February 24, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Sunetra Pawar taking charge of NCP and Deputy CM role after Ajit Pawar death
Home » सुनेत्रावहिनींसमोर आव्हानांचे डोंगर …
सत्ता संघर्ष

सुनेत्रावहिनींसमोर आव्हानांचे डोंगर …

स्टेटलाइन –

अजितदादांच्या मृत्युचे गूढ कायम आहे.  आजही लोकांच्या मनात संशय कायम आहे. दादांच्या मृत्युचे गूढ उकलले जावे यासाठीही त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.  त्यांनी व त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांना निवदेन देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्युनंतर त्यांचे राजकीय वारस म्हणून पक्षाने त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर नेतृत्वाची कमान सोपवली आहे. अजितदादांच्या मृत्युनंतर सर्व महाराष्ट्रालाच शोक अनावर झाला होता. लाखो कार्यकर्ते, मतदार,  पक्ष संघटना यांचा पोशिंदा निघून गेल्याची भावना निर्माण झाली. अजितदादांच्या मृत्युनंतर चौथ्या दिवशीच सुनेंत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस( अप ) च्या विधिमंडळ पक्षाच्या नेते पदावर  निवड झाली आणि त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा मुंबईतील लोकभवनात शपथविधी झाला.

सुनेत्रा पवारांनी घाई घाईने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली म्हणून त्यांच्यावर टीका झाली. दादांच्या मृत्युनंतर तेरा दिवस तरी थांबण्याची तयारी नव्हती का ?  अगदी महिनाभर थांबले असते त्यांना कोणी उपमुख्यमंत्री होण्यासाठी कोण अडवले असते का ? असे प्रश्न विचारले गेले. पण सुनेत्रावहिनींनी कोणत्याही प्रश्नाला उ्त्तर दिले नाही. कोणताही प्रतिवाद केला नाही.  पतीच्या मृत्युनंतर दु:खात असतानाही त्यांनी निर्णय घेतला व धीरोदत्तपणे त्याला सामोरे गेल्या. अजितदादांनंतर पक्षामधे सर्वकाही एकमताने निर्णय घेतले जात आहेत, असे दाखवले जात असले तरी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ व धनंजय मुंडे हेच सर्व काही ठरवत आहेत असे चित्र दिसते आहे. अशावेळी स्वत:ची ओळख   व स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा करण्याचे मोठे आव्हान सुनेत्रावहिनींवर आहे.

जुलै २०२२ मधे अजित पवारांनी पक्षात बंड केल्यानंतर त्यांचा पक्ष भाजपासोबत सरकारमधे सहभागी झाला. अजितदादा हेच पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या एवढा जनाधार असलेला नेता पक्षात दुसरा नेता नाही आणि ते सांगतील ते अंतिम शब्द असे. सत्तेत राहुनही ते भाजपाच्या आहारी गेले नाहीत. नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन भाजपा विरोधात निवडणुका लढविण्याची हिम्मत दाखवली. सत्तेत राहून भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे धाडस दाखवले. अफाट व थेट जनतेशी संपर्क असलेला, अचूक वेळ पाळणारा, प्रशासनावर जबर पकड असलेला, शब्दाला व कामाला पक्का असलेला नेता ही त्यांची ओ‌‌‌‌ळख होती म्हणूनच त्यांच्या आकस्मिक मृत्युनंतर सारा महाराष्ट्र हळहळला.

सुनेत्रावहिनींना सासर आणि माहेर अशा दोन्ही ठिकाणांहून राजकीय अनुभवाचे धडे मिळाले आहेत. त्या अबोल आहेत पण मनाने कणखर आहेत. आजवरच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी कुणाला दुखावले असे घडलेले नाही. सदैव सक्रीय, रोखठोक, धाडसी, कार्यक्षम, तडफदार लाखोंचे प्रेरणास्थान राहिलेल्या पतीबरोबर सदतीस वर्षे संसार केलेल्या सुनेत्रावहिनींची राजकारण व प्रशासन दोन्ही आघाड्यावर आता कसोटी आहे.

पक्ष, प्रशासन व परिवार अशा पातळीवर सुनेत्रावहिनींना सतर्क राहून काम करावे लागणार आहे. अजितदादांनी काकांच्या विरोधात बंड केल्यानंतरही त्यांनी काकांना अंतर दिले नव्हते. बहिण सुप्रिया यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरवले तरी भाऊबीज कधी चुकली नव्हती.  अजित पवार हे लोकनेता होते. अजितदादांच्या पक्षाचे बहुतेक नेते हे भाजपाच्या प्रेमापोटी नव्हे तर स्वत:ला चौकशीतून वाचविण्यासाठी किंवा विकासाला निधी मिळविण्यासाठी सत्तेसोबत आहेत. मित्र पक्षाला मोठा करणे हे भाजपाचे काम नाही, त्यांचे २०२९ शतप्रतिशत हे ध्येय आहे. त्याची सुरूवात विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायतीपासून झाली आहे.  अशा वेळी  आपला पक्ष कमकुवत होणार नाही, याची काळजी सुनेत्रावहिनींना घ्यायची आहे.

अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळी सुप्रिया या परिवाराच्या सदस्य म्हणून जबाबादारीने व कर्तव्य भावनेने वावरताना दिसल्या. दादांच्या पक्षावर आता शरद पवार, सुप्रिया, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार हे कब्जा करतील अशी कुजबूज मोहीम जोरात सुरू झाली. त्यातूनच घाईघाईने सुनेत्रावहिनींकेडे पक्षाची धुरा देण्याचे पक्षातील शक्तिशाली नेत्यांनी ठरवले.

सुनेत्रावहिनींचे कोणी प्रवक्ते नाहीत. लोकसभा निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात नणंद – वहिनी लढत असताना वहिनी शांत राहि्ल्या. परिवारातील सर्वात ज्येष्ठ अशा शरद पवारांना न भेटता किंवा न सांगता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बारामतीहून थेट मुंबईला कशा निघून आल्या, याची आजही चर्चा होत आहे. वहिनींनी साहेबांच्या फार संपर्कात राहू नये, असे पक्षातील अनेकांना वाटत असेल पण फार काळ तसे शक्य आहे का ? विलिनीकरणाच्या चर्चेला गेल्या पंधरा दिवसात बरेच फाटे फुटले. विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या पुढे नाही, हे पटेल व तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही वेगळे झालो कशाला ?  विलनीकरण झाले तर शरद पवारांचा पक्ष भाजपा सोबत येणार आहे काय ? तसे झाले तर सत्तेत वाटेकरी वाढतील ही भिती आहेच. जर अजितदादांना विलिनीकरण करायचे होते तर सुनेत्रावहिनींना निश्चितच ठाऊक असणार. पण  या मुद्द्यावर त्यांनी ब्र सुध्दा काढलेला नाही. मु‌ळात भाजपाला दोन्ही पक्षांचे विलिनीकरण मान्य आहे का ? राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष भाजपाने फोडले. फुटीरांना सत्तेत सन्मानाने वाटेकरी बनवले. ठाकरे व शरद पवारांचे पक्ष कमकुवत केले , मग पुन्हा त्यांनी एकत्र व्हावे म्हणून भाजपा कसा तयार होईल ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- जर अजितदादांचा पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घेत असेल तर माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कसा घेतील ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी आमच्याशी चर्चा करावी. ( सुनेत्रावहिनींना हा सल्लावजा इशाराच आहे )

जिल्हा परिषद किंवा महापालिका निवडणुकीत अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती कशाला केली होती ? आम्ही घड्याळ- तुतारीला बरोबर घेतले आहे, झाले गेले गंगेला मिळाले, आम्ही आता बरोबर आहोत असे अजितदादांनी जाहिरपणे म्हटले होते ते काय भाजपाची परवानगी घेऊन का ? शरद पवारांचा पक्ष आपल्या बरोबर नको, अशी कडवट भूमिका असलेले बरेच जण सुनेत्रावहिनींच्या आसपास आहेत.

अजित पवारांच्या मृत्युमागे घातपात आहे असा संशय आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलाय. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून डीजीसीए वर प्रश्नांचा भडिमार केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन ना़यडू यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत हटवावे अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच व्हीसीआर विमान कंपनीवर बंदी घालावी असेही म्हटले आहे.  अजितदादांच्या मृत्युचे गूढ कायम आहे.  आजही लोकांच्या मनात संशय कायम आहे. दादांच्या मृत्युचे गूढ उकलले जावे यासाठीही त्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.  त्यांनी व त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांना निवदेन देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

 सुनेत्रावहिनींनी घाईघाईने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा सुनेत्राताई तुम्ही चुकलात..अशी त्यांच्यावर धारदार टीका झाली. सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी तर सुनेत्रा पवारांना, गिधाडांपासून सावध रहा, असा खळबळजनक इशारा दिला. पवार कुटुंबाला एकत्र राहण्याचा त्यांनी सल्ला दिला.

व्हीपचे उल्लंघन केले तर राष्ट्रवादीच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार असा इशारा भाजपाच्या एका क’बिनेट मंत्र्याने दिला असल्याची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सरकारमधील मित्र पक्ष भाजपामधे विलिन झाला आहे का ? अजितदादांनी रोखून धरलेल्या फाईलींवर त्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी दुपारी ४ वाजता मंत्रालयात अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि ७५ नामवंत शिक्षणसंस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे प्रमाणपत्रांचे वाटपही झाले. अजितदादा नाहीत म्हणून पक्ष पोरका झाला आहे, त्याचा गैरफायदा उठवणारे चोहोबाजुला संधी शोधत आहेत. म्हणूनच सुनेत्रावहिनींना पक्षाला नेतृत्व देताना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘ध’ चा ‘मा’ पलीकडे अज्ञात राहिलेली आनंदीबाईं

चंद्राच्या कलेप्रमाणे होते ज्ञानाची वृद्धी

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading