March 28, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Maharani Tarabai leading the Maratha resistance against Mughal emperor Aurangzeb
Home » ताराबाईंविषयीचे पूर्वग्रह दूर करणारे पुस्तक – मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई
मुक्त संवाद

ताराबाईंविषयीचे पूर्वग्रह दूर करणारे पुस्तक – मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई

आदरणीय जयसिंगराव पवार सरांना भावपूर्ण आदरांजली !!

​प्रस्तुत चरित्रग्रंथ वाचताना लक्षात येणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ ताराबाईंचे चरित्र नाही. तर औरंगजेबाशी संघर्षरत झालेल्या शूर मराठा सरदारांचे आणि धाडसी सैन्यांचेही हे चरित्र बनले आहे. अर्थातच हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासातील एका संघर्षशील कालखंडाचे चरित्र आहे आणि हेच या ग्रंथाचे मोठे यश आहे. या कालखंडाला डॉ. जयसिंगराव पवार ‘स्वातंत्र्ययुद्धाचा कालखंड’ असे म्हणतात.

डॉ. नंदकुमार मोरे

​इतिहासातील अनेक कर्तबगार अणि अलौकिक व्यक्तिमत्त्वं केवळ योग्य संशोधनाच्या अभावाने अंधारात खितपत पडलेली दिसतात. म्हणूनच लिहिलेला सर्व इतिहास कधीच परिपूर्ण समजला जात नाही. त्यामध्ये अनेक फटी असतात. त्यामुळेच योग्य इतिहासकार लाभलेली व्यक्तिमत्त्वे नेहमी भाग्यवान समजली जातात. कारण अशा व्यक्तिमत्त्वांना प्रकाशमान करण्यासाठी बऱ्याच वेळा योग्य इतिहासकार जन्मावा लागतो. नसेल तर इतिहासातील व्यक्तिमत्वं कितीही शूर, कर्तबगार आणि देदीप्यमान असली तरी ती बेदखल होतात. परिणामी अभ्यासाची योग्य पद्धत आणि संशोधकाभावी केवळ अशी व्यक्तिमत्त्वंच दुर्लक्षित राहतात असे नाही, तर खरा इतिहासही अंधारला जातो.

मराठ्यांच्या इतिहासातील अशा काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांना योग्य न्याय मिळवून देण्यामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह काही शूर मराठा सरदारांच्या कर्तृत्वाला आणि वास्तविक प्रतिमेला न्याय मिळवून दिला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीत तर त्यांनी केलेले संशोधन आणि त्यांची वास्तविक प्रतिमा जगासमोर आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांना इतिहासात तोड नाही. या सर्व कामांसाठी त्यांनी आयुष्याची जवळजवळ साठ वर्षे खर्ची घातली आहेत. अशाच पद्धतीने अथक पाठपुरावा करून आणि झटून ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ हे बृहद चरित्र साकारले आहे. कोल्हापूर राज्याची संस्थापना करणाऱ्या ताराबाईंना डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या संशोधनाचा विषय करून योग्य न्याय मिळवून दिला आहे. ज्यामुळे वरील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांबरोबर ताराबाईंचेही वास्तविक जीवन जगासमोर येऊ शकले. तिला उशिरा का होईना योग्य असा न्याय मिळवून दिला आहे.

​मराठी इतिहासलेखनाची सुरुवात होऊन जवळपास सव्वाशे वर्षे झाली आहेत. या प्रदीर्घ काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, स्वराज्य उभारणीचा काळ आणि त्यानंतर थोरले शाहू महाराज परतल्यानंतरचा मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराचा कालखंड इतिहास संशोधकांसाठी विशेष आस्थेचा विषय झाला. परंतु, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील औरंगजेबाचा प्रवेश आणि त्याच्या मृत्यूपर्यंत सुमारे सव्वीस वर्षे संघर्षरत असलेला मराठ्यांचा देदीप्यमान काळखंड दुर्लक्षितच राहिलेला दिसतो. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन सुपुत्र आणि स्नुषांनी खरे नेतृत्व केले; हा काळ मात्र थोडा अंधारातच राहिला. त्याला काही सांस्कृतिक कारणेही असतील. परंतु, छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांचे लढवय्ये जीवन त्यामुळे अंधारात राहिले. त्यांना इतिहासकारांकडून योग्य न्याय मिळालेला नाही.

