न्युकोमन या संशोधकांने वाफेवर चालणारे यंत्र तयार केले. या वाफेच्या शक्तीचा वापर अठराव्या शतकाच्या अखेरीस गट्टेनबर्ग यांचे यंत्र चालवण्यासाठी सुरू झाला. त्यामुळे छपाई प्रतींचा वेग शंभर पटीने वाढला. कुटिरोद्योगाचे रूप असणाऱ्या छापखान्यांना उद्योगाचे रूप मिळाले.
डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मानवी संस्कृतीमध्ये समाजाला सुसंस्कृत ठेवण्यासाठी आज सर्वात महत्त्वाची भूमिका वठवणारे साधन म्हणजे पुस्तक. मानवी संस्कृतीसोबत मुद्रण तंत्रही विकसीत झाले. भाषा निर्माण झाल्या. संवाद सुरू झाला. जाणवलेले मानवाला लिहावे वाटू लागले. त्यासाठी लिपी तयार झाली. त्यानुसार अक्षरांच्या माध्यमातून लिहायला सुरुवात झाली. निसर्गात उपलब्ध असलेले रंग शाई म्हणून वापरले जाऊ लागले. पुढे कपड्यावर लिहिले जाऊ लागले. त्यासाठी रेशमी कापडाचा सर्वाधिक वापर केला जात असे. यादरम्यान भोजपत्रांचा वापर सुरू झाला. अनेक ऋषींनी आपल्या रचना भोजपत्रावर लिहिल्या. त्याची दुसरी प्रत तयार करायची असेल तर पुन्हा सर्व मजकूर आहे तसा लिहावा लागत असे. हे मोठे जिकीरीचे काम असे. लिहिताना कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागत असे.
अनेक राजे, बादशहा आणि सत्ताधिश महत्त्वपूर्ण ग्रंथांचे, धार्मिक ग्रंथांची प्रत खास लिहून घेत. याचे सुंदर वर्णन नोबेल पुरस्कार विजेते लेखक ओऱ्हान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीमध्ये वाचावयास मिळते. हे मोठे खर्चिक आणि वेळखाऊ काम असल्याने सर्वसामान्यांच्या कुवतीबाहेरचे होते. त्यामुळे ज्ञान संपादन करणेही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हते. हे सर्व बदलण्यास कारण ठरले ते छपाई यंत्र. या यंत्राने जग बदलले.
चीनमध्ये सर्वात अगोदर छपाईला सुरुवात झाली ती लाकडी ठोकळ्याच्या सहाय्याने दुसऱ्या शतकाच्या अखेरीस. पुढे अकराव्या शतकात अक्षरांचे आकार तयार केले जाऊ लागले तेही चीनमध्येच. एका प्रतलात बाह्य भाग असणारे ठोकळे तयार केले जात आणि ते शिक्क्याप्रमाणे उठवत. मात्र मोठे ठोकळे कागदावर उमटवताना सर्व अक्षरांची शाई सारखी उमटत नसे कारण ठोकळ्याच्या सर्व भागावर सारखाच दाब पडत नसे. त्यासाठी प्रयत्न सुरू केले ते जर्मन संशोधक गोल्डस्मिथ जोहान्स गटेनबर्ग यांनी. त्यांनी ग्रीसमध्ये दारू बनवण्यासाठी दाब देणाऱ्या यंत्राच्या रचनेचा वापर करून आपले छपाई यंत्र बनवण्यासाठी आराखडा तयार केला. त्याहीअगोदर अरब राष्ट्रामध्ये कुराणाच्या ओळी छापण्यासाठी असे दाबाचे यंत्र वापरण्यात येत असे. जर्मनीमधील गटेनबर्ग यांनी १४४० च्या दरम्यान एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येईल, असे पहिले छपाई यंत्र तयार केले. आता ठोकळ्याच्या सहाय्याने कागदावर अक्षरे किंवा मजकूर उमटवताना सर्व अक्षरे सारखी उमटत होती. या यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात ३६०० पानांची छपाई करता येत असे. अर्थात शाई लावलेला भाग कागदावर उमटवण्यासाठी मानवी शक्तीचा वापर करण्यात येत असे. आता शंभर पानांच्या हजार प्रती छापण्यासाठी ठोकळे तयार झाल्यानंतर १५ दिवसापेक्षाही कमी वेळ लागू लागला. खर्चात आणि वेळेची बचत यामुळे आपोआपच निर्मिती खर्च कमी झाला. यामुळे पुस्तकांची छपाई करणे युरोपमध्ये सुरू झाले. कमी मजकूराची कागदपत्रे मोठ्या प्रमाणात छापण्यात येऊ लागली. जागोजागी छापखाने सुरू झाले. युरोपियन देशातील २०० शहरांमध्ये १५०० पेक्षा जास्त छापखाने अवघ्या साठ वर्षांत सुरू झाले. एका वर्षात दोन कोटी प्रतींची निर्मिती करण्यात आली. पुढे एका वर्षातील छपाईचा वेग दहा पटीने वाढला. गटेनबग्र यांनी या यंत्रावर सर्वप्रथम बायबल छापले. १५१५ मध्ये अक्षरे कोरण्याचे तंत्र विकसित झाले.
