असलेला ‘नगारा’ मी बेधुंदपणे गर्जवत आहे.

कवीची ही सजगता आणि भविष्यकालीन आव्हांनाची जाणीव करून देणारी आहे.

वैभवशाली इतिहास आणि गौरवशाली वारसा लाभलेला गौर बंजारा समाजाची मातृभाषा ही इंडो आर्यन परिवारातील एक प्राचीन भाषा असून ती भारतभर बोलल्या जाते. प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांच्या ‘नगारा’ ने बंजारा भाषेला मूल्यजडीत वैश्विक आशयाची हृदयस्पर्शी अलंकाराने विभूषित केल्याने बंजारा साहित्याला देखील एक उत्तुंगता प्रदान केली आहे. ‘नगारा’ मधील आशय , विवेकदृष्टी अतिशय चिंतनशील आहे. मानवी जीवनातील दुःख, संघर्ष, निसर्गप्रेम आणि भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती या काव्यातून अत्यंत सौंदर्यपूर्ण पद्धतीने प्रकट होते.

वैश्विक विविधता आणि ‘ग्लोबल सिटीजन’चा प्रत्यय नगारा मधून येतो –

[ “नगारार सणभेरी गुंज छ सह्याद्री , विंध्याद्री, हिमालयेर खोळाखोळाम ;
नगारार रणभेरी नंवण करच चितोड , लोहगड , सेवागडेर एकेक पायरीन ;
नगारार मनभेरी पीवचं -सिंधु , लवणाद्री , भाग्यरथी , सतलज, मिसीसिपी , नाइल , थेम्स ए सप्तसरितारे पांळीन” ]

‘नगारा’ मध्ये वैश्विकता प्रतिबिंबित होत असतानाच भारतीय सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक मूल्यांबरोबर तांड्यातील लोकजीवन, आणि संस्कृतीचे दर्शन घडते, परंतु कवी तिथेच थांबत नाहीत. त्यांनी संविधानात्मक मूल्ये, वैश्विक नागरिकत्व आणि आधुनिक मूल्याधिष्ठित विचारांची सांगड आपल्या साहित्यातून घातली आहे. तक्षशिला विद्यापिठापासून ते अमेरिका , इंग्लंड मधील ऑक्सफर्ड, प्रिस्टन विद्यापीठाची वेध घेते. गंगा , सिंधू, लवणाद्री, भाग्यरथी या सरिताचा वेध घेत वोल्गा, नाईल, मिसिसीपी, थेम्सपर्यंत यातील कविता प्रवाहित होऊन वैश्विक मानवी मूल्यांचा संदेश देते.

“चमकेती बाटी मळेनी. रोवं जेती केनी राज मळेनी.” ( भावार्थ : घाबरल्याने भाकर मिळत नाही. अन् रडल्याने कोणाला सत्ता मिळत नाही.) अतिशय मार्मिक शब्दांत कवीने जीवनाचे वास्तव मांडले आहे. या महाकाव्यातील प्रत्येक शब्द हा एखाद्या चित्रासारखा उभा राहतो. विश्वव्यापी तांडा जीवन, समृद्ध भारतीय विविधता आणि भविष्यकालीन आव्हांनाची जाणीव वाचकाच्या मनाचा ठाव घेतात. बंजारा भाषेचा गोडवा आणि कसदार सर्जनशील लेखणीचा धारदारपणा यामुळे हे साहित्य ‘अभिजात’ श्रेणीत जाऊन बसते.

[ “इ लाखा बंजारारो टांडो
टांडेसी आछो आछो वागेस रं
दन डुबता लाखारी लदंळी थांबजाय.
दन निकळता लाखा नवे देसेन चलोजाय
लाखा थांबेवाळो कोनी ;
न तारेसारु न मारेसारु रं” ]

जीवनरुपी लदणी आणि आत्मारुपी लाखमोलाचा महानायक लाखा बंजारा रुपी आत्मा कधी निघून जाईल आणि लाखमोलाची लदेणी कधी थांबेल याचा नेम नाही, हे भल्या माणसा ! आता माणूस बन ! ही आर्त हाक, मानवी अस्तीवाचा जीवनविज्ञान अतिशय मार्मिक शब्दांत कवीने मांडले आहे.

