March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
A novel about the uneasy present - Agnipralay
Home » अस्वस्थ वर्तमानाचे भान देणारी कादंबरी – अग्निप्रलय
मुक्त संवाद

अस्वस्थ वर्तमानाचे भान देणारी कादंबरी – अग्निप्रलय

देशात सध्या अघोषित हुकूमशाही आहे. दहशत आणि हम करेसो कायदा या तत्त्वाने कारभार केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटनाच पायदळी तुडवली जात आहे. हे सगळे धारिष्ट कुठून आले ?, याला खतपाणी कुठून मिळाले ? गेल्या आठ नऊ वर्षांत देशात जे काही घडत आहे, ते खरंच घडतंय का, हेतुपूर्वक घडवलं जात आहे, असा आज अनेकांना प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न आज अनेकांना अस्वस्थ करतो आहे. तो खूप अवघड असला, तरी त्याचं उत्तर शोधले पाहिजे. याच भूमिकेतून लिहिली गेली ज्येष्ठ आनंद केतकर यांची अग्निप्रलय ही कादंबरी आजच्या काळात एक बंडखोर कादंबरी म्हणून गणली जाईल, असे वाटते.

गुजरातमध्ये झालेल्या दंगलीची पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी साऱ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या त्या घटनेकडे अंगुली निर्देशन करते. धार्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या एका संघटनेच्या ऐका उच्चपदस्थाच्या नादी एक युवक लागतो. त्याला अंधभक्त कसे बनवले जाते आणि त्यातून त्याच्याकडून पडद्याआड राहून काय – काय करून घेतले. छोट्या-मोठ्या कामाबरोबरच सगळ्यांचे लक्ष्य आपल्याकडे ओढण्यासाठी एक मोठा हादसा कसा घडवावा, याचे डावपेच रचले जातात.
या कांदबरीचा जो नायक आहे, त्याला काय वाटते याच्यापेक्षा त्याला त्याच्या कामाचे श्रेय देत त्याला अधिक धाडसाने मोठा हादसा घडविण्यासाठी कसे उद्युक्त केले जाते. जेव्हा त्याला या सगळ्यातून बाहेर पडण्याची इच्छा होते, तेव्हा त्याच्या मैत्रिणीचा कसा काटा काढला जातो, तसेच तो या जाळ्यातून बाहेर पडू नये, यासाठी काय काय प्रयत्न केले जातात, याची माहिती खूपच रंजक पद्धतीने मांडलेली आहे. त्याच्यात अल्पसंख्याकांविषयी कसा द्वेष पेरला जातो, याचे वर्णन लेखकाने मोठ्या ताकदीने मांडलेले आहे.

कादंबरी वाचताना ती वादग्रस्त घटना डोळ्यासमोर उभी राहते. तिच्या मागे काय, काय कट-कारस्थाने शिजतात, याचा पत्ता अवती-भवती कुणालाच लागत नाही. सांकेतिक भाषेमध्ये एकमेकांना संदेश देणारी स्वतंत्र यंत्रणा तिथे काम करत असते. त्याचे वर्णन खूपच रंजक असे आहे. ही मंडळी कधीही कुठे दृश्य स्वरूपात समोर येत नाहीत. मात्र, सगळं कसं ठरल्याप्रमाणे घडवित असतात.

एका टप्प्यावर या सगळ्याचा नायकाला कंटाळ येतो. यातून आपण बाहेर पडले पाहिजे, असे त्याला वाटू लागतो. त्या संघटनेच्या प्रमुखाला त्याची कल्पना देतो. संघटना प्रमुख सहमती देतो. मात्र, हातात घेतलेले काम पूर्ण करून तू तुझ्या बायका पोरांच्यात परत जा, असा त्याला सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात मात्र त्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडणार नाही, याचीच व्यवस्था केली जाते. कारण एका व्यक्तीपेक्षा संघटना किती महत्त्वाची आहे आणि तिच्यासाठी अंतिम ध्येय काय आहे, त्याला इथे फार महत्त्व दिले जाते.

यानंतर घडवलेल्या दंगलीत अनेक निरापराध माणसे मारली, जाळली जातात. तो उच्चपदस्थ यामुळे हादरून जातो. पश्चात्तापाने वेडापिसा होतो मग आपणच आगीचा बळी ठरतो. या एका घटनेनंतर देशात फार मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तिचा फायदा घेत देशावर राज्य स्थापित केले जाते. पुढे अघोषित आणीबाणी लादलेली आहे. तिच्यातून सत्तेची मग्रुरी वाढते आहे. सध्याच्या देशातील भयग्रस्त वातावरणामध्ये ही कादंबरी निश्चितपणे दिशादर्शन करणारी आहे. लेखकाने तटस्थपणे आजच्या वास्तवाला भिडणारे सत्य मांडले आहे. आज अनेक लोक अस्वस्थ आहेत. या दहशतवादाचे करायचे काय? त्याला तोंड देण्यासाठी तिच्या मुळाशी जाण्याची गरज असते. ते काम ही कादंबरी प्रामाणिकपणे करते आणि हेच या कादंबरीचे यश आहे.

पुस्तकाचे नाव – अग्निप्रलय
लेखक- आ. श्री. केतकर, जयसिंगपूर
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे- २००, किंमत ३०० रूपये

Related posts

गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

जादा कामाचे तास म्हणजे जादा उत्पादकता नव्हे !

पंखांच्या बळावर

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!