March 19, 2026
fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
'परिवर्तनाच्या वाटेवर' या पुस्तकातून सा. रे. पाटील व गणपतराव दादा पाटील यांच्या सहकार व शेती क्षेत्रातील कार्याचा, समाजपरिवर्तनाचा १२५ वर्षांचा प्रवास उलगडला आहे.
Home » परिवर्तनाच्या वाटेवर…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परिवर्तनाच्या वाटेवर…

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, दूध उत्पादकांसाठी सातत्याने कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ घेऊन आपल्या कार्याला येण्याचा प्रयत्न सर्वच घटक करताना दिसतात. यांनी विद्यार्थीदशेपासूनच वडीलांच्या सूचनेनुसार शेती उद्योगात लक्ष देऊन संपूर्ण जगभरात शेती उद्योगात सुरू असलेले विविध प्रयोग, नव्या तंत्राचा वापर हे प्रत्यक्ष पाहिले. देश-विदेशात होणारी कृषी प्रदर्शने, त्या जोडीला होणारे वेगळे प्रयोग आणि कृषीतज्ज्ञांशी चर्चा या सर्वांतून आपली नवी पाऊलवाट तयार करण्यासाठी आपल्या शेतीत प्रयोग सुरू केले आहेत.

सुभाष घुमे

‘परिवर्तनाच्या वाटेवर’ या चरित्र लेखनात दोन पिढ्यांचा सव्वाशे वर्षांचा सामाजिक कार्याचा नेमकेपणाने आलेख मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सहकारमहर्षी म्हणून ज्यांनी आपल्या हयातीत सहकार क्षेत्रात योगदान दिले त्या आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी समाजातील तळच्या घटकाला खासकरून शेतीउद्योग, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला या सर्वांच्या उन्नतीसाठी झोकून घेऊन केलेल्या कार्यातून ‘कर्ते सुधारक’ अशी आपली प्रतिमा आपल्यासमोर निर्माण केली. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत सार्वजनिक जीवनात ते कार्यरत होते. आमदार असतानाच त्यांचे निधन झाले. आपल्या आयुष्यातील ७५ वर्षाचा कालावधी समाजासाठी भरीव काम करताना समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण, महिला अशा सर्व क्षेत्रातील घटकांना भक्कम पाठबळ देऊन स्वावलंबी बनविण्याची एक छोटी चळवळ निर्माण केली होती. त्याकाळात रत्नाप्पाण्णा कुंभार, दत्ताजीराव कदम, कल्लाप्पाण्णा आवाडे, बाळासाहेब माने, म. दु. श्रेष्ठी, शामराव पाटील यड्रावकर, बाळासाहेब खंजिरे अशी एकाहून एक दिग्गज मंडळी सार्वजनिक जीवनात सक्रीय होती. यामध्ये सा. रे. पाटील यांनी आपली एक वेगळी वाट तयार करीत केलेले काम आणि त्यासाठी दिलेले योगदान समाज परिवर्तनाचा एक मोठा भाग म्हटले पाहिजे.

असे एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राला सा. रे. पाटील यांनी स्पर्श केला नाही. बँकेपासून साखर कारखान्यापर्यंत आणि गावपातळीवरील सेवा संस्था, दूध संस्था, पतसंस्था अशा सहकाराच्या माध्यमातून दुबळ्या माणसाला जगण्याचे बळ देऊन समाज परिवर्तन करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न त्याकडे एक आदर्श उदाहरण म्हणून पाहिले जाते. सहकारातच त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ नावाचे दैनिक १९६० च्या दशकात त्यांनी सुरू केले. जनतेचे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधण्याबरोबरच प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी या व्यासपीठाचा त्यांनी चपलखपणे उपयोग करून घेतला. त्याकाळात पुढारी, लोकमान्य, इंद्रधनुष्य, सत्यवादी, नवसंदेश, समाज, राष्ट्रप्रगती अशी वृत्तपत्रे होती. ही वृत्तपत्रे म्हणजे पत्रकार तयार करण्याची केंद्रे होती. या छोट्या वृत्तपत्रात केलेल्या कामाचा अनुभव घेऊन अनेक तरूण मोठमोठ्या वृत्तपत्रात काम करत होते. त्यांना ती संधी मिळत होती. त्याचकाळात सहकारात वृत्तपत्र चालू करण्याचा सा. रे. पाटील यांचा निर्णय थोडा वेगळा तितकाच धाडसाचा होता. ही सारी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतरच त्यांचे सुपूत्र आणि त्यांच्या विचाराचे वारसदार गणपतरावदादा पाटील यांच्या कार्याकडे पाहणे उचित ठरेल. सा. रे. पाटील यांनी ज्या ज्या पाऊलवाटा निर्माण केल्या. त्याच वाटेने प्रवास करताना या पाऊलवाटेचे मोठे रस्ते आणि महामार्ग करण्याचे काम दादांनी केले. आपल्या वडीलांचा वारसा आश्वासकतेने पुढे सुरू ठेवण्याचे काम अव्याहतपणे दादा करीत आहेत. सा. रे. पाटील यांनी विविध संस्था स्थापन करून जी रोपटी लावली होती. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पहायला मिळते. बेरोजगारीचा प्रश्न प्रथमपासून आहे. सा. रे. पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून उभ्या केलेल्या संस्थांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीब युवकांना नोकरीची संधी मिळू शकली. आज या संस्थांनी व्यापक स्वरूप घेतल्याने हजारो लोकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण झाले आहे.

