ग्रामीण कथेचं बळ : ‘सांगावा’
ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह मराठी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण करतो. गावकुसातील माणसांच्या वेदना, आशा आणि संघर्ष यांना ग्रामीण बोलीतून व्यक्त करत हा संग्रह वाचकाला अंतर्मुख करतो.
रवींद्र शिवाजी गुरव, 9822254047
सचिन वसंत पाटील यांचा सांगावा कथासंग्रह म्हणजे मराठी साहित्य विश्वातील अढळ ताराच होय. ‘मी एक साधा हात
जिद्दीला सलाम करणारा,
मी एक साधा पाय
पदोपदी साथ पेलणारा.’ असं म्हणत मी सांगावा या पुस्तकावर लिहायला सुरुवात केली. काय लिहू आणि काय ठेवू झालं. खाऊ का गिळू असे हे लेखनीतले अनमोल, हळूवार शब्द. हे शब्द फारच लडीवाळ आणि मौल्यवान आहेत. त्यामुळं यातून काय गाळावं हाच माझ्यापुढचा यक्ष प्रश्न सोडवत मी शब्द सांडत गेलो. त्याचं नंतर काय होईल? ही हूरहूर लागत पुढे झालो. मागे वळून पाहिलं तर ते रसपूर्ण परीक्षण झालेलं. त्यास कुणी रसग्रहण तर कुणी पुस्तक परिचयही वदेल.
“सांगावा” कथासंग्रहाची पाचवी आवृत्ती आनंद प्रकाशन, पुणे यांनी नव्या रंगरूपात प्रकाशित केली आहे. या मुखपृष्ठावर सुप्रसिद्ध चित्रकार वैशाली बाळासाहेब पाटील यांनी साकारलेले अप्रतिम प्रतिकात्मक चित्र आहे. ‘सांगावा’ कथेतील सखू माऊली ऊस तोडणीसाठी परगावाला गेलेल्या लेकाच्या चिंतेत आहे. तिच्या मनाला कोंभ फुटला आहे. मनोमन ती आपल्या लेकराची घोकनी लावून बसली आहे. यत्रतत्र सर्वत्र तिला आपल्या मुलाचाच भास आहे. आजुबाजूच्या माणसांतून, घटना प्रसंगांतून ती मुलाचा चेहरा पाहते. ती काही सांगू पाहते. ती आपल्या मुलाला कसला सांगावा धाडते ते वाचण्यासाठी बहराला आलेल्या उभ्या पिकात घुसल्यागत पुस्तकात शिरतच राहावंसं वाटतं. कथेतली सखू माऊली ऊस तोडणीला गेलेल्या पोरासाठी यशवदाकडनं, ‘जसा असचील तसा ये म्हणावं…’ असा सांगावा धाडते. तिचे हे शब्द काळीज पिळवटून टाकतात.
१२८ पृष्ठांच्या या पुस्तकात बारा कथा वाचकाच्या काळजापर्यंत सुख-दु:खाचा ‘सांगावा’ पोहोचवल्यावाचून रहात नाहीत. यातील एक-एक कथा म्हणजे नवरसांचा परिपाक आहे. जगण्याचं बळ पेरीत सुटते ही लेखणी. कथा हा वाड्.मय प्रकार लेखकानं ताकदीनं हाताळला आहे. ‘सांगावा’ हे कथासंग्रहाचे शीर्षक तर ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांच्या संग्रहाशी साम्य दाखवतं. इतकंच काय हा संग्रह त्याच तोलामोलाचा असून भविष्यात हा लेखक मराठी साहित्य आपल्या ताकदीप्रमाणे समृद्ध करणार हे नक्की. कथा लेखनाची स्वत:ची वेगळ्या धाटणीची पायवाट या लेखकानं चोखाळली असून ती इतरांसाठी हमरस्ता होणार आहे. ती वाट आणि हमरस्ताही त्यांच्याच लेखनीच्या मालकीचा झाला तर प्रस्थापितांच्या भुवया उंचवायला नकोत. साहजिकच पायवाट याच लेखकाच्या मालकीचा शब्दसाज लेवून दिमाखात मिरवत राहील.
यातील प्रत्येक कथा डोळ्यासमोर घडते असंच वाटतं. हे या कथासंग्रहाचं फलित आहे. सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण बोलीला परमोच्च स्थान या कथांमधून लाभले आहे. भूल मध्ये आपल्याच शेतातील पीक उद्धवस्त करणाऱ्या हणमा शेतकऱ्याची व्यथा अंधश्रद्धेवर ग्रामीण ढंगात शब्दआसूड ओढत शिरपा-हणमातील संवादातून मांडली आहे. पावना मधून आयत्यावेळी आलेल्या पाहुण्याला आश्रय देत त्याला चोर ठरवून पाळत ठेवणाऱ्या चुटपटणाऱ्या तातोबा आणि त्याच्या बायकोचं वर्णन केलं ते पावना पाहुणचार न घेता गेल्यानं.