छत्रपती संभाजी महाराजांची बदफैली, राज्य बुडवा राजा म्हणून; राजाराम महाराजांची दुबळा, अकार्यक्षम राजा म्हणून; तर महाराणी ताराबाईंची स्वार्थी राजकारणी म्हणून हेटाळणी आणि बदनामी करण्यात आली. मात्र या बदनामी, हेटाळणीची चिकित्सा करून नवे संशोधन करण्याची दृष्टी खूप कमी लोकांनी दाखवली. त्यामधील एक ठळक नाव म्हणजे डॉ. जयसिंगराव पवार हे होय. वरील हेटाळणीजनक शब्द आणि निर्भत्सना विचारात घेऊन डॉ. जयसिंगराव पवार यांनी या तिन्ही व्यक्तिमत्त्वांना योग्य न्याय देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली. त्यांच्या वास्तविक प्रतिमा जगासमोर आणल्या. पैकी ताराबाई यांचे ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ हे बृहद चरित्र तर त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची परिसीमा आहे.

​प्रस्तुत चरित्रग्रंथ वाचताना लक्षात येणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ ताराबाईंचे चरित्र नाही. तर औरंगजेबाशी संघर्षरत झालेल्या शूर मराठा सरदारांचे आणि धाडसी सैन्यांचेही हे चरित्र बनले आहे. अर्थातच हे चरित्र मराठ्यांच्या इतिहासातील एका संघर्षशील कालखंडाचे चरित्र आहे आणि हेच या ग्रंथाचे मोठे यश आहे. या कालखंडाला डॉ. जयसिंगराव पवार ‘स्वातंत्र्ययुद्धाचा कालखंड’ असे म्हणतात. डॉ. पवार हा कालखंड उभा करताना पूर्वइतिहासकारांच्या मतांचा सविस्तर धांडोळा घेतात. त्यांच्या मतांचे योग्य पद्धतीने खंडण करीत चर्चा विस्तारतात. त्यांची विश्लेषणाची आणि विषय प्रतिपादनाची पद्धत अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणारी आहे. त्यांच्या चर्चेतील मराठी आणि अमराठी इतिहासकारांची अनेक मते इतिहासलेखनातील सांस्कृतिक राजकारण म्हणूनही अभ्यासता येतील. कारण, एकाच व्यक्तीबद्दल येणारी विविध मते येथे एकत्रितपणे वाचायला मिळातात.

विशेषत: थोर इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी या काळाचे मूल्यमापण करताना छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाईंवर केलेला अन्याय डॉ. पवार यांनी अतिशय संयमीपणाने वाचकांसमोर ठेवला आहे. डॉ. पवार यांची पूर्व इतिहासकारांच्या मतांचे आदरपूर्वक खंडण करण्याची पद्धत नव्या इतिहासकरांना मार्गदर्शक आहे.

​औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजीपुत्र शाहूराजे (थोरले) सुटून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे चित्र पालटले. डॉ. पवार म्हणतात तसे, औरंगजेबाच्या मृत्यूने मराठ्यांच्या इतिहासातील स्वातंत्र्ययुद्धाचे एक प्रदीर्घ पर्व संपले आणि दुसरे पर्व सुरू झाले. हे पर्व म्हणजे ताराबाई आणि शाहूराजे यांच्यातील भाऊबंदकीच्या यादवीचे आहे. या संघर्षात अनेक सरदार ताराबाईंना सोडून शाहूराजांकडे गेले. तसेच पुढील काळात अनेक इतिहासकारही ताराबाईंच्या विरोधात गेल्याचे वास्तव डॉ. पवार समोर आणतात. ताराबाईंच्या पूर्वसूरी इतिहासकारांचे ऋण व्यक्त करीत ते अनेक इतिहासकारांच्या राजकारणाची तटस्थपणे चिकित्साही करताना दिसतात. ही चिकित्सा आज इतिहासात हस्तक्षेप वाढलेल्या काळात अभ्यासकांना इतिहासाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देते. इतिहासाची परिभाषा शिकवते.