यांची दुरदृष्टी जशी महत्वाची होती. त्याचपद्धतीने हा वारसा चालविणारे दादा यांनी या दूरदृष्टीला व्यापक स्वरूप देतानाच आणखीन नव्या संस्थांची भर घालीत. शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरूणांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. दत्त उद्योग समुह आता देशपातळीवर पोहोचला आहे. सहकारातील हा समुह इतरांना दिशादर्शक आणि आदर्श ठरला आहे. दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू असलेले नियोजनबद्ध प्रयत्न आणि यामागचा बाबांचा दृष्टीकोन यातून एक आश्वासक चित्र तयार झाले आहे. कारखान्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडण्याची प्रक्रिया अखंड सुरू आहे. या जोडीला शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या वाटेवर आणुन त्यांच्या बुद्धीमत्तेला आणि कौशल्याला वह खुली करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवे नवे बदल घडत आहेत. आधुनिक तंत्र आले आहे. पारंपारिक साधनांना नव्या तंत्राची जोड देत उत्तम मेळ घातला आहे. ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्याबरोबरच शेतीमालाचा दर्जा चांगला रहावा आणि पूर्ण उत्पादन घेता येईल यासाठी मार्गदर्शन करणारे केंद्र रूपी सुरू केले आहे.

गणपतरावदादा यांनी आपल्या कार्याचा परीघ अधिक केला आहे. माती, शेती, निसर्ग, वृक्षवेली, पाणी, पशुपक्षी निसर्गातील सर्व घटकांना उत्तमप्रकारे वातावरण ठेवण्याचा नियोजनबद्धरित्या सुरू आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, दूध उत्पादकांसाठी सातत्याने कार्यशाळांचे आयोजन केले जाते. त्याचा लाभ घेऊन आपल्या कार्याला येण्याचा प्रयत्न सर्वच घटक करताना दिसतात. यांनी विद्यार्थीदशेपासूनच वडीलांच्या सूचनेनुसार शेती उद्योगात लक्ष देऊन संपूर्ण जगभरात शेती उद्योगात सुरू असलेले विविध प्रयोग, नव्या तंत्राचा वापर हे प्रत्यक्ष पाहिले. देश-विदेशात होणारी कृषी प्रदर्शने, त्या जोडीला होणारे वेगळे प्रयोग आणि कृषीतज्ज्ञांशी चर्चा या सर्वांतून आपली नवी पाऊलवाट तयार करण्यासाठी आपल्या शेतीत प्रयोग सुरू केले आहेत. त्यांचा फुलशेतीचा प्रयोग तर यशस्वी ठरला.

दादांनी आपल्या शेतीत गुलाब फुलांचे दर्जेदार उत्पादन घेऊन जगभरातील विविध देशात पाठविले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून शिरोळ तालुक्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचे नाव शेतीच्या प्रयोगासाठी जगभरात पोहोचले. गणपतराव यांना त्यांच्या वडीलांनी जगभरात फिरून शेती उद्योगातील नवे तंत्र आणि नवे नवे प्रयोग पाहण्यासाठी मुद्दाम देश-विदेशात पाठविले होते. याच क्षेत्रात आपल्याला काम करायचे आहे हा निर्णय घेऊन दादांनी अनेक अभ्यासदौरे केले. अनेकांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन घेतले. विदेशातील शेती आणि आपली शेती याचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्यातील कमतरता शोधल्या त्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. साखर कारखान्याचे एक खास पथक तयार केले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. उत्पादनवाढीसाठी करावयाच्या प्रयोगासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच कारखान्याकडून सर्व प्रकारची मदत उपलब्ध केली. कायमपणे तोट्यात जाणारी शेती नफ्यात कशी येईल आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी कसा होईल ? यासाठी हे नियोजनपूर्वक प्रयत्न होते. याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात एक नवी उमेद आणण्यात यश मिळाले. प्रत्येक प्रयोगाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. रोजगार देणारे आश्वासक क्षेत्र म्हणून शेतीकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला नव्या तंत्राची जोड देऊन उत्पादन वाढीसाठी चिकाटीने प्रयत्न करावेत. शेतकरी कुटुंबातील मुलांनी नोकरीच्या मागे न जाता आपल्या शेतीत काम करून इतरांना रोजगार देण्याचा प्रयत्न करावा अशाप्रकारे प्रबोधन करण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे.