मांडवझळ मधून भूक श्रेष्ठ ठरवत लाली कुत्रीला संजीवनी दिली आहे. सय मधला रावबा शेतकऱ्याचा लहानगा मुलगा सतू हरवून सापडतो. पण ते एक स्वप्न असल्याचं सांगून वाचकाला आनंदून सोडतो. चकवा ही विनोदी कथा बज्याच्या रूपानं काळजाची धडधड वाढवते. प्रसंगानुरूप बदलत जाते.
दाहक वास्तव मांडणारी, शेतकऱ्याला भिकेकंगाल करणारी वाट मनात घोळ घालत तीे वाटेसाठी पैसे, ऊस जाळून वाट लावून घेते. संभा इस्त्रीवाल्याची धग तर मालकाची हुकूमशाहीच दाखवते. बिचारा संभा उपाशीपेटी त्याच धगीत राबत राहतो. वाघमारे गुरूजींच्या वडिलांना न जुमानणारी, सेवा न करणारी त्यांची बायको आणि वडिलांची व्यथा पाहून मरणकळा सोसणारे गुरूजी मनातून हटत नाहीत. गावपांढरीचं ओझं हलकं करणारा रणजीत गावची ओढ लावतो. गावाशी नाळ जोडतो. परस्पर जमीन विक्री कागदावर सही घेणारा काळीज खाऊ निघतो तो शामूअण्णाचा सदू. बळी ही कथा वास्तव उभं करते. सर्वच कथा वाचून चिंतन करीत समरसून जगायला शिकवतात… जगा आणि जगू द्या… अगदी हाच ‘सांगावा’ घेऊन पुढं पुढं जातात. सचिन पाटील यांच्या ‘सांगावा’ मधील कथा मराठी ग्रामीण कथेचे बळ वाढविणाऱ्या आहेत हे नक्की.
कथेतील पात्रे वाचकाभोवती घुटमळत राहतात. ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची आशयसंपन्न प्रस्तावना व समीक्षक रवींद्र ठाकूर यांची पाठराखण या पुस्तकास लाभली आहे. पाच आवृत्या बघता-बघता मनात साठून अविरत वाट चालत राहतात. लेखकाला आभाळभर शुभेच्छांचा ‘सांगावा’ धाडत राहतात. आपल्या माणसांच्या व्यथांना अमर करणारा बाप माणूस भेटल्याची त्यांनाही आपूर्वाई वाटतच राहते. ओठातली व्यथा पोटात ढकलत कृत्रिम पायांच्या खांबावर जगण्याचं आभाळ पेलत असंख्य जिद्दी खांबाना पालवी फोडणाऱ्या या लेखनीच्या शिपायास आत्मचरित्रासह नवसाहित्य निर्मितीस शुभेच्छा आणि सलाम..!
साठोत्तर काळात आणि विशेषतः १९७५ नंतरच्या काळात ग्रामीण साहित्य चळवळीमुळे ग्रामीण साहित्य निर्मितीला विशेष चालना मिळाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिवर्तनाचेच हे अपरिहार्य फलित होते. सचिन पाटील हे याच चळवळीचा वारसा जपणारे समर्थ, सृजनशील कथाकार आहेत.बदलत्या ग्रामजीवनातील अनेक घटनाप्रसंग निवडून त्यांनी आपली कथासृष्टी घडवली आहे. दारिद्र्य, उपासमार, अंधश्रद्धा, नातेसंबंध, शेती आणि शेतकरी अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या या कथा वाचकांच्या मनाचा अक्षरशः ठाव घेतात. बदलत्या काळाप्रमाणे खेड्यातल्या माणसांच्या समस्यांनीही विक्राळ स्वरूप धारण केले. कुठे एखादा शेतकरी हातातोंडाशी आलेलं आपलं वांग्याचं पीक अंधश्रद्धेला बळी पडून उपटून फेकतो आहे तर कुठे आपल्या दावणीचा बैल कुणी चोर नेईल काय? अशी भीती निर्माण झाली आहे. कुठे एखादी आई पोटासाठी परमुलखात गेलेल्या मुलाला परत ये म्हणून ‘सांगावा’ पाठवते आहे तर कुठे माणसाचा माणसावरला विश्वास उडून जावा असे घडते आहे.. अतिशय कष्टाने, संवेदलशीलतेने श्री पाटील यांनी आपले कथालेखन केले आहे. त्यांची ही लेखनसाधना आदर्शवत आहे.
डॉ. रवींद्र ठाकूर
कथासंग्रह : सांगावा (पाचवी आवृत्ती)
लेखक : सचिन वसंत पाटील, मोबाईल – 8275377049
मुखपृष्ठ : वैशाली बाळासाहेब पाटील
प्रकाशन : आनंद प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, मूल्य : १५० ₹
