March 28, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
The subject disorder can only be overcome by positive thinking.
Home » विषय विकारावर सकारात्मक विचारानेच करता येते मात
विश्वाचे आर्त

विषय विकारावर सकारात्मक विचारानेच करता येते मात

साधनेमुळे असे सकारात्मक विचार आपल्यामध्ये उत्पन्न होतात. यासाठी साधना नित्य नेमाने करायला हवी. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्गुरू असे जोडला । किरीटीसी ।।३३४।। ज्ञानेश्वरी अध्याय १० वा

ओवीचा अर्थ – प्रल्हादानें माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असें हिरण्यकश्यपूस सांगितल्या कारणानें तो विषाहीसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता.

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात प्रल्हादाच्या गोष्टी मनाला पटणे अशक्य वाटते. या दंतकथा आहेत. ती अतिशोक्ती वाटते, पण शास्त्रावर आधारित लिखाण करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हे मग लिहिले कसे, हा प्रश्न पडतो. तसे दंतकथा आणि वास्तव यामध्ये बराच फरक आहे. इतिहासावर आधारित लिहिल्या गेलेल्या, दंतकथेतून सांगितल्या जाणाऱ्या रंजक कथानकामुळेच आज खरा इतिहास शोधणे कठीण जात आहे. ते रंजक कथानकच आपण खरे समजत असल्यानेच गैरसमज वाढत आहेत. यासाठी या कथांचा खोलवर जाऊन विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर आपल्या असे लक्षात येईल, की त्या काळातील तंत्रज्ञानही उच्च होते.

कारण त्या काळातील अनेक चमत्कारिक शोधांचा, वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांचा उलगडा सध्या नव्या तंत्रज्ञानाच्या युगातही होऊ शकला नाही. एकाच दगडात मंदिराचा कळस बांधला कसा गेला असेल? हा दगड नेमका इतक्या उंचीवर कसा नेला गेला असेल? असे प्रश्न काही पौराणिक मंदिरे पाहताना आपणास सहजच पडतात. कारण त्या काळात आताच्या सारख्या क्रेन नव्हत्या. मग हे शक्य कसे झाले? याचाच अर्थ, त्या काळातही प्रगत तंत्रज्ञान होते, पण काळाच्या ओघात ते लुप्त झाले.

प्रल्हादाने सर्व पदार्थात नारायण असल्याचे म्हटले होते मग विषातही नारायण असणार असा याचा अर्थ होतो. नारायण विषाही सर्व घटक आपण झाला याचा अर्थ आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात त्या सुद्धा भगवंताच्यामुळेच होतात. आपण चांगले घडले तर ते भगवंताच्याकृपेने झाले असे म्हणतो पण एखादे वाईट घडले तर ते सुद्धा त्याच्याच कृपेने घडते. त्याच्या इच्छेमुळेच असे घडले असे असते. यामध्येही त्याचा हेतू काहीतरी चांगला असणार असा सकारात्मक विचार केल्यास ते विषारी विचार सुद्धा आपणास बाधा देऊ शकत नाहीत. त्या विचारांची बाधा होत नाही. त्या वाईट गोष्टी पचवण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. पण मानसिकतेत आपण तसा बदल करायला हवा.

साधनेमुळे असे सकारात्मक विचार आपल्यामध्ये उत्पन्न होतात. यासाठी साधना नित्य नेमाने करायला हवी. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते. साधनेच्या काळात पित्ताशयात अनेक रसायने तयार होतात. त्यांचा शोध सध्याच्या काळातही लावता आलेला नाही, हे परखड सत्य आहे. साधनेत शरीरात तयार होणाऱ्या द्रव्यातून रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. विष पचविण्याची ताकतही या द्रव्यात असते. भक्तिमार्गातून मिळणारा आनंद, चेहऱ्यावर येणारे तेज हे या रसायनांचेच परिणाम आहेत. साधनेने चेहरा तजेलदार होतो. हा शरीरात तयार होणाऱ्या रसायनांचाच परिणाम आहे. यामुळेच शरीर निरोगी राहते. अशा या आध्यात्मिक चमत्कारांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

Related posts

येत्या दहा वर्षांत पूर्ण होईल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प

अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

कृषी वैज्ञानिक दाभोळकरांचा प्रयोग परिवार

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!