सातारा – येथील गुरुवार पेठेतील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ रविवारी, १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सोमण सभागृह, अश्वमेघ अभ्यासिका, राजवाडा चौपाटी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक शंकर निकम प्रमुख उपस्थितीत असून त्यांच्या हस्ते विविध साहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षीचा ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नयन पऱ्हाड (शिरजगाव – भिकमराय) यांच्या ‘जिवी जे गुंतले’ या अभंग संग्रहाला जाहीर झाला आहे. तसेच सौ. सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार ऋषिकेश गोल्हार, (विठ्ठलनगर, पो. टाकळी) यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय उत्तेजनार्थ ग्रंथ पुरस्कार वैशाली मंडपे (सातारा) यांच्या ‘सायबरनामा’ आभासी जगातील आव्हाने आणि सुरक्षितता या ग्रंथाला जाहीर झाला आहे.
कार्यक्रमात साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही लेखकांनाही प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. सौ. श्यामला माने, राजेंद्र घाडगे, सौ. मनीषा शिरटावले, अनिता आगाशे, अश्विनी कोठावळे, काशिनाथ गायकवाड आणि साक्षी महामुलकर यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले असून वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सौ. सुनीता उत्तेकर, सौ. सुनीता कदम, डॉ. सौ. नीला उत्तेकर, डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. राजेंद्र माने तसेच प्रा. सौ. प्रमोदिनी मंडपे आदी कार्यरत आहेत.
या समारंभाला सातारा शहर व परिसरातील साहित्यप्रेमी, वाचक आणि ग्रंथालयाचे सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
