ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! – नीता चापले
मध्यमवर्गीय कुटुंबातील एकत्र कुटुंबात वाढलेली, चोरून खेळ खेळणारी, राखेतून फिनिक्स पक्षासारखी उत्तुंग झेप घेणारी, महिला क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक, लेखिका, पॉवरलिफ्टर जलतरणपटू असलेल्या आधुनिक नवदुर्गा नीताला मानाचा मुजरा..!!ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
मूळच्या नागपूरच्या व गेल्या ३० वर्षापासून मुंबईत राहाणाऱ्या राष्ट्रीय महिला क्रिकेटपटू व मार्गदर्शक नीता चापले. क्रिकेट, बॅडमिंटन, पॅावरलिफ्टिंग व जलतरणपटू म्हणून त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. १९८७ साली वयाच्या १५ व्या वर्षी सुरू झालेला मैदानावरील क्रिकेट प्रवास आज लाटांवर सुरु आहे. वयाच्या अठ्ठेचाळीशीत पॅावरलिफ्टिंग, पन्नाशीत स्विमिंगची सुरुवात करून त्यांनी राज्यस्तरीय जलतरणपटू म्हणून स्वतःला सिध्द केले आहे. आज इंग्लिश खाडी पोहून विक्रम करायचे स्वप्न त्या बाळगून आहे. वयाच्या ५२ व्या वर्षीही त्या सुमारे १७० कि. वजन उचलतात. मनात आणलं व सातत्य, कष्ट, जिद्दीच्या जोरावर एक महिला काय काय करू शकते याचा विचार केला तर नीताताईंकडे पाहाता येईल. फार कमी खेळाडू या लेखक होतात. त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष व दुःख यावर मात करायची ताकद त्यांना व्यायाम व खेळातून मिळाली असे त्या सांगतात.
“नागपूरला आजमशहा लेआउट प्राथमिक (मनपा) शाळेत सुरु झालेले मराठी माध्यमातील शिक्षण ते दहावीला केवळ ५० टक्के मिळाले असताना पुढे खेळ व अभ्यास करत एम.ए. इंग्रजी वाड्मय पदवी प्राप्त केली. ‘किसन पैलवान हे माझे आजोबा नामांकित पैलवान होते. वडील गावातील पहिले वकील. अतिशय कडक शिस्तीचे. घरचे वातावरण असे की पूर्ण अंगभर कपडे घालायचे. कुणब्याच्या पोरीनं नीटच वागायचं हा आजी आजोबांपासूनचा शिरस्ता. पण शाळेत असताना कबड्डी खेळायला सुरु केले. त्यासाठी हाफ पॅन्ट लागायची. खेळाचे वेड इतके की, घरातून भावाची हापपॅन्ट लपून घालून कबड्डी खेळायचो. एकदा भावाने पाहिले व त्याने घरी सांगितले. घरात सतत दबाव होता. मनासारखी फॅशन कधी करता आली नाही. वडिलांना कृत्रिम गोष्टींचा तिरस्कार होता. त्यांच्या शब्दापुढे जायची घरात कुणाचीही हिंमत नसायची. आजीची मरेपर्यंत सेवा हिच त्यांच्या समोरच्या कारकिर्दीला कारणीभूत ठरली. आजी ज्या दिवशी पहाटे गेली तेव्हापासून माझा क्रिकेटचा खरा प्रवास सुरु झाला. आजीची सेवा मनापासून केली म्हणून आईवडीलांनी पाठिंबा दिला मग मागे वळून पाहिलेच नाही.’ नीताताई सांगत होत्या.
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ताई कर्णधार होत्या. कॅालेज व रोज दोनवेळा क्रिकेट प्रॅक्टिस हे त्यांचे दैनंदिन रूटीन. रोज एवढे कष्ट घेतेय आणि आपली पोरगी खेळून पास होतेय याचं बाबांना खूप कौतुक होते. आईला सुद्धा क्रिकेटचे वेड होते. ती स्वतः खो खो पटू होती. बाबांनी २१ वर्षापर्यंत वेळ दिला होता, किंवा नापास झालीस तर लग्न उरकायचं असं ते बोलायचे. लग्नाचे वय झाले तेव्हा लग्न हेच तिचे अंतिम उद्दिष्ट होतेच. पण विदर्भ क्रिकेट संघात नीताची निवड होऊन सर्व वृत्तपत्रात तिचे नाव छापून आले याचा प्रचंड आनंद सर्वांनाच झाला होता.
विदर्भाने महाराष्ट्राला अनेक महिला क्रिकेटपटू व रणजी खेळाडू सुध्दा दिले. नागपूर विद्यापीठाची कर्णधार म्हणून नीताने नाबाद ९१ धावा काढल्या पण इतरांचे योग्य ते सहकार्य न झाल्याने त्यांचा संघ हरला. तेव्हा नीता पुढे गेली पाहिजे असे शिशिर सुदामे यांना वाटले व त्यांनी तिला आपल्याकडे बोलावले. तिला ती संधी घ्यावी असे वाटून तिने तिची पहिली ॲकॅडमी बदलली. यामुळे तिचे पहिले कोच नाराज झाले व तिच्यावर चिडून ते म्हणाले, ‘तू तिकडे का गेलीस ? तू क्रिकेट सोडले तरी चालेल.’ असे म्हटल्याने ती दुखावली गेली व तिने तेव्हा क्रिकेट सोडले. आणि त्यानंतर काही काळात तिचे लग्न झाले.
लग्नानंतर काही काळ ती कलकत्त्याला राहिली. निशाताईंना ऐश्वर्या व तेजस ही दोन मुलं. तेजस नकळत राहिलेला गर्भ. लक्षात आल्यावर तो अबनॅार्मल होईल असे डॅाक्टरांनी सांगितल्यावर ॲबॅार्शन करणे शक्य नसल्याने त्यांनी त्याला जन्म द्यायचे ठरवले. पती जवळ नसतानाही त्यांनी सिझर करून ॲापरेशन करायचा निर्णय घेतला. त्यांनी मुलगा किमान १ महिन्याने पाहिला. तेजसला फीट येत असल्यामुळे त्यांनी त्याची खूप काळजी अनेकवर्ष घेतली. आपले करियर, मुलांची काळजी, त्यांचे शिक्षण सारे ताई एकहाती पहात होत्या.
मुलगी ऐश्वर्या ही चांगली क्रिकेटपटू होती. १२ वीला असताना तिचा अपघात झाला व त्यातच ती गेली. त्यानंतर ताई सुमारे ३ वर्ष त्यातून सावरल्या नाहीत. अतिशय हुशार, अभ्यासू, मेहनती मुलगी जाण्याचे दुःख मनात ठेवून आपण तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं असं त्यांना काही काळाने वाटलं त्यानंतर त्यांनी वयाच्या ४८ व्या वर्षी पॉवरलिफ्टिंग करायला सुरवात केली. आणि त्यांनी पूर्ण वेळ व्यायाम, लेखन यांत स्वतःला गुंतवून घेतल्याने आज त्या तिचे स्वप्न पूर्ण करत आहेत. ऐश्वर्या चांगली क्रिकेटपटू होती. तिला आदरांजली म्हणून त्या लेखनाकडे वळल्या.
मैदानावरील क्रिकेट बंद झाले असले तरीही मनातून क्रिकेट जाणे शक्य नव्हते. महिला क्रिकेटचा इतिहास मांडणारे ‘क्रिकेटच्या ऐश्वर्या’ हे २५ क्रिकेटिअर महिलांचा प्रवास सांगणारे पुस्तक लिहिले. नलिनी हा कवितासंग्रह व क्षितिजगामी : एक प्रवास अपराजित जिद्दीचा अशी तीन पुस्तके प्रकाशित केली. यानिमित्ताने त्या लेखिका झाल्या आहेत.
२००५ साली मुंबईला त्यांनी क्रिकेट ॲकॅडमी सुरु केली. महाराष्ट्रात ॲकॅडमी सुरु करणाऱ्या त्या पहिला महिला ठरल्या. २०१८ साली त्या महाराष्ट्राच्या स्कूल क्रिकेट कोच आणि निवड समिती सदस्य होत्या. अनेक वर्ष त्या या क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. ‘थांबला तो संपला’ या न्यायाने आता त्यांनी थांबायचं नाही असे ठरवले आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील एकत्र कुटुंबात वाढलेली, चोरून खेळ खेळणारी, राखेतून फिनिक्स पक्षासारखी उत्तुंग झेप घेणारी, महिला क्रिकेट खेळाडू, प्रशिक्षक, लेखिका, पॉवरलिफ्टर जलतरणपटू असलेल्या आधुनिक नवदुर्गा नीताला मानाचा मुजरा..!!
