मानव हा विचार करणारा प्राणी आहे. निसर्गातील घटनांकडे केवळ आश्चर्याने पाहण्यापासून ते त्यामागील कारणांचा शोध घेण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास अत्यंत रोचक आहे. अनुभव, निरीक्षण, तर्क आणि प्रयोग यांच्या आधारावर विकसित झालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मानवाने अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल केली. हा प्रवास तत्त्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत पोहोचलेल्या मानवी बुद्धिमत्तेची प्रेरणादायी कथा सांगतो.
डॉ व्ही एन शिंदे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मानव विचार करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. पृथ्वीवर लक्षावधी ज्ञात आणि कोट्यवधी अज्ञात, अनेक जीव, प्रजाती आहेत. या सर्वांमध्ये सखोल विचार करणे, अनुभवांचे विश्लेषण करणे आणि त्यातून ज्ञान निर्माण करण्याची क्षमता मानवांमध्ये विकसित झाली. सुरुवातीस मानवी जीवन पूर्णत: निसर्गावर अवलंबून होते. मानवही निसर्गाचा एक घटक म्हणून रहात असे. अन्नासाठी शिकार करायचा, कंदमुळे, फळे गोळा करायचा. नंतरचा वेळ तो निसर्गातील बदल समजून घेण्यासाठी वापरायचा. या प्रक्रियेतून त्याने निरीक्षणे केली, अनुभवातून शिकून शेती करण्यापर्यंत प्रगती केली. खरे तर, हे मानवाचे वागणे मूळ निसर्ग नियमांच्या विरूद्ध होते. मात्र यातून उपलब्ध झालेल्या वेळेमध्ये मानवांने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. पुढे निव्वळ अनुभव आणि चिंतनातून हळूहळू विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली.
सुरुवातीला अनुभव आणि त्यातून प्राप्त ज्ञान, मौखिक पद्धतीने पुढच्या पिढीकडे जात असे. कथातून, गीतातून आणि परंपरामधून ज्ञान जपले जात असे. वस्ती करण्यास सुरुवात केल्यापासून लोकसंख्या वाढू लागली. व्यापार आणि प्रशासन वाढू लागले, माहिती कायमस्वरूपी जतन करणे गरजचे झाले, ज्ञानव्यवहार गुंतागुंतीचे झाले आणि या ज्ञानाची नोंद ठेवण्याची गरज निर्माण झाली. त्यातून सर्वांना समजतील असे संकेत (आजची अक्षरे) ठरवण्याची गरज निर्माण झाली. अगदी सुरुवातीला चित्रांमधून ज्ञान सांगण्यात येत असे. या पद्धतीमध्ये गावागावामध्ये बदल येणे स्वाभाविक होते. त्यामध्ये एकसूत्रता आणून लेखनसंस्कृती विकसित झाली. सर्वात प्राचीन लेखनपद्धती म्हणून साधारण पाच हजार वर्षांपूर्वी वापरण्यास सुरुवात झालेली, सुमेरियन संस्कृतीतील ‘क्यूनिफॉर्म लिपी’ ओळखली जाते. ही लिपी मातीच्या फलकांवर खोदून लिहित असत. सर्वसाधारण त्याच काळात इजिप्तमध्ये चित्रलिपी म्हणजेच हायरोग्लिफिक्स वापरत असत. सुरुवातीस लेखनपद्धती ज्ञान नोंदवण्यापेक्षा व्यापार, कर, राजकीय आदेश आणि धार्मिक नोंदी नोंदवण्यासाठी वापरत. काही ज्ञानार्थीनी मात्र ज्ञानाची नोंद करण्यासाठी ग्रंथलेखन केले. लेखनसंस्कृतीमुळे ज्ञान जतन होऊ लागले आणि ज्ञानप्रसारास गती मिळाली.
भारतालाही ज्ञानपरंपरेचा प्राचीन वारसा आहे. सुरुवातीस मौखिक स्वरूपात गुरु-शिष्य परंपरेतून पाठांतराने जपले गेलेले ज्ञान, ब्राम्ही आणि इतर लिप्यांच्या विकासानंतर वेद, उपनिषदे आणि इतर धार्मिक ग्रंथातून जतन करण्यात येऊ लागले. लेखनामुळे विचारांना स्थैर्य आले आणि अधिकृतता प्राप्त झाली. त्यावर चर्चा आणि विचारमंथन करणे सोपे झाले. ज्ञानाच्या विकासासोबत मानवाने जीवन, विश्व आणि निसर्ग याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली. ही पृथ्वी कशी निर्माण झाली?, जग कसे निर्माण झाले?, मानवाचे जीवन काय आहे?, सत्य म्हणजे काय? या आणि अशा प्रश्नांतून उत्तरे शोधता, शोधता तत्त्वज्ञानाचा जन्म झाला. जगातील अनेक विचारवंतांनी या प्रश्नांवर त्या त्या काळातील आकलनानुसार सखोल विचार मांडले.
