शूलपाणीच्या झाडीत | प्रवेश करण्यापूर्वी…
शूलपाणी हे नर्मदेचे हृदय आहे. परिक्रमावासींची खरी कसोटी शूलपाणीच्या झाडीत लागते. पण झाडी हे नाव फार फसवे आहे. झाडी म्हणावे तर झाडी सोडाच हो, पण उन्हापासून डोक्याचे संरक्षण करायला सावलीलासुद्धा झाड नाही. येथे आहेत फक्त डोंगर. उघड्या नागड्या, वैराण व एकांत डोंगरांचा अनंत विस्तार. दुर्गम रस्ता आणि भयानक निर्जनता. नर्मदेच्या प्रदक्षिणेतील हा सर्वात कठीण भाग आहे. यातून कोणीही परिक्रमावासी लुटल्याशिवाय जाऊ शकत नाही. भिल्लांच्या भीतीने अधिकांश परिक्रमावासी झाडी सोडतात, किंवा मग थंडीत जातात.
उन्हाळ्यात खडक एवढे तापलेले असतात, की त्यावरून अनवाणी चालणे अतिशय कष्टदायक असते. तहान लागते ती निराळीच. डोंगरामागून डोंगर, वळणामागून वळणे, डोंगरांच्या दाटीवाटीतून रस्ता शोधत निघालेली वेडीवाकडी अरुंद नर्मदा, ही आहे शूलपाणीची झाडी. निसर्गाने जणू नर्मदेच्या धाग्यात डोंगराचा गजरा गुंफायला घेतलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन प्रांतांच्या मिलनस्थळावर पसरलेल्या नर्मदेच्या या ऐंशी मैल लांबलचक विस्तीर्ण जागेला ‘शूलपाणीची झाडी’ असे संबोधले जाते. झाडीतून परिक्रमावासी आईच्या पोटातून निघणाऱ्या बाळासारखे निर्वस्त्र निघतात.
शूलपाणीचे अद्भुत विश्व
जगासाठी नदी म्हटले म्हणजे एक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असेल पण आम्हा भारतीयांसाठी नदी म्हणजे देवी समान माता, आई आहे. त्यामुळेच पुराणांपासून ते आजच्या आधुनिक साहित्यात नदी बद्दल खूप लेखन झाले आहे. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे मनोज बोरगांवकर यांची नदीष्ट ही कादंबरी असेल किंवा नामदेव कोळी यांनी आपल्या वाघूर नदीवरील प्रेमापोटी दरवर्षी प्रकाशित केलेला वाघूर दिवाळी अंक असेल.
अशीच एक अनन्यसाधारण महत्त्व असणारी नदी म्हणजे ‘नर्मदा मय्या’ होय. नर्मदेची पहिली साहित्य रूपी ओळख गोनीदा यांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा मधून झाली. त्यानंतर नर्मदा आणि नर्मदा परिक्रमेची विस्तृत माहिती स्वामी अवधूतानंद म्हणजेच जगन्नाथ कुंटे यांच्या ‘नर्मदे हर हर’, ‘साधनामस्त’ ह्या सुंदर पुस्तकांतून मिळाली.
कित्येक जण नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करतात पण फार कमी लोक ती पायी पूर्ण करतात. बरेच जण वाहनांचा वापर करून, दुर्गम भागातून पायी परिक्रमा करणे टाळतात. ह्या परिक्रमेतील सर्वात अवघड भाग म्हणजे ‘शूलपाणीची’ झाडी होय. शूलपाणी म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या तीन राज्यांना जोडणारा जवळपास १००-१२५ किमी चा प्रदेश. इथे झाडी फक्त नावाला आहे. खरे म्हणजे हा परिसर म्हणजे उघड्या, वैराण डोंगरांचा प्रदेश. रस्ता अतिशय दुर्गम आणि निर्जन.
ह्या भागातून जायला कित्येक लोक घाबरतात. अगदी बोटावर मोजण्या इतकेच परिक्रमा वासी इथून जातात. याला कारण म्हणजे इथले स्थानिक मामा लोक आणि त्यांनी केलेली लुटमार. मामा अर्थानं नर्मदेचे भाऊ असणारे स्थानिक भिल्ल लोक होय. ह्या लोकांचे उदरनिर्वाहाचे एक मात्र साधन म्हणजे हे परिक्रमावासी होय. त्यांची अशी धारणा आहे की माता नर्मदा ह्या परिक्रमावासी लोकांना त्यांच्या कडे लुटून घेण्यासाठी पाठवते. ह्या लुटीमुळे ऐहिक वस्तूंची असणारी आसक्ती निघून जाते आणि लुटून घेणारा परिक्रमासी कित्येक वेळा केवळ साध्या लंगोटीवर बाहेर पडतो. जो आसक्ती सोडतो तोच खरा निस्वार्थ भक्त असतो अशी मान्यता आहे.
इथे अशी एक धारणा आहे की शूलपाणी हे अश्वत्थामाचे निवास स्थान आहे आणि तो वाट चुकलेल्या परिक्रमावासी लोकांना मदत सुद्धा करतो.
प्राजक्त प्रकाशनच्या शूलपाणीचे अद्भुत विश्व ह्या सुनील पांडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जवळ जवळ १७-१८ परिक्रमावासी लोकांच्या शूलपाणी तील अनुभवांचे विविध पुस्तकात असलेले भाग एकत्र संपादित केलेले आहेत. सुंदर अशा अनुभवांची अनुभूती घेण्यासाठी निश्चितपणे हे पुस्तक आपण वाचू शकता.
पुस्तकाचे नाव – शूलपाणीचे अद्भुत विश्व
संपादक – सुनील पांडे
प्रकाशक – प्राजक्त प्रकाशन पुणे.
किंमत – ३६०₹
पुस्तकासाठी संपर्क – जालिंदर चांदगुडे, मो. ९८९०९५६६९५