अमेरिकेमध्ये पहिला छापखाना सतराव्या शतकात सुरू झाला. बायबलची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी युरेापमधून छपाई यंत्रे मागवली. सुरुवातीस छापखान्यांचा उपयोग प्रामुख्याने बायबल आणि अन्य धर्मग्रंथ छापण्यासाठी करण्यात येत असे. मात्र लवकरच या यंत्रांचा वापर आपले स्वतंत्र विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होऊ लागला. लोक धर्मग्रंथामधील आपल्या मनाला न पटणाऱ्या बाबीसंदर्भात आपली मते छापू लागले. त्याचबरोबर राजाचे निर्णय न आवडणारे बंडखोर विचाराचे लोक आपले मुक्त विचार छापून घेऊ लागले. हा छापील मजकूर लोकांपर्यंत सहज पोहोचवता येणे शक्य होते. लोकांना अक्षरांची ओळख करून घेणे, शिक्षण घेणे सहज आणि सोपे झाले. यातून राजसत्ता आणि धर्मसत्ता दोन्ही अस्वस्थ झाले. साक्षरतेमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे लिहिता-वाचता येणाऱ्या प्रतिष्ठीत लोकांची मक्तेदारी मोडली गेली. लोकांना जुलमी राजवट नकोसी वाटू लागली आणि लोकशाहीची मुळे रूजू लागली.
दरम्यान न्युकोमन या संशोधकांने वाफेवर चालणारे यंत्र तयार केले. या वाफेच्या शक्तीचा वापर अठराव्या शतकाच्या अखेरीस गट्टेनबर्ग यांचे यंत्र चालवण्यासाठी सुरू झाला. त्यामुळे छपाई प्रतींचा वेग शंभर पटीने वाढला. कुटिरोद्योगाचे रूप असणाऱ्या छापखान्यांना उद्योगाचे रूप मिळाले. साक्षरतेमध्ये झालेल्या अचानक वाढीतून पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. छपाई यंत्रांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे झाले. त्यातून आणखी वेगवान छपाई यंत्राची गरज पडू लागली. ती गरज वाफेच्या शक्तीची खरी ओळख करून देणाऱ्या जेम्स वॅट यांच्या शोधानंतर भागली.
त्याचबरोबर शिसे किंवा लाकडी ठोकळ्यावर अक्षरे कोरण्यापेक्षा शिशाची अक्षरे उलटी तयार करून ती सुलटी छापण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि नंतर ती जुळवून मजकूर छापण्याचे तंत्र विकसित झाले. या अक्षरांना खिळे म्हणत. असे अक्षरांचे खिळे जुळवून पहिली प्रत काढून मुद्रितशोधन करण्यात येत असे. त्यानंतर प्रत्यक्ष छपाई करत असत. पुढे संगणक आले आणि छपाईचे संपूर्ण विश्व बदलले गेले. संगणकांवर मजकूर थेट टंकलिखित केला जाऊ लागला. त्याची थेट प्लेटवर प्रिंट घेऊन ऑफसेट तंत्राच्या सहाय्याने छपाई सुरू झाली.
छपाई वेगवान होण्यास वाफेच्या यंत्राला विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रानी मोठी मदत केली. त्यानंतर इतक्या वेगाने छपाई सुरू झाली की लाखो प्रती एका दिवसात छापणारी यंत्रे बाजारात आली. हजारो, लाखो पुस्तकांच्या प्रती एका महिन्यात तयार होऊ लागल्या. याचा सर्वाधिक फायदा वर्तमानपत्र उद्योगाला मोठा झाला. वर्तमानपत्रांची छपाई उशिरा करून ताज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता येणे शक्य झाले. आज मागणीनुसार पुस्तकांच्या छपाईसाठी उपयुक्त असणाऱ्या यंत्रांची निर्मिती आणि वापर सुरू झाला आहे. स्क्रीन प्रिंटींग, इंकजेट प्रिंटींग, लेसर आणि डिजीटल प्रिंटींग ही तंत्रे विकसित झाली.
छपाई यंत्रामुळे पुस्तकांची, विचारांची मोठ्या प्रमाणात छपाई करणे आणि लोकांपर्यंत पोहाचवणे शक्य झाल्याने लोकांचे मतपरिवर्तन करण्यामध्ये छपाई यंत्रांने मोठी भुमिका निभावली. आज समाजमाध्यमांचा वापर जसा लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी होत आहे, अगदी तसाच उपयोग छपाई यंत्रांचा झाला. मात्र पुढे लोकांना खऱ्या खोट्यांची ओळख होऊ लागली. लोक प्रगल्भ झाले. समाजमाध्यमांबाबत ही जाणीव व्हायला अजून वेळ आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.