‘नगारा’ हे महाकाव्य म्हणजे केवळ शब्दांचे लेणे नसून एक वैचारिक अधिष्ठान आहे. वैश्विक मूल्यांचा जयघोष करणारा जीवंत दस्तावेज आहे. बंजारा भाषेतून ‘नगारा’ सारखी समृद्ध साहित्यकृती साकारल्याने एकनाथ पवार नायक यांनी मातृभाषेचा गौरव तर केलाच, पण मानवी मूल्यांचा ‘नगारा’ संपूर्ण विश्वात निनादण्याचा स्तुत्य कार्य केले आहे. हे महाकाव्य येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिशा देणारे, प्रेरणा देणारे आणि माणुसकीची शिकवण देणारे ठरेल. बंजारा साहित्यातील हे मूल्यजडीत रत्न मानवी संस्कृतीच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण करणारे असून, त्याचे सौंदर्य त्याच्या निखळ मानवी दृष्टिकोनात दडलेले आहे. संकुचित राष्ट्रवाद किंवा सांप्रदायिकवादाच्या पलीकडे जाऊन ‘वसुधैव कुटुंबकम’ची यात मांडणी केली आहे. हे काव्य मानवी जीवनाला एका सूत्रात बांधण्याची ताकद ठेवते.

जगातील कोणत्याही कोपऱ्यातील शोषित, वंचित आणि कष्टकरी माणसाची वेदना ‘नगारा’मध्ये प्रतिबिंबित होते. मानवी कल्याणाचा हा जयघोष करणारा ग्रंथ आहे. युद्धाच्या छायेत असलेल्या जगाला शांतता आणि प्रेमाचा संदेश देणारे हे एक आधुनिक शांततासूक्त आहे. हे कवितासंग्रह म्हणजे केवळ अक्षरांचे लेणे नसून तो भविष्यातील ‘सुसंस्कृत मानवाचा’ एक जाहीरनामा आहे. सूर्याला ग्रहण लागले किंवा महाकाय ढग आडवा आला म्हणून सूर्याला दीर्घकाळ झाकून ठेवले जात नाही. अंतिमतः सत्याचाच विजय होतो. धर्म, जात, देव या बाबी माणसाने तयार केल्या पण तो “माणूस” का झाला नाही.

जगातल्या सर्व माणसाच्या रक्ताचा रंग लाल आहे, मग ही अमानवीय वृत्ती कोठे जन्म घेते ? हा अंतर्मुख करणारा प्रश्न करुन अमानवीय वृत्तीला कवीने इशारा दिला समाजव्यवस्थेचे चिंतनशील निरीक्षण करुन कमी शब्दात काव्यसंग्रहाची मौलिक घनता व उंची वाढविली आहे. साहित्य क्षेत्रात बंजारा भाषेतील या प्रगल्भ भविष्यवेधी आणि वैश्विक जाणीवेच्या महाकाव्याने एक अमिट ठेवा अधोरेखित केले आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला यातील ‘वन अर्थ वन फॅमिली’ आणि ‘ग्लोबल सिटीजन’ पासून अगदी तांडा जीवन पर्यंतचा हा मौलिक आलेख स्फुर्ती प्रदान करणारा आहे. बंजारा भाषेतील ‘नगारा’ या साहित्य मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार देत राहील.

साहित्यिक एकनाथ पवार नायक लिखित ‘नगारा’ हा काव्यसंग्रह मानवी आत्मज्ञान जागृत करून हृदयाला स्पर्श करतो. हा संग्रह मानवी मूल्ये आणि जागतिक कल्याणाचा विचार गुंफतो. ‘नगारा’ मानवी हक्क आणि सामाजिक न्यायासाठी बंजारा भाषेत एका नवीन शैलीत आवाज उठवतो.

खेतावत सोमलाल नायक, तेलंगणा (पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारत सरकार)


बंजारा भाषेतील ‘नगारा’ हा एक बहुआयामी आणि बहुप्रतिक्षित काव्यसंग्रह आहे. ही कृती निसर्ग, जीवन, इतिहास आणि समाजाच्या कणाकणाचे संकलन आहे. कवी ‘एकनाथ पवार नायक’ यांनी आपल्या मनातील विषयांचे काव्यात्मक पद्धतीने सविस्तर वर्णन केले आहे. या काव्यात समाजाची विचारसरणी आणि त्यांची तळमळ मांडली आहे, ज्याची आज समाजाला खूप गरज आहे. या काव्यातील प्रत्येक शब्द खूप मोलाच्या गोष्टी सांगतो.