​डॉ. जयसिंगराव पवार यांचे ताराबाईंचे बृहद चरित्र मराठ्यांचा इतिहास आणि त्यातील अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे यांच्याबद्दलच्या अनेक प्रश्नांची चर्चा करते. विशेषत: वर उल्लेख केलेल्या भाऊबंदकीच्या यादवीत अनेक इतिहासकार शाहूराजांच्या भूमिकेची पाठराखण करतात. ती करताना मात्र ताराबाईंवर अनेक बदनामीजनक आरोप करतात. तिच्या कार्यकर्तृत्वाला बेदखल करतात. औरंगजेबासारखा हिंदुस्थानचा बादशहा शत्रू म्हणून पुढे उभा असताना अतिशय धैर्याने त्याला तोंड देणारी राणी, तिची कर्तबगारी, धाडस आणि तिचे राजकीय कसब विचारातही घेतले जात नाही.

अशा वेळी या काळाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करीत डॉ. पवार एका अर्थाने ताराबाईंची बाजू सक्षमपणे मांडताना दिसतात. त्यांचे प्रतिपादन कधी-कधी ताराबाईंची वकीली करत असल्याचे जाणवते. परंतु, तिच्यावरील अन्यायच इतका पराकोटीचा आहे की, शेवटी-शेवटी वाचकही डॉ. पवार यांच्या भूमिकेशी सहमत होत जातो. इतकेच नाही तर ताराबाईंची भूमिका ही घटनात्मक, तात्त्विक आणि नैतिक ठरवतो, हे या चरित्राचे खरे यश आहे. डॉ. पवार ताराबाईंच्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी काही महत्त्वाची गृहितेके मांडतात. ते म्हणतात, सुमारे सव्वीस वर्षाचा तिचा हा संघर्ष स्वत:च्या हितासाठी नव्हता, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जोपसण्यासाठीचा होता.

आपले हे गृहितक ते अनेक दाखले देत पटवूनही देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करवून घेऊन मराठ्याचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य स्थापन केले. त्याला ‘स्वराज्य’ हे अतिशय समर्पक असे नाव दिले. सर्वार्थाने त्या स्वराज्याची जोपासणा, हे ताराबाईंचे जीवित कार्य होते. कारण, या राज्याचे घटनात्मक आणि राजनैतिक महत्त्व औरंगजेबाच्या लक्षात आलेले असल्याने ते नष्ट करणे, हे त्याने त्याचे जीवितकार्य मानले होते. त्यामुळे ताराबाईंच्या कर्तृत्वाला विशेष महत्त्व आहे. परंतु, तिचे योगदान इतिहासकारांनी लक्षात घेतले नसल्याचे फार मोठे शल्य हे चरित्र वाचताना लक्षात येते.

​या चरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे ताराबाईंच्या जीवनाबरोबरच मराठ्यांच्या व्यापक युद्धनीतीचा वाचकांना परिचय होतो. राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आल्यानंतर त्यांनी अवलंबलेली युद्धनिती आणि आखलेली धोरणे विस्मयचकित करणारी आहेत. बादशहा औरंगजेब मराठ्यांचे गड-किल्ले ताब्यात घेण्यात गुंतून पडलेला असताना बादशहाच्या म्हणजे गुजरात, मावळ, कर्नाटक, तेलंगण ते ओरिसापर्यंतच्या प्रदेशात ताराबाईंनी आपल्या फौजा पाठवून धुमाकूळ घातला होता. डॉ. पवार इटालियन प्रवासी मनूचीचा दाखला देत दाखवून देतात की, या काळात ताराबाईंचे अंतिम ध्येय दिल्ली काबीज करणे, हे होते. कारण, या काळात त्यांनी पाठवलेली एक फौज थेट दिल्लीपर्यंत घुसली होती. त्यांनी गोवळकोंड्यासारख्या अभेद किल्यावर कूच करून गोवळकोंड्याची लूट केली होती. त्यामुळेच कवी देवदत्तने ‘दिल्ली झाली दीनवाणी ।/ दिल्लीशाहीचे गेले पाणी ।/ ताराबाई रामराणी ।/ भ्रद्रकाली कोपली॥’ अशा शब्दात ताराबाईंच्या केलेल्या वर्णनाची यथार्थताच डॉ. पवार आपल्या संशोधनातून समोर आणतात.

