May 31, 2026
Home » ज्ञानेश्वरीसह गीता तत्त्वज्ञान नित्य नुतन
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीसह गीता तत्त्वज्ञान नित्य नुतन

geeta-always-new-philosophy-rajendra-ghorpade-article-on-dnyneshwari

गीता संस्कृतमध्ये आहे. आज संस्कृत जाणणारे खूपच कमी लोक आहेत. ज्ञानेश्वरी प्राकृत मराठीमध्ये आहे. आज ही मराठी वापरात नाही. काळाच्या ओघात भाषा बदलली पण तत्त्वज्ञान तेच आहे. ते नव्या रूपात नव्या ढंगात काळानुसार येत आहे. गीतेचे हे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें ।
तैसें हें नित्य नूतन देखिजे ।गीतातत्त्व ।।71।। ज्ञानेश्वरी अध्याय 1

ओवीचा अर्थ – त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाचा थांग लागत नाही, त्याचप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही, त्याचप्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करायवयास जावे, तेंव्हा ते रोज नवीनच आहे असें दिसते.

बाजारात एखादी वस्तू घ्यायला गेल्यावर प्रथम ती किती प्रगत आहे. हे आपण प्रथम पाहतो. कारण काळाच्या ओघात त्या वस्तूचे महत्त्व कमी झालेले पाहायला मिळते. शास्त्रातही बदल होत चालला आहे. नवनवे शास्त्रही उदयास येत आहे. शेती मातीत केली जाते. पण आता माती शिवायही शेतीत भरघोस उत्पादने घेतली जाऊ लागली आहेत. पावसावर अवलंबून असणारी शेती आता पाऊस नसणाऱ्या वाळवंटातही केली जाऊ लागली आहे.

बदलते तंत्रज्ञान नित्य नूतन येत आहे. बोलता बोलता लोक कोणत्या दशकात वावरत आहात याची विचारपूसही करू लागले आहेत. कारण दहा वर्षापूर्वी जे होते ते आता दिसत नाही. त्यापेक्षाही प्रगत तंत्र उपलब्ध होत आहे. त्यानुसार जगावे लागत आहे. अन्यथा आपण काळाच्या ओघात मागे पडू अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात नाही केले तर आपले जगणेही मुश्किल होईल अशी आजची स्थिती आहे. यापुढेही ती राहील कारण हे तंत्रज्ञान बदल हे पूर्वीपासूनच चालत आले आहे.

रोपांना पाणी देण्याची पद्धत बदलली पण रोपांना पाणी तर द्यावे लागते. त्याशिवाय रोपांची वाढच होत नाही. मग ते रोप मातीत लावले काय किंवा कॉकपीटमध्ये लावले काय? त्याची वाढ होण्यासाठी ते जगण्यासाठी पाणी ही मुख्य गरज आहे. त्या पाण्यात काही बदल झाला नाही. कारण पाणी हेच जीवन आहे. तेच अमृत आहे. ते नसेल तर सजीवाचे अस्तित्वच नष्ट होईल. म्हणूनच चंद्रावर, मंगळावर प्रथम पाणी आहे का याचा शोध घेतला जात आहे. पाणी असेल तरच जीवसृष्टी आहे.

जिवाचे अस्तित्व जसे पाण्याशिवाय नाही. तसे माणसाचे जीवन हे गीतातत्त्वाशिवाय नाही. युगे बदलतील पण हे तत्त्व अमर आहे. हजारो वर्षापूर्वी भगवंतांनी ही गीता सांगितली. बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी त्यावर टीका केली. ती ज्ञानेश्वरीच्या रूपात आजही वाचली जाते. 700 श्लोंकांच्या गीतेचे तत्त्वज्ञान सर्व सामान्यांना समजावे यासाठी ज्ञानेश्वरांनी ते उघड करून सांगितले. तत्त्वज्ञान तेच आहे. फक्त काळाच्या ओघात भाषेत बदल झाला आहे.

गीता संस्कृतमध्ये आहे. आज संस्कृत जाणणारे खूपच कमी लोक आहेत. ज्ञानेश्वरी प्राकृत मराठीमध्ये आहे. आज ही मराठी वापरात नाही. काळाच्या ओघात भाषा बदलली पण तत्त्वज्ञान तेच आहे. ते नव्या रूपात नव्या ढंगात काळानुसार येत आहे. गीतेचे हे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे. त्यासाठी ती आत्मसात करायला हवी. ज्ञानेश्वरी बाराव्या शतकात होती तशीच ती आजही आहे. दरवेळी तिचे पारायण केले जाते. पण दरवेळेचा त्यातून येणारा अनुभव हा नित्य नूतन आहे. म्हणूनच ती अमरत्वाला पोहोचली आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

ध्यान केल्यावर मेंदूच्या तरंगांची गती बदलते अन् मन स्थिरावते

तैसे चित्त काढेल वेगें । प्रपंचिनि ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

आत्मज्ञानाची लढाई हा योगायोगच

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!