निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रयोगानंतर नाटकावर चर्चा
मुंबई – कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ या दीर्घ कवितासंग्रहावर सादर होत असलेले ‘युगानुयुगे तूच ‘ याच नावाच्या बहुचर्चित नाटकाचा विशेष प्रयोग 13 मार्च रोजी रात्री 8 वाजता मुंबई माटुंगा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
मुंबईतील परिवर्तन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि राजकीय कार्यकर्ते यांना या प्रयोगासाठी निमंत्रित करण्यात आले असून नाटकाच्या प्रयोगानंतर या मान्यवरांच्या सहभागाने या नाटकावर चर्चाही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती नाटकाचे निर्माते चंद्रकांत जगताप यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कवी अजय कांडर यांनी ‘युगानुयुगे तूच ‘ ही दीर्घ कविता लिहिली आणि लोकवाङ्मयगृहने हा कवितासंग्रह प्रकाशित केल्यावर पहिल्या सहा महिन्यातच या संग्रहाच्या तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर या कवितासंघावर मुंबई दूरदर्शनने नाट्य निर्मिती करून नाटकाचा प्रयोगही प्रसारित केला. आता रघुनाथ कदम दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग विविध मालिका आणि नाटकांमधून लोकप्रिय ठरलेले अभिनेते सचिन वळंजू सादर करत आहेत.
मध्यंतरी दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या निधनानंतर आता पुन्हा नव्या निर्मात्यांसह हे नाटक रंगभूमीवर सादर होत असून या नाटकाचे प्रयोग वेगवेगळ्या भागात करताना त्यावर चर्चाही घडवून आणण्याचा मनोदय नाटकाचे निर्माते चंद्रकांत जगताप यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 13 रोजी या नाटकाचा विशेष प्रयोग माटुंगा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या नाटकाच्या प्रयोगासाठी ज्येष्ठ आंबेडकरी नेते, विचारवंत, साहित्यिक अर्जुन डांगळे,पॅथर नेते सुरेश केदारे, सुनिल कदम, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यावर्षीच्या जागतिक आंबेडकर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.सुनील रामटेके, ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, लोकशाहीर संभाजी भगत, राजाराम पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, जेष्ठ पत्रकार युवराज मोहिते, रवि गरूड, प्रवीण मोरे, प्रा.विजय मोहिते, प्रा.डाॅ.विजय मोरे,वै भव छाया, संतोष आंबेकर, संदेश गायकवाड आदी मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.
युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता एकूणच मराठी कवितेत लक्षवेधी ठरली असून तिचा दिल्ली वाणी प्रकाशनतर्फे ज्येष्ठ अनुवादक प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. च्या हिंदी विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर समीक्षक एकनाथ पाटील संपादित या काव्यसंग्रहावर ‘युगानुयुगे तूच चर्चा आणि चिकित्सा’ हा समीक्षा ग्रंथ लोकवाङ्मयगृहने प्रकाशित केला आहे.
कोणत्याही महामानवाला एका जातीत बांधून ठेवता येत नाही. तो सर्वांचा असतो. डॉ.बाबासाहेब हेही त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि एकूण समाजाला त्यांनी वैचारिक दिशा दिल्यामुळे ते साऱ्या समाजाचे आहेत हा विचार सांगणारा हा कवितासंग्रह असून प्रत्यक्ष नाटकातून हा विचार अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला असल्याचे निरीक्षण नाट्य समीक्षकांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर या नाटकाच्या सदर विशेष नाट्यप्रयोगाला महत्त्व प्राप्त होत असल्याची माहिती निर्माते चंद्रकांत जगताप यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