​डॉ. जयसिंगराव पवार या बृहद चरित्राची रचना दोन खंडांत जवळपास चाळीस प्रकरणातून करतात. ती करीत असताना त्यांनी ताराबाईंच्या जीवनाचे तीन ठळक कालखंड कल्पिले आहेत. पहिला औरंगजेब बादशहाबरोबर केलेला संघर्ष हा एक महत्त्वाचा कालखंड; दुसरा पुतण्या शाहूराजांशी केलेला संघर्ष आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा संघर्ष म्हणजे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याशी केलेला संघर्ष होय. या तिन्ही संघर्षांमध्ये ताराबाईंचे कार्यकर्तृत्व झळाळून निघाले आहे. एक स्त्री प्रतिकूल परिस्थितीत या सर्वांना ज्या पद्धतीने आव्हान देते, ते विस्मयचकीत करणारे आहे. हे तिन्ही संघर्ष म्हणजे तिचे एकाकी लढे आहेत. या प्रत्येक लढ्याचे डॉ. पवार यांनी केलेले विस्तृत विवेचन वाचून ताराबाईंच्या यशापयशाची चिकित्सा करण्यापेक्षा या लढ्यांमधील तिची लढवय्यावृत्ती वाचकांसाठी आदराचा भाग बनते. तिचे एकाकी लढणे पाहून तिच्याबद्दलचा आदर द्विगुणीत होत राहतो. कारण, या तिन्ही लढ्यांमध्ये ताराबाईंचा संघर्ष वेगवेगळा आहे. यामध्ये दिसणारी तिची जिगीषूवृत्ती वाचकांना खूप काही शिकवते. या तिच्या संघर्षांपैकी ती पेशव्यांशी सघर्षरत होताना तिच्या हाती सत्ता, संपत्ती, सैन्य असे काही नव्हते. त्यामुळे हा संघर्ष ताराबाईंची स्वराज्यरक्षक ही प्रतिमा अधिक उजळवतो. या लढ्यांबरोबर तिन्ही संघर्षांचे डॉ. पवार यांनी केलेले विश्लेषण वाचकांना अंर्तमुख करते. ते एक प्रदीर्घ काळ चाललेल्या मराठ्यांच्या रणधुरंधर वृत्तीशी आणि संघर्षशील जगण्याचा परिचय करून देते. म्हणूनच हा चरित्रग्रंथ एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून संग्राह्य झाला आहे.

​ताराबाईंबरोबर मराठ्यांचा हा लढा साकारताना ताराबाईंचा जिंजाचा प्रवास, तेथील लढा आणि सुटका, दरम्यानच्या काळात उद्‍भवलेले काही प्रश्न, ते सोडवण्यासाठी केलेली शर्थ, त्यासाठी केलेल्या कौशल्यपरिसीमा, मोघल-मराठा संघर्षाचे स्वरूप, त्यांच्यातील लढायांचे स्वरूप, राजकारण, दरम्यानची देशातील राजकीय स्थितिगती, अशा स्थितीत मराठ्यांनी दिलेली झुंझ आणि चौफेर लढा, मोगल आणि आरमारी शत्रूंशी एकाच वेळी चाललेला संघर्ष, सैनिकी कारवायांचे स्वरूप, नवी धोरणे, दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही धोरणांना बगल देऊन स्वराज्य रक्षणार्थ घेतलेले निर्णय, त्यातून पुढे आलेली वतनदारी, सरंजमशाही आणि त्याबद्दलची यादवी यासह शत्रूपक्ष आणि स्वकीय या दोघांबरोबर केलेले दोन हात, थोरले शाहूराजे आणि पुढे पेशव्यांशी केलेला संघर्ष, हे सारेच विस्तृतपणे या चरित्रामध्ये वाचायला मिळते.

​ताराबाईंनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात खूप चढउतार पाहिले. त्यांच्या जीवनात काळानेच अशी वळणे घेतली आहेत की, तिच्या लढावूवृत्तीला जणू आव्हान मिळत गेले. स्थिती नेहमी प्रतिकूल राहिली. तरीही न डगमगता तिने याही स्थितीत घेतलेल्या भूमिका आणि निर्णय, हे स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरण्याइतके महत्त्वाचे आहेत. त्यासाठी तत्कालीन राजकीय स्थिती, रूढ राजनैतिक तत्त्वे, स्त्री म्हणून समाजातील स्थान, त्याबद्दलच्या लोकांच्या धारणा, अशा अनेकानेक गोष्टी समोर ठेवून ताराबाईंचे जीवन अभ्यासावे लागते. तिच्या संर्घषाबद्दल निष्कर्ष काढताना ती छत्रपती शिवाजी महाराजांची स्नुषा आहे, म्हणून तिला हे साध्य झाले, असे म्हणून बाजूला होता येणार नाही. वास्तविक तिच्या जीवनातील अनेकविध संघर्षत हे नाते वाचकाच्या विस्मृतीतच जाते. ताराबाई मूळातच लढवय्या घरातून भोसल्यांच्या घरी आलेल्या होत्या. त्यासाठी या ग्रंथाची मांडणी करताना प्रारंभीच डॉ. जयसिंगराव पवार यांनी तळबीडचे बाजी मोहितेंचे लढवय्ये घराणे, तेथील तिचे जीवन, वडील सरसेनापती हंबीरराव मोहितेंपासून तिची जीवनकहाणी कथन केली आहे. तिच्या जीवनातील सर्वात पहिला निर्णायक क्षण हा छत्रपती संभाजी यांची हत्या आणि त्यानंतर उद्‍भवलेले संकट आहे. या वेळी स्वराज्यावरच्या रक्षणाची जबाबदारी तिचे पती राजराम महाराजांवर येते. त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राज्यकारभार हाती घ्यावा लागणे आणि स्वराज्याच्या बचावासाठी जिंजीला पलायन करावे लागणे, येथूनच ताराबाईंच्या जीवनसंघर्षाची सुरुवात होते. हा सर्व इतिहास डॉ. पवार यांनी अनेक दाखले, पुरावे सादर करीत ज्या पद्धतीने साकारला केला आहे, तो पाहता वाचक थक्क होऊन जातो. इतिहास लेखनातील पुराव्यांची साक्ष आणि पूर्वसुरी इतिहाकारांच्या मतांचे खंडण-मंडण करत त्यांनी केलेले विश्लेषण बऱ्याच वेळा पाल्हाळीक आणि पुनरावृत्त झाल्याचे जाणवते. परंतु, त्या कालखंडाचा पसारा आणि गुंतागुंत पाहता; प्रस्तुत चरित्राची ती आंतरिक गरज असल्याचे लक्षात येते.

​डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या चरित्राची काही वैशिष्ट्ये आवर्जून नोंदवता येतील. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पूर्वइतिहासकारांनी निर्माण केलेले पूर्वग्रह साधार दूर करण्यात डॉ. पवार यांनी बरीच मेहनत घेतली आहे. त्यासाठी आवश्यक प्रतिपादनासाठी त्यांची बरीच शक्ती खर्च झाली आहे. परिणामी अतिशय प्रभावीपणे ताराबाईंची वास्तविक प्रतिमा समोर येऊ शकली आहे. हे चरित्र अनेक दाखले संदर्भ देत साकारले गेल्यामुळे विस्तृत झाले आहे. त्यामुळे वाचकांची थोडी दमणूक होते. परंतु, वाचकाला आपोआपच स्वराज्याच्या रक्षणार्थ केलेल्या देदीप्यमान संघर्षाची ओळख होते. एका विस्तृत काळाचा पट सूक्ष्मपणे समोर येत जातो. केवळ ताराबाईच नाही, तर तिच्यासोबत या रणसंग्रामात सहभागी असलेल्या अनेक शूरवीरांचा परिचय होतो. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांची ओळख होते. शिवाय ताराबाईंच्या जीवनसंघर्षाचे सार काढताना डॉ. जयसिंगराव पवार जे म्हणतात, ते विचारप्रवृत्त करणारे आणि तिच्या जीवनसंघर्षाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारे आहे. डॉ. पवार असे लिहितात की, ‘ताराबाईंचा संघर्ष शिवशाहीच्या कार्यक्रमावर, राजकीय नैतिकतेवर व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर आधारित होता.’ हा संघर्ष डॉ. पवार प्रतिपादन करतात तसा असेल तर पूर्व इतिहासकारांची मते आपोआप निकाली निघतात. वाचकांसाठी हे प्रतिपादन ताराबाईंवर झालेल्या सर्व आरोपांचा पुनर्विचार करायला प्रवृत्त करते. म्हणूनच ताराबाईंचे हे बृहद चरित्र इतिहासातील व्यक्तींकडे निर्दोष दृष्टीने पाहायला शिकवते आणि इतिहास वाचनाचीही अभिनव दृष्टी देते.

( सौजन्य – साप्ताहिक साधना, १४ मार्च, २०२६ )

Related posts

शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी आवाहन

माझी बोली, माझी कथा पुस्तकाच्या निमित्ताने मनोगत

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!