March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Book launch of “Belachya Panavar” haiku collection by Marathi poet Rajan Lakhe in Pune with Prof Milind Joshi and literary dignitaries on stage
Home » बकुळगंधकार राजन लाखे यांच्या ‘”बेलाच्या पानावर” या हायकू संग्रहाचे प्रकाशन
काय चाललयं अवतीभवती

बकुळगंधकार राजन लाखे यांच्या ‘”बेलाच्या पानावर” या हायकू संग्रहाचे प्रकाशन

पुणे – राजन लाखे हे प्रयोगशील कवी असून त्यांचा बेलाच्या पानावर हा हायकू संग्रह हा विचार संग्रह आहे असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले

कविवर्य राजन लाखे लिखित ‘बेलाच्या पानावर…’ या हायकूसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे जिल्हा प्रतिनिधी डाॅ. पुरुषोत्तम काळे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, राजन लाखे उपस्थिती होते.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, ‘कवितेलाही आचारसंहिता असते याचे बहुसंख्य कवींना विस्मरण झाले आहे. त्यामुळेच मुक्तच्छंदाला मोकाट छंदाचे रूप प्राप्त झालेल्या आजच्या काळात ‘बेलाच्या पानावर…’ यासारख्या संग्रहातील छंदबद्ध आशयसंपन्न हायकू मनाला सुखावणारे आहेत.

राजन लाखे हे प्रयोगशील कवी असल्याने तंत्र आणि प्रतिभा यांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यरचनांमध्ये आढळून येतो. सत्याचे अव्वल दर्शन घडविण्यासाठीही प्रतिभा आवश्यक असते!’ सुनीताराजे पवार यांनी, ‘अल्पाक्षरी हायकूत खूप मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते, हे ‘बेलाच्या पानावर…’ या संग्रहातून प्रत्ययास येते!’ असे मत व्यक्त केले. विनोद कुलकर्णी यांनी, ‘राजन लाखे हे कवी अन् कवितांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व आहे!’ असे गौरवोद्गार काढले.

राजन लाखे आपल्या मनोगतात म्हणाले ‘सतरा अक्षरे अन् तीन ओळींचे बंधन असलेला हायकू हा कवी मात्सुओ बाशो यांचा मूळ जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी मराठीत रूढ केला. सतरा अक्षरे अन् तीन ओळी याच्या मर्यादेत राहून सुमारे २४० हायकूंच्या माध्यमातून मी आशयप्रधान भावनांचे चित्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखाध्यक्षांचा तसेच ‘बेलाच्या पानावर…’च्या निर्मितिप्रक्रियेत सहभागी झालेल्या नंदकुमार मुरडे, सुप्रिया ऐनापुरे अजित जमदाडे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेतील किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, इला पवार, नीलिमा फाटक यांनी संयोजन केले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. भूषण तोष्णीवाल यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related posts

प्रवासायन…

खऱ्याखुऱ्या गझलेचा सम्यक शोध

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!