लोकजीवनात परिवर्तन घडवण्यासाठी इतिहासाची जाण असणे आणि समाजाला दिशा देणे किती गरजेचे आहे, हे हा काव्यसंग्रह दर्शवतो. तांड्यापासून शहरापर्यंत जे काही चांगले-वाईट घडते, त्यावर कवी ‘एकनाथ’ यांचे बारीक लक्ष आहे. आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी माणसाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. हा संग्रह बंजारा भाषेच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देईल, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा !

डॉ. रामचंद्र रमेश आर्य (माजी संचालक, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली)


‘नगारा’ मधील कविता कधी समुद्राच्या खोलीसारखी शांत, तर कधी रणांगणावरील तलवारीच्या धारेसारखी धारदार वाटते. हा संग्रह फुलांसारखा सुगंध दरवळतो आणि विश्वकल्याणाचे भाष्य करतो. ‘एक पृथ्वी – एक कुटुंब’ ही जागतिक भावना देऊन द्वेष, हिंसा आणि अहंकाराचे ढग दूर करून नवीन प्रकाशाचे सामर्थ्य निर्माण करणे, हे कवीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मानवी मूल्ये आणि जनकल्याणाची सुवर्णधून ऐकवून हा संग्रह हृदयाचे तार छेडतो.

डॉ. गोवर्धन बंजारा (भाषा, साहित्य आणि संस्कृती तज्ज्ञ, गुजरात)


मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेसाठी जे जिवंत सिद्धांत आणि विज्ञान लागते, ते सर्व ‘नगारा’मध्ये पाहायला मिळते. गौर बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, भाषा आणि साहित्यासाठी हा संग्रह एक मार्गदर्शक दिवा ठरेल. या गौरवपूर्ण सर्जनशील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा.

मानससिंह बंजारा (बंजारा साहित्य संस्कृती तज्ज्ञ, भरतपूर, राजस्थान)


गोरबंजारा भाषा साहित्यामध्ये ‘नगारा’ आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि बुद्धीमान शैलीने पुरोगामी विचारांचे नेतृत्व करताना दिसत आहे. हे पाहून मनापासून आनंद होत आहे.

प्राचार्य जयसिंग जाधव (ज्येष्ठ लेखक, अकोला, महाराष्ट्र)


‘नगारा’ पहिल्याच झलकेत मन भरून टाकतो. यात स्वाभिमान आहे, आशय आहे, आशा आहे आणि इतिहास आहे. कवी एकनाथ पवार म्हणतात – ‘नगाऱ्याची रणभेरी सह्याद्री, विंध्याद्री आणि हिमालयाच्या कुशीत घुमत आहे; ही रणभेरी चित्तोड, लोहगड आणि सेवागडच्या पायरी-पायरीला नमन करत आहे.’ मला आशा आहे की हा कवितासंग्रह घराघरात पोहोचेल आणि साहित्यात मोलाची भर घालेल.

डॉ. के. बी. पवार, शिरसी, कर्नाटक


या पुस्तकात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूवर कविता सादर केल्या आहेत. सर्व कविता अप्रतिम असून त्या मनात विशेष भाव निर्माण करतात. साहित्याच्या क्षेत्रात असो वा सामाजिक कार्यात, एकनाथ पवारजींचे कार्य कौतुकास्पद आहे. गौर बंजारा साहित्याची प्रतिष्ठा वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डॉ. मंजुला चव्हाण (प्रसिद्ध लेखिका, बागलकोट, कर्नाटक)


पुस्तकाचे नाव – नगारा
लेखक – एकनाथ पवार नायक
प्रकाशक: नचिकेत प्रकाशन


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

केवळ खरा शिष्यच गुरुच्या ज्ञानाचा लाभार्थी

पावसाळ्यात उपयुक्त असणाऱ्या औषधी वनस्पती…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading