कोल्हापूरः उसाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पावसाळा लांबल्याने ऊस तोडणीला अडथळा निर्माण झाला आहे. त्यातच शेतीमध्ये सध्या कामगार मिळणे कठीण झाले आहे. ऊस तोडणी कामगार मिळत नसल्याने नव्या पिढीचा ओढा आता यांत्रिकिकरणाकडे वळला आहे. कोल्हापूर येथील राजाराम सहकारी साखर सहकारी साखर कारखान्याचे रुकडी येथील संचालक विजय वसंतराव भोसले यांनी शेतकऱ्यांना भेडसावणारी हीच समस्या विचारात घेऊन ऊस तोडणी यंत्र खरेदी केले आहे.
ऊस तोडणी यंत्राबद्दल बोलताना शेतकरी विजय भोसले म्हणाले, सध्या न्यू हॉलंड कंपनीने ४०१० मॉडेल बाजारात आणले आहे. पूर्वीच्या ४००० मॉडेल पेक्षा या ऊस तोडणी यंत्रात अनेक बदल त्यांनी केले आहेत. या नव्या मॉडेलच्या ऊस तोडणी यंत्राची किंमत एक कोटी तीस लाखापर्यंत आहे.
नव्या यंत्रामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पूर्वी उसासोबत पाचटही ट्रॉलीमध्ये येत होते. त्यामुळे पाचट काढून टाकवे लागत होते. अन्यथा उसाच्या रिकव्हरीवर याचा परिणाम होत असे. नव्या यंत्रात ऊस आणि पाचट दोन्ही स्वतंत्र होत असल्याने नवे यंत्र अधिक सुलभ आहे. यामुळे ऊसाच्या रिकव्हरीवर याचा परिणाम होणार नाही, असेही भोसले यांनी सांगितले.
ऊसाच्या तोडणीला मजूर मिळत नाहीत ही सर्वात मोठी समस्या आहे. वेळेवर तोडणी होत नसल्याने उत्पादनावरही याचा परिणाम होतो. याचा फटका शेतकऱ्यांच बसतो. त्यातच तोडणी कामगार जमिनीपासून दहा ते बारा इंचावर तोडणी करतात. बुडक्याच्या उसात साखर जास्त असते. यंत्राने जमिनीलगत तोडणी होत असल्याने जास्त साखरेचा हा ऊस आपणास मिळतो. याचा परिणाम वजन तसेच रिकव्हरीवरही होतो. अधिक नफा मिळवण्यासाठी यंत्राने तोडणी अधिक फायदेशीर ठरणार आहे, असेही भोसले म्हणाले.
तोडणी कामगार टनाला ४५० ते ५०० रुपये घेतात. यंत्राचाही दर तितकाच असल्याने खर्चाची भीती बाळगण्याची चिंता नाही. तोडणी जलद होत असल्याने वेळेचेही बचत होते. अन् होणारे नुकसानही कमी होते. यासाठी आता शेतकऱ्यांनी तोडणी यंत्राला प्राधान्य देण्याची गरज आहे, असेही भोसले म्हणाले.
