मराठी पत्रकारितेच्या वैभवशाली परंपरेचा शोध घेताना कोल्हापूरच्या समृद्ध वारशाचा वेध घेणारे आणि राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील विचारप्रवाह उलगडणारे डॉ. शिवाजी जाधव यांचे ‘शाहू पूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ हे पुस्तक इतिहास, संशोधन आणि वैचारिकतेचा संगम घडवणारा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरतो.
स्नेहल वरेकर
मराठी वृत्तपत्रसृष्टीला आणि वृत्तपत्रकारितेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा राष्ट्रवादी विचारांची आहे, वैचारिकतेची आहे आणि त्याचबरोबर सत्यशोधकीय सुद्धा आहे. या मराठी वृत्तपत्रकारितेमध्ये एक मानाचे पान निश्चितच कोल्हापुरातील पत्रकारितेला जाते. कोल्हापूरच्या वृत्तपत्र सृष्टीला जवळपास पाऊणशे वर्षाची परंपरा आहे. या वैभवशाली परंपरेतील महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी जाधव यांनी आपल्या ‘शाहू पूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ या पुस्तकातून घेतला आहे.
आज माध्यम असो वा इतर कोणतेही क्षेत्र त्याला निगडित असणाऱ्या त्यावर प्रभाव पाडणाऱ्या विविध घटना आणि घटक यांना विचारात घेऊन केलेल्या आंतरविद्याशाखीय संशोधनाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. या परिप्रेक्षात डॉ. जाधव यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. प्रस्तूत पुस्तकामध्ये केवळ पत्रकारिता आणि वृत्तपत्रे यांवर टिप्पणी केली आहे असे नव्हे तर, आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून पाहून तंत्रज्ञान, सांस्कृतिक घटना, सामाजिक उलाढाल, साहित्यातील बदल यांच्याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. वाचकाच्या सर्वकश आकलनासाठी याचा फायदा होतो.
या पुस्तकातील माहिती, विश्लेषण आणि टिप्पणी माध्यंमांविषयीचे आपले ज्ञान वाढवायला आणि माध्यमांकडे अधिक चौकसपणे बघायला मदत करते. ही माहिती आणि विश्लेषण मांडत असताना वेळोवेळी त्यांचे महत्त्वाचे संदर्भ लेखकाने काळजीपूर्वक दिले आहेत. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी दिलेली आणि गरजेची असणारी आकडेवारी पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढवते. कोणतीही घटना प्रसंग सांगताना त्या त्या ठिकाणी दिलेले दिनांक, वर्ष, सनावळ्या यामुळे पुस्तकातील माहितीची व मांडणीची विश्वासार्हता वाढते.
विविध वृत्तपत्र आणि साप्ताहिकांविषयी मांडताना शाहू महाराज आणि त्यांच्या विचारांचा पगडा एकूणच याकाळातील लेखनावर, लेखकांवर, संपादकांवर आणि परिणामी एकूणच माध्यम व्यवस्थेवर किती खोलवर होता हे ध्यानात येते. या पुस्तकातील प्रो. विजापूरकरांच्या ‘मासिक ग्रंथमाला’ या नियतकालिकाची कहाणी शाहूंच्या एकूण प्रभावाविषयी माहिती देते.
हे पुस्तक पत्रकारिता करणाऱ्या, पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर वाचलेच पाहिजे, पण माध्यमांचा प्रवास जाणून घेण्याची उत्कटता असलेल्या कोणत्याही जिज्ञासू व्यक्तीसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पुस्तकात दिलेली माहिती संशोधनावर आधारित जरूर आहे पण त्याची मांडणी मात्र अतिशय साध्या, सोप्या आणि रुचकर भाषेत केलेली असल्याने माध्यमांशी निगडित नसलेली व्यक्ती देखील त्यात रस घेऊन शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रांविषयी माहिती घेऊ शकेल.
‘थिंकटॅंक पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केलेले जवळपास १०० पानांचे हे पुस्तक मुखपृष्ठ, फॉंट, मुद्रितशोधन, रचना आणि एकूण पुस्तकाचे स्वरूप या पातळीवर खास जमून आलेले आहे. वाचताना वाचकाला या बाबी देखील एक चांगला अनुभव देऊन जातात. कोल्हापूरकर आणि एकूणच मराठी लोकांनी वेळ काढून वाचावे असे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव – शाहू पूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे
लेखक – डॉ. शिवाजी जाधव
प्रकाशन – थिंकटॅंक पब्लिकेशन्स अँड डिस्ट्रिब्युशन
मूल्य – १२०/- रुपये
शाहपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे या दुर्लक्षित विषयावर डॉ. शिवाजी जाधव यांनी महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये माध्यमांचा इतिहास, लेखन कलेचा विकास, भारतातील माध्यमे यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारितेचा उगम ते राजर्षी शाहू महाराज यांच्या कालखंडापर्यंतच्या पत्रकारितेचा आढावा घेण्यात आला आहे. प्रामुख्याने कोल्हापूर व राजर्षी शाहूकाल केंद्रवर्ती ठेवून या पुस्तकाची मांडणी केली आहे. कोल्हापूरचा प्राचीन आणि मध्ययुगीन काळ, एजंटी कारकिर्द, अल्पवयीन राजांचा कालखंड, छत्रपती घराण्याचा थोडक्यात इतिहास, कोल्हापूर प्रकरण, राजर्षी शाहपूर्व आणि शाहूकालीन स्थिती आदी महत्त्वाच्या घटनांच्या विशेष संदर्भाने बहरत गेलेल्या कोल्हापुरातील पत्रकारितेची तपशीलवार मांडणी ; तसेच तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये कोल्हापूरचे उमटलेले प्रतिबिंब आणि वर्तमानपत्रांनी हाताळलेल्या अनेकविध विषयांची संगतवार नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे. संदर्भपूरक मांडणीमुळे या पुस्तकास विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. विशेषतः शाहपूर्व व शाहूकालीन पत्रकारितेविषयीचा उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसह इतिहास अभ्यासक, माध्यम संशोधक, शाहपूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रांविषयी जिज्ञासू असणाऱ्यांनी आवर्जून वाचावे, असे हे पुस्तक आहे.