अगदी सुरुवातीला ग्रीक तत्त्वज्ञांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सॉक्रेटीस यांनी ज्ञान आणि नैतिकतेबद्दल प्रश्न विचारण्याची पद्धत विकसित केली. त्यांची ‘संवाद पद्धती’ (सॉक्रेटीक मेथड) आजही प्रसिद्ध आहे. त्यानंतर प्लेटो यांनी आदर्श राज्य, न्याय आणि ज्ञान याबद्दलचे महत्त्वपूर्ण चिंतनपूर्ण आपले विचार मांडले. प्लेटोचे शिष्य अरिस्टॉटल यांनी तत्त्वज्ञानासोबतच जीवशास्त्र, तर्कशास्त्र आणि राजकारण या संदर्भातील प्रश्नांना हात घातला आणि आपले चिंतन लिखित स्वरूपात मांडले. त्यांचे अनेक विचार विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणारे होते. तरीही, त्यांचा निरीक्षण आणि वर्गीकरणावर भर होता. त्यातून पुढे विज्ञानाच्या विकासाला दिशा मिळाली.
भारतीय तत्त्वज्ञान परंपराही तितकीच किंवा त्यापेक्षाही समृद्ध आहे. गौतम बुद्ध यांनी दुःख, त्याची कारणे आणि त्यातून मुक्तीचा मार्ग सांगितला. हे सांगताना त्यांनी, ‘केवळ मी सांगतो म्हणून ते मान्य करू नका. तुमच्या अनुभवाला बुद्धीने तपासून, जर ते पटले, तरच मान्य करा’ असा अत्यंत मौलिक उपदेश केला. नेमका वैज्ञानिक दृष्टीकोन याच पायावर आधारीत आहे. भगवान महावीर यांनी जैन तत्त्वज्ञानात अहिंसा आणि अपरिग्रह यांचे महत्त्व सांगितले. या विचारवंतांनी मानवी जीवन, नैतिकता आणि सत्याच्या शोधाबद्दल आपले सखोल विचार मांडले आहेत.
तत्त्वज्ञानामुळे मानवाला विचार करण्याच्या पद्धती मिळाल्या. प्रश्न विचारणे, तर्क लावणे आणि निरीक्षण करणे, या प्रक्रियांना मानवी जीवनात महत्त्व मिळाले. यातूनच पुढे निसर्गातील घटनांसंदर्भात वैज्ञानिक पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा अनेक विचारवंतानी प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला निसर्गातील घटना, देवामुळे घडतात, असा सार्वत्रिक, सर्वच देशांमध्ये समज होता. पूर, वीज पडणे, पाऊस किंवा भूकंपासारख्या घटनांना दैवी शक्तींशी जोडले जायचे. परंतु पुढे मानवाने यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा अभ्यास करून त्यामागील निसर्ग नियम शोधण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न केला. पंधराव्या शतकानंतर युरोपमध्ये विज्ञानाच्या विकासाला वेग आला. मात्र त्याहीपूर्वी थैलस ऑफ मिलेट यांनी पाण्यापासून संपूर्ण जीवसृष्टी आली असावी, असे सांगितले होते. हिंद द्वीकल्पातही पाण्याला जीवन मानले जात होते. पुढे कोपर्निकसने सूर्य हा केंद्र असून इतर ग्रह त्याभोवती फिरतात, असे सांगितले. मात्र त्यांचे सांगणे वैज्ञानिकांच्या वर्तुळापुरते मर्यादित राहिले. पुढे गॅलिलिओ गॅलिली यांनी निरीक्षण आणि प्रयोगांचे महत्त्व सांगितले. लोकांसमोर प्रयोग करून ते सत्य लोकांना सांगत. शत्रू सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी विकसित झालेली दुर्बीण, त्यांनी आकाशाकडे वळवून ग्रहताऱ्यांचा अभ्यास केला आणि अनेक नवीन निरीक्षणे नोंदवली. तोपर्यंत हे सर्व विचार निसर्गविज्ञान या एका विषयाचा भाग होते.
मात्र विज्ञानाचा मार्ग सोपा नव्हता. गॅलिलिओ आणि इतर अनेक संशोधकांनी समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक संशोधकांचे मत धार्मिक संकल्पनांना धक्का देणारे होते. अशा प्रसंगात संशोधकांवर खटले भरण्यात येत आणि त्यांना मोठी शिक्षा सुनावण्यात येत असे. यातील सर्वात मोठा गाजलेला खटला हा गॅलिलिओ यांचा. गॅलिलिओ यांच्या मतानुसार पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आज हे सर्वमान्य असले तरी त्यांचे म्हणने धार्मिक संकल्पनांविरूद्ध होते. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरण्यात आला. देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पुढे न्यायाधिश मित्राच्या सूचनेनुसार माफी मागितल्याने शिक्षा नजरकैदेत बदलली. मात्र नजरकैदेतही त्यांनी ग्रंथलेखन केले. त्या ग्रंथाची प्रत सार्टी या विद्यार्थ्यासोबत इटालीच्या बाहेर पाठवली आणि सत्य लोकांसमोर मांडले.
निसर्गातील घटक आणि घटनांचा अभ्यास करणारे विज्ञान म्हणजे निसर्गविज्ञान. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल या विषयांचा निसर्गविज्ञानात समावेश होतो. या विज्ञानांमध्ये निरीक्षण, प्रयोग आणि तर्कांधारे, सत्य शोधण्यात येते. याच वैज्ञानिक पद्धतीमुळे ज्ञान अधिक अचूक आणि विश्वसनीय झाले.
