- फलटणमध्ये २५ नोव्हेंबरला संमेलन
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे आयोजन
- श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजक
- प्रताप गंगावणे, रघुराज मेटकरी यांना साहित्यिक गौरव पुरस्कार
फलटण : महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे २५ नोव्हेंबरला फलटण येथे साहित्य संमेलन होत आहे. या नवव्या यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय चोरमारे यांची निवड केली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची फलटण शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि श्री सद्गुरू प्रतिष्ठान यांच्यावतीने संयुक्तपणे संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पटकथा लेखक प्रताप गंगावणे आणि ज्येष्ठ कवी रघुराज मेटकरी यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे.
नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयात सकाळी साडेदहा वाजता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रवींद्र बेडकिहाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळके जन्मशताब्दीनिमित्त निमंत्रित महिला व युवतींचे कवीसंमेलन दुसऱ्या सत्रात दुपारी अडीच वाजता होणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवियत्री श्रीमती आशाताई दळवी असून लायन्स क्लबच्या फलटण शाखेच्या अध्यक्षा निलम विजय लोंढे पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कवी संमेलनात रंजना सानप, आराधना गुरव, सुरेखा आवळे, जयश्री शेंडे, रुपाली सस्ते, प्रतिक्षा कांबळे, दिक्षा काकडे, सानिका फरांदे, श्रृती बर्गे, काजल जाधव ह्या कवियत्री सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन ताराचंद आवळे करणार आहेत. त्यानंतर रवींद्र कोकरे आणि ज. तु. गार्डे यांचे कथाकथन होईल.