मध काढा पोळं तेथेच ठेवून मध माशांना हक्काचे घर द्या…
सांगली येथील वन विभाग व पुणे येथील बी बास्केट यांचेवतीने सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच मधमाश्या संवर्धन व बचाव याबाबत कार्यशाळा आयोजित केलेली होती. या कार्यशाळेमध्ये वन विभागाचे कर्मचारी सर्प मित्र वन्यजीव प्रेमी व वन कर्मचारी यांना शहरी व ग्रामीण भागातील मधमाशा संवर्धन या बाबत मार्गदर्शन करुन मधमाशाचे पेाळे कसे काढावे आणि पुन्हा ते पोळे त्याच जागी ठेवून हक्काचे घर देता येवू शकते किंवा त्यांचे पुन्हा पुर्नस्थापन करता येते असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
मधमाशा हा निसर्गातील छोटासा घटक असून तो महत्त्वपूर्ण आहे. मधमाशाव्दारे परागीभवन होवून शेती उत्पन्न व फळ उत्पन्नात वाढ होणेस अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. आज अज्ञानापोटी अशी मधाचे पोळे जाळून तसेच किटकनाशके मारुन काढले जातात या मध्ये लाखो माशा मारल्या जातात. त्यामुळे जैवविविधता मधील एक घटक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मधमाशा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा औषधी मध तयार करुन देतात. त्यामधून उत्पन्नाचे एक स्त्रोत निर्माण होते. यासाठी मधमाशी संवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती करणे याबाबत कार्यशाळेतून संकल्प करण्यात आला आहे.
याबाबत जनतेने सहकार्य करावे असे सांगली वन विभागामार्फत आवाहन करणेत आले. या कार्यशाळेस उप वनसंरक्षक विजय माने, सहाय्यक वनसंरक्षक अजित साजणे, मधमाशी प्रशिक्षक संजय मारणे व बी बास्केटचे संचालक अमित गोडसे, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी आभार मानले. या कार्यशाळेस सांगली वन विभागातील कर्मचारी, सर्पमित्र व खरशींग सरपंच सुहास पाटील उपस्थित होते.