दादा यांनी आपल्या तालुक्यातील शेती आणि सहकारात वेगवेगळे प्रयोग यशस्वी केले. याचा आदर्श केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यासमोर रहावा अशाप्रकारे व्हिजन घेऊनच या आघाडीवर सातत्यपूर्ण काम सुरू आहे. यासाठी विविध संस्थांत असलेले अधिकारी, कर्मचारी, कारखान्याचे सभासद आणि छोटे मोठे शेतकरी या सर्वांना एकत्र करून उत्तम मेळ घालण्यात यश मिळाले. सामुहिक प्रयत्नातूनच कोणतेही काम सहजपणे उभे राहू शकते हा दादांचा अनुभव त्यामुळेच सर्वांना विश्वासात घेऊन नवनवे प्रयोग राबविण्याचा प्रयत्न दत्त उद्योग समुहातर्फे सुरू आहे. गेल्या दहा वर्षापासून दादांनी एक संशोधन हाती घेतले आहे. अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिरोळ तालुक्यात दरवर्षी येणाऱ्या महापूरातूनही नदीकाठची शेती पड बनली आहे. अर्थात हा प्रश्न केवळ या तालुक्यापुरता मर्यादित नाही, जगभरातील ही समस्या आहे. यावर दादांनी कारखान्याच्या शेती खात्याच्या मदतीने अभ्यास सुरू केला. पड जमीन असलेल्या थेट शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. या प्रश्नांवर चिंतन केले. अभ्यास केला. तज्ज्ञांशी चर्चा केली. माती परिक्षणापासून विविध मार्गाने या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला आणि चिकाटीला यश मिळाले. क्षारपडमुक्ती आणि ती जमीन लागवडीखाली आणू शकतो असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि क्षारपडमुक्तीचा धडक कार्यक्रम हाती घेतला.

सुरूवातीला काही क्षारपड असलेल्या जमिनीत येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली. माती परिक्षण करून जमिनीत कोणते घटक कमी आहेत याचा शोध घेतला. त्यानंतरच या निष्कर्षानूसार उपाययोजना सुरू केली. त्यामध्ये यश मिळाले. अथक परिश्रम आणि अभ्यासातून दादांनी या प्रश्नांचे उत्तर शोधलेच. यानंतर व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचे वेळापत्रक ठरविले. क्षारपड जमीन मुक्त करून लागवडी खाली आणता येते याबाबत शेतकऱ्यांना विश्वास देण्याचे काम केले. ही प्रक्रिया खर्चिक असली तरी सुरूवातीला ही जबाबदारी साखर कारखान्याने उचलली. या धडक कार्यक्रमानुसार आतापर्यंत सुमारे दहा हजार एकर जमीन क्षारपडमुक्त करून लागवडीखाली आणली. अद्यापही कार्यक्षेत्रात वीस हजार एकरहून अधिक जमीन क्षारपडमुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. क्षारपडमुक्तीनंतर चांगले उत्पादन मिळू शकते ही गोष्ट सिद्ध करण्यात आली. एका शेतकऱ्यांचे क्षारपडमुक्त झालेल्या २७ गुंठे जमिनीतून विक्रमी ८५ टन ऊसाचे उत्पादन घेतले; हे एक उदाहरण झाले. अशाप्रकारे कारखान्याच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तालुक्यातील संपूर्ण जमीन क्षारपडमुक्त करण्याचा धडक कार्यक्रम सुरू झाला. अलीकडेच केंद्र शासनाने या संशोधनाला मान्यता दिली आहे. त्याला आता चळवळीचे स्वरूप आले आहे. आता ही चळवळ सांगली जिल्ह्यात पोहोचली आहे. त्या जिल्ह्यातही जमीन क्षारपडमुक्त करण्याचे काम सुरू आहे. क्षारपडमुक्ती चळवळीची माहिती या पुस्तकाच्या एका भागात सविस्तर दिली आहे.

