शेतकऱ्यांचे प्रश्न नवं तंत्रज्ञान आणि वास्तववादी साहित्य सोडवू शकते – कवी प्रकाश होळकर
शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या संख्येने होत आहेत. महाराष्ट्रासह आपला देश आत्महत्यांचा केंद्र झाला आहे. सरकार कोणतेही येऊ द्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. हे प्रश्न सोडवायचे असतील तर जागतिक कृषीतले तंत्रज्ञान आपल्या देशात आले पाहिजे. व त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. तसेच साहित्यिकांनी वास्तववादी भूमिका घेऊन लिहले पाहिजे तरच शेतीतले प्रश्न मार्गी लागू शकतात. असे प्रतिपादन कवी प्रकाश होळकर यांनी केले.
लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार व मॅग्नस कृषी रत्न पुरस्कार शिरसगाव ता. निफाड येथील मॅग्नस फार्म वर संपन्न झालेल्या वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मॅग्नस फार्मचे संस्थापक लक्ष्मण सावळकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक, विजयकुमार मिठे, संदीप जगताप , जावेद शेख , निवृत्ती गारे पाटील विचारपीठावर उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व व्याख्याते जावेद शेख यांच्यावतीने दरवर्षी लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्काराचे प्रायोजकत्व मॅग्नस फार्मने स्वीकारले. त्यांच्या प्राणांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात लोककवी विठ्ठल वाघ पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध कवी ललित अधाने यांना तर मॅग्नस कृषिरत्न पुरस्काराने द्राक्ष तज्ञ अनु दादा मोरे यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कवी लक्ष्मण महाडिक यांनी आजच्या साहित्यिकांनी समकालीन प्रश्न घेऊन लिहिले पाहिजे. तसेच त्यावरती उपाय काय यावरती मार्गदर्शकाची भूमिका देखील घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले. विजयकुमार मिठे यांनी शेतकऱ्यांचा दबाव गट हा सतत जिवंत राहिला पाहिजे. त्यासाठी दलित साहित्यिकांप्रमाणे ग्रामीण साहित्यिकांनी रस्त्यावरती येऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावा यासाठी जनजागरण देखील केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जावेद शेख यांनी केले. संदीप जगताप यांनी दोघेही पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला व या दोघांना का सन्मानित केलं जात आहे ? त्या पाठीमागची भूमिका विशद केली. शेतकरी आणि व्यापारी ही एकाच रथाची दोन चाक आहे. त्यांनी हातात हात घालून काम केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांच्या विकासाला हातभार लागतो. मॅग्नस फार्म सतत शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे काम करत राहील .असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण सावळकर यांनी अध्यक्ष मनोगतातून शेतकऱ्यांना दिला.
पुरस्कारार्थींचे मनोगत व्यक्त करताना अनुदादा मोरे यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या नव्या जागतिक संधीची ओळख करून दिली. द्राक्ष शेतीमध्ये सकारात्मक गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्या. तर कवी ललित अधाने यांनी आपल्या क्रांतिकारक कविता शेतकऱ्यांसमोर सादर करून उपस्थित रसिकांचे मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी मुकुंद ताकाटे व किरण पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार श्रद्धा पारख यांनी मानले. सागर जाधव, ज्ञानेश उगले, संदीप देशपांडे, गजानन घोटेकर, रवींद्र मोरे, सतीश मोरे, विठ्ठलराव संधान, वाळू मातेरे , राजेंद्र सोमवंशी, प्रशांत केंदळे, संतोष झोमन या असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅग्नस फार्मच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.