एकूणच दादांनी आपल्या वडीलांकडून घेतलेला वसा आणि वारसा नेटाने पुढे चालविला आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेऊनच वेगवेगळे प्रयोग राबविले जातात. शेतकरी हाच केंद्रस्थानी आहे. इथे राजकीय विचारांना थारा नाही. या घटकांसाठीच काम करताना तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्याला मदत देऊन त्याची जमीन क्षारपड मुक्त करण्याचे सुरू आहे. ज्येष्ठ नेते आणि शेती उद्योगाशी निगडीत असलेले शरद पवार यांनीसुद्धा या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी कारखान्याला खास भेट दिली. प्रत्यक्ष शेतीची पाहणी केली. दादांशी चर्चा करून या संशोधनाची माहिती घेतली. राज्य आणि केंद्र शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कर्नाटकातील सीमाभागातील काही गावांचा समावेश आहे. कर्नाटक शासनाने या प्रयोगाची माहिती घेऊन अकरा कोटीचे अनुदान दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही अशाच प्रकारे काही अनुदान मंजूर केले आहे. दादांनी संशोधन केलेला आणि प्रत्यक्षात आणलेला हा प्रयोग पाहण्यासाठी देश-विदेशातील शास्त्रज्ञ आणि शेती उद्योगाशी संबंधित असलेली अनेक मंडळी येऊन या संशोधनाची माहिती घेत आहेत. अतिरिक्त पाण्याचा वापर आणि यातून क्षारपड होणारी जमीन हा प्रश्न जगाला भेडसावणारा आहे. दत्त कारखान्याने केलेले है संशोधन आता सातासमुद्रापार गेलेले आहे.

परिवर्तनाच्या वाटेवर हे पुस्तक म्हणजे केवळ दादांचे चरित्र नाही तर वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती त्यासाठी केलेले संशोधन आणि उद्योगातील दादांचे योगदान त्यांची चिकाटी पहायला मिळते. यात शेतकरी आणि कष्टकरी माणसांच्या जीवनात झालेला बदल; होणारे परिवर्तन; समाजातील तळच्या घटकांचा आर्थिक स्तर
वण्यासाठी सा. रे. पाटील यांच्यापासून आजपर्यंत म्हणजे १२५ वर्षाचा इतिहासच आहे. शिरोळ तालुका प्रथमपासून सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातसुद्धा शिरोळ वासीयांचे खूप मोठे योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या सीमांत झालेले बदल; कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून झालेले नित्याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

हा एक ऐतिहासिक दस्त आहे. तालुक्याच्या संदर्भात पुढे मागे कोणाला लेखन करावयाचे असल्यास एक संदर्भग्रंथ म्हणून याची उपयुक्तता खूप महत्वाची आहे. सा. रे. पाटील आणि गणपतराव यांना केंद्रस्थानी ठेऊनच त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना समाजात होत गेलेले बदल आणि परिवर्तन यालाही स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘परिवर्तनाच्या वाटेवर’ या पुस्तकाचे वाचकांकडून निश्चित स्वागत होईल असा विश्वास आहे. या पुस्तकात अनेक त्रुटी आहेत. कमतरता आहेत याची जाणीव असली तरी अगदी वस्तुनिष्ठ माहिती आणि वास्तव चित्रण देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तसं पाहिलं तर दोन पिढ्यांच्या सार्वजनिक जीवन कार्याचा आलेख म्हणूनच या पुस्तकाकडे पाहिले पाहिजे. सा. रे. पाटील आणि त्यांच्यानंतर गणपतराव दादा यांच्या नेतृत्वाखाली समाज परिवर्तनाच्या कार्यात झोकून देण्याचा प्रयत्न सुमारे १२५ वर्षे अखंडपणे सुरू आहे. सा. रे. पाटील यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहण्याचा प्रयत्न केला. दादांनी तोच वसा आणि वारसा सुरू ठेवला असून सा. रे. पाटलांच्या विचारानेच सर्व संस्थांचा कारभार करताना समाजातील तळाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत करूनच या कामाला गती देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पुस्तकाचे नाव – परिवर्तनाच्या वाटेवर
लेखक – सुभाष घुमे
प्रकाशक – व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज 9273376660
किंमत – २०० रुपये

Related posts

सातवीन वृक्षाबाबत…

पूर, महापूर आणि दरडी !

सर्वांसाठी शिक्षण यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करणारा राजा राजर्षी शाहूः मेणसे